नाट्यमय घडामोडींनंतर पुणे जिल्हा परिषदेत जगदाळे अध्यक्ष, वळसे-पाटील उपाध्यक्ष बिनविरोध
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2026 13:59 IST2026-03-19T13:58:55+5:302026-03-19T13:59:31+5:30
- विरोधकांची माघार; चार वर्षांच्या प्रशासकीय राजवटीनंतर सत्तेचा ताबा राष्ट्रवादीकडे

नाट्यमय घडामोडींनंतर पुणे जिल्हा परिषदेत जगदाळे अध्यक्ष, वळसे-पाटील उपाध्यक्ष बिनविरोध
पुणे : नाट्यमय घडामोडींनंतर बुधवारी (दि. १८) जिल्हा परिषदेतील चार वर्षांचे प्रशासकराज संपुष्टात आले. अध्यक्षपदी दौंड तालुक्यातील ज्येष्ठ सदस्य वीरधवल जगदाळे, तर उपाध्यक्षपदी विवेक वळसे-पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली. जिल्हाधिकारी तथा पीठासीन अधिकारी जितेंद्र डुडी यांनी बिनविरोध निवडीची घोषणा जाहीर केली.
जिल्हा परिषदेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे ७३ पैकी ५१ सदस्य विजयी झालेले आहेत. स्पष्ट बहुमत असल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्ष उपाध्यक्ष होणार हे निश्चित होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसची सूत्रे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे गेली. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या पदाधिकारी निवडीचे सर्वाधिकार हे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे देण्यात आले होते. मात्र, तरीही दौंडमधून तुषार थोरात यांचे नाव चर्चेत राहिले होते. निवडीच्या पूर्वसंध्येलाही मुंबईत राजकीय खलबते सुरू होते. बुधवारी राष्ट्रवादी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नवनिर्वाचित सदस्यांची बैठक पक्षाच्या शिवाजीनगर कार्यालयात झाली. या बैठकीमध्ये सुनेत्रा पवार यांच्याकडून आलेला बंद लिफाफा फोडण्यात आला. त्यामध्ये अध्यक्षपदासाठी वीरधवल जगदाळे आणि उपाध्यक्ष पदासाठी विवेक वळसे-पाटील यांच्या नावाची घोषणा करण्यात आली.
जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात विशेष सभा आणि अध्यक्ष आणि उपाध्यक्षाची निवडणूक झाली. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक- २०२५ च्या समन्वयक अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी चारुशीला देशमुख-मोहिते, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकांत खरात जिल्हा परिषदेचे नवनिर्वाचित सदस्य, पंचायत समितीचे सभापती आदी उपस्थित उपस्थित होते.
निवडणुकीमध्ये अध्यक्षपदाकरिता राष्ट्रवादी काँग्रेसकडून वीरधवल जगदाळे, तर उद्धवसेनेकडून विजयसिंह शिंदे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. तर उपाध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून विवेक वळसे-पाटील, तर शिंदेसेनेकडून मंगेश काकडे यांनी अर्ज दाखल केला. दुपारी तीन वाजता झालेल्या सर्वसाधारण सभेमध्ये दाखल उमेदवारी अर्जांची छाननी करण्यात आली. सर्व अर्ज छाननीमध्ये वैध ठरले. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी निवडणूक प्रक्रियेची माहिती देत, उमेदवारी अर्ज माघारी घेण्यास १५ मिनिटांचा अवधी जाहीर केला. त्यानंतर नाट्यमय घडामोडी घडल्या. राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते श्रीमंत ढोले, करण खलाटे, विक्रम खुटवड, अमोल नलावडे यांनी, तर उद्धवसेनेचे गटनेते विजयसिंह शंदे, शिंदेसेनेचे मंगेश काकडे आणि भाजपच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यामध्ये निवडणूक बनविरोध करण्याचा निर्णय घेण्यात आला.
विरोधी पक्षाचे शिंदे आणि काकडे यांनी आपले उमेदवारी अर्ज माघारी घेतले त्यानंतर अध्यक्षपदासाठी वीरधवल जगदाळे आणि उपाध्यक्षपदासाठी विवेक वळसे पाटील यांची बिनविरोध निवड झाल्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी जाहीर केले.
विरोधी पक्ष आले एकत्र
जिल्हा परिषदेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे ५१ सदस्य असून भाजप १०, उद्धवसेनेचे ६, शिंदेसेनेचे ५, तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा एक सदस्य आहे. बुधवारी झालेल्या अध्यक्ष, उपाध्यक्षपदाच्या निवडीमध्ये भाजपच्या सदस्यांनी उमेदवारीसंदर्भात भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्षांच्या निर्णयानंतर उमेदवारी अर्ज दाखल न करण्याचा निर्णय झाला. त्यानंतर उद्धवसेना आणि शिंदेसेनेने उमेदवारी भरण्याची तयारी दर्शविल्यानंतर भाजपनेही त्यांना पाठिंबा दिला. यामुळे सर्व विरोधी पक्ष एकत्र आल्याचे दिसले.
बैठक ठरली बंगल्यावर झाली पक्ष कार्यालयात
निवडीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांची बैठक बोलावण्यात आली होती. ही बैठक अध्यक्षांच्या बंगल्यात होणार असल्याची चर्चा सुरू झाली. त्यावेळी विरोधी पक्षानेही आम्हालाही बैठकीसाठी बंगला द्यावा अशी मागणी केली. त्यावेळी प्रशासनाने कोणालाही बंगला दिला नसल्याचे स्पष्ट केले. दरम्यानच्या काळात राष्ट्रवादीचे काही सदस्य अध्यक्षांच्या बंगल्यावर पोहोचले होते. तेथे टाळे दिसल्याने बैठक काेठे आहे हे समजेनासे झाले. त्यानंतर जिल्हा बँकेत तसेच बारामती हॉस्टेलवर ही बैठक घेण्याचे नियोजन करण्यात आले. मात्र त्या ठिकाणी कमी वेळात नियोजन करणे शक्य होत नव्हते. अखेर शिवाजीनगर येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष कार्यालयात बैठक घेण्यात आली.
अजितदादा असते तर त्यांचा आनंद द्विगुणित झाला असता. दादा दादाच होते. ते इतक्या लवकर जातील, हे कोणालाच वाटले नव्हते. दादांनी पुणे जिल्हा परिषदेला सर्वसामान्यांची संस्था म्हणून देशभरात ओळख करून दिली. दादा अनेकदा म्हणायचे, “रडत बसू नका, उठा आणि कामाला लागा.” नवीन सदस्यांना आवाहन आहे की, आपण थांबायचे नाही; दुप्पट जोमाने कामाला लागायचे. - वीरधवल जगदाळे, अध्यक्ष, जिल्हा परिषद, पुणे
अजित पवार यांच्या जाण्याने पोकळी निर्माण झाली असून ती कोणीच भरून काढू शकत नाही. आपण दादांनी निवडलेले शेवटचे सदस्य आहोत. त्याची जाणीव ठेवून अधिक काम करूया. - विवेक वळसे पाटील, उपाध्यक्ष, जिल्हा परिषद, पुणे