न्यायासनाची शान राखणारी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि न्यायाधीश सापटणेकर यांची ऐतिहासिक भेट
By नम्रता फडणीस | Updated: April 14, 2026 09:33 IST2026-04-14T09:33:22+5:302026-04-14T09:33:52+5:30
- वडगाव मावळ येथील न्यायाधीशांचे निवासस्थान आजही या भेटीचे साक्षीदार

न्यायासनाची शान राखणारी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि न्यायाधीश सापटणेकर यांची ऐतिहासिक भेट
- नम्रता फडणीस
पुणे : वर्ष १९५२. देशाच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीच्या धामधुमीत, एका स्वाक्षरीसाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि न्यायाधीश दि. म. सापटणेकर यांची घडलेली ऐतिहासिक भेट न्यायव्यवस्थेच्या मूल्यांची साक्ष देणारी ठरली. ‘राज्यघटनेचे शिल्पकार’ अशी ओळख निर्माण केल्यानंतरही राजकीय क्षेत्रात पाऊल टाकणारे डॉ. आंबेडकर निवडणुकीच्या कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी थेट वडगाव मावळ न्यायालयात आले आणि न्यायालयीन नियमांचा मान राखून त्यांनी सर्व प्रक्रिया पूर्ण केली. त्यांच्या त्या भूमिकेने न्यायसंस्थेचा गौरव अधिकच उंचावला गेला.
या अभूतपूर्व भेटीची आठवण दि. म. सापटणेकर यांच्या मुलीने पुस्तकात लिहिलेली असून, ज्येष्ठ साहित्यिक प्रभाकर ओव्हाळ यांनी लिहिलेल्या ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि लोणावळ्याचे ऋणानुबंध’ या पुस्तकात या भेटीचा संदर्भ दिला आहे. याविषयी प्रभाकर ओव्हाळ यांनी या भेटीच्या स्मृती ‘लोकमत’शी बोलताना उलगडल्या. ते म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना भंडारा लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी घोषित करण्यात आली होती. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या दरम्यान डॉ. आंबेडकर हे लोणावळ्यात मुक्कामी होते. उमेदवारी अर्जाच्या पूर्ततेसाठी न्यायाधीशांची स्वाक्षरी आवश्यक होती. त्यावेळी बाबासाहेबांनी पोलिस जमादाराला बोलावून घेत कोर्ट लोणावळ्यात येऊन फॉर्मवर स्वाक्षरी करेल का? किंवा पुढील प्रक्रिया कशी करावी लागेल? याबाबत विचारणा करण्यास सांगितले. तेव्हा वडगाव मावळ न्यायालयात दि. म. सापटणेकर हे न्यायाधीश होते. पोलिसांनी डॉ. आंबेडकर यांनी केलेल्या विचारणेबाबत न्यायाधीशांना सांगितले. मात्र, न्यायालयीन नियमांनुसार दस्तऐवज न्यायालयाबाहेर नेणे शक्य नसल्याने सापटणेकर यांनी अत्यंत नम्रपणे बाबासाहेबांनी न्यायालयात येणेच योग्य ठरेल, असा निरोप दिला.
न्यायालयीन शिस्तीचा मान राखत बाबासाहेब स्वतः वडगाव न्यायालयात उपस्थित झाले. न्या. सापटणेकर स्वतः गाडीजवळ जात बाबासाहेबांना आणायला गेले. बाबासाहेबांचे काम फक्त पाच मिनिटांचे होते. सापटणेकर यांनी त्यांचे आदरपूर्वक स्वागत करून आवश्यक प्रक्रिया पूर्ण केली. त्यानंतर माफी मागत ते म्हणाले की, मला खूप वाईट वाटत आहे की, मी तुमच्यासारख्या दिग्गज व्यक्तीला इथे बोलावले. यावर बाबासाहेबांनी दिलेले उत्तर आजही स्मरणीय आहे. ‘न्यायासनाची शान राखलीत, हेच योग्य आहे. न्यायाधीशांनी असा ताठ कणा ठेवायला हवा,’ असे ते म्हणाले. सापटणेकर पुढे म्हणाले की, तुम्हाला बोलावण्यामागे माझा एक छोटासा स्वार्थ होता. मी पत्नीला जेव्हा सांगितले की, उद्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना न्यायालयात बोलावले आहे. तेव्हा पत्नी म्हणाली, आपण त्यांना जेवायला बोलावू. ही गोष्ट सापटणेकर यांनी बाबासाहेबांना सांगितली. तेव्हा बाबासाहेबांनी पत्नीला विचारले आणि त्यांनी तत्काळ ‘होकार’ दर्शविला. बाबासाहेबांनी स्नेहभोजनाचे आमंत्रण स्वीकारले. त्या काळात सामाजिक बंधने आणि अस्पृश्यतेचा प्रभाव मोठ्या प्रमाणावर असतानाही सापटणेकर कुटुंबाने त्यांचे मोठ्या आदराने स्वागत केले. न्यायमूर्ती सापटणेकर यांच्या पत्नी पार्वतीबाई यांनी स्वतः भोजनाची तयारी करून बाबासाहेबांना वाढले आणि जेवू घातले.
सापटणेकर दाम्पत्याने बाबासाहेबांची पूजा केली, पण कशाला एवढे केलेत, असे बाबासाहेबांनी म्हटल्यावर, तुमच्यातील विद्वत्ता बघून आम्ही पाद्य पूजा करायचे ठरविले, असे उत्तर पार्वतीबाई यांनी दिले. निरोप घेताना बाबासाहेबांनी पार्वतीबाईंना ‘लेक’ म्हणत आशीर्वाद दिला. हा प्रसंग केवळ एका औपचारिक भेटीपुरता मर्यादित न राहता न्याय, समता आणि परस्पर सन्मानाचे मूल्य अधोरेखित करणारा ठरला. आजही वडगाव येथील न्यायाधीश निवासस्थान या ऐतिहासिक आठवणीची साक्ष देत असल्याचे ओव्हाळ यांनी सांगितले.