दोन वर्षांची चिमुकली भिकेसाठी अपहरण;तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2025 16:40 IST2025-07-30T16:38:24+5:302025-07-30T16:40:37+5:30
- या कारवाईत पोलिसांनी एका महिलेसह पाच जणांना अटक करून भिक मागण्यासाठी लहान मुलांचे अपहरण करणाऱ्या टोळीचा पर्दाफास केला आहे.

दोन वर्षांची चिमुकली भिकेसाठी अपहरण;तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
पुणे - भिक मागण्यासाठी कात्रज येथील वंडर सिटी झोपडपट्टीमधून अपहरण केलेल्या २ वर्षाच्या चिमुकलीची भारती विद्यापीठ पोलीस आणि गुन्हे शाखा युनिट ०२ च्या पथकाने तुळजापूर (धाराशिव) येथून सुखरूप सुटका केली. या कारवाईत पोलिसांनी एका महिलेसह पाच जणांना अटक करून भिक मागण्यासाठी लहान मुलांचे अपहरण करणाऱ्या टोळीचा पर्दाफास केला आहे.
सुनिल सिताराम भोसले (५१ वर्षे, धंदा मजुरी, रा. मोतीझारा, तुळजापुर, जिल्हा धाराशीव, शंकर उजन्या पवार (५० वर्षे) शालुबाई प्रकाश काळे (४५ वर्षे), गणेश बाबु पवार (३५ वर्षे, तिघेही रा. डिकमाळ, पारधी वस्ती, तुळजापुर, धाराशीव), तसेच मंगल हरफुल काळे, (१९ वर्षे, रा. रेंज हिल, खडकी रेल्वे लाईनझोपडपट्टी, खडकी) असे पोलिसांनि अटक केलेल्यांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वंडर सिटी झोपडपट्टीमधून एका दोन वर्षाची चिमूकलीला २५ जुलै रोजी रात्रीच्या कोणी तरी झोपेतुन उचलून पळवुन नेले होते. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता. चिमुकलीच्या शोधासाठी भारती विद्यापीठ पोलीसांची दोन टीम तयार केल्या होत्या. तसेच गुन्हे शाखेनेही तपास पथके तयार करुन कात्रज ते पुणे स्टेशन दरम्यानचे रोडवरील सर्व आस्थापनांचे सीसीटीव्ही कॅमेरे तपासले केले. त्यामध्ये दोन पुरुष व एक महीला हे एका दुचाकी गाडीवरुन पिडीत मुलीस घेवुन पुणे रेल्वे स्टेशनकडे जात असल्याचे गिसून आले. पोलीसांनी पुणे रेल्वे स्टेशनमधील सीसीटीव्ही कॅमेरांची पाहणी केल्यानंतर त्याठिकाणी आरोपींसोबत आणखी दोन आरोपी असल्याचे दिसुन आले.
त्या ठिकाणावरुन आरोपींचे चेहरे स्पष्ट झाले. त्यानंतर सर्व आरोपी धाराशीव जिल्ह्यातील तुळजापुर या ठिकाणी असल्याची माहीती भारती विद्यापीठ व गुन्हे शाखा, युनिट २ च्या तपास पथकाला मिळाली.
मिळालेल्या माहीतीनुसार, भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक मोकाशी, पोलीस अंमलदार तसेच गुन्हे शाखा युनिट ०२ चे साय्यक पोलीस निरीक्षक कवठेकर व पोलीस अंमलदार अशी दोन पथके तुळजापुरला पोहचले. धाराशिव एलसीबी पोलीसांच्या मदतीने कौशल्यपुर्ण पध्दतीने तपास करून आरोपींना ताब्यात घेऊन चौकशी केल्यानंतर चिमुकली सुखरुप असून भिक मागण्यासाठी तिचे अपहरण केल्याचे सांगितले. या कारवाईय पोलिसांनी त्यांच्या ताब्यातील चिमुकली सुखरुप सुटका केली.