Unseasonal Rain: राहू परिसरात गारपिटीसह अवकाळी पाऊस; शेतीपिकांचे मोठे नुकसान
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2026 15:51 IST2026-03-20T15:51:02+5:302026-03-20T15:51:51+5:30
- वादळी वाऱ्याने ऊस, फळबागा भुईसपाट; वीटभट्ट्यांनाही फटका, पंचनाम्याची मागणी

Unseasonal Rain: राहू परिसरात गारपिटीसह अवकाळी पाऊस; शेतीपिकांचे मोठे नुकसान
राहू : राहू परिसरात बुधवारी (दि. १८) सायंकाळच्या सुमारास वादळी वारा, मेघगर्जनेसह गारांच्या अवकाळी पावसाने शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अनेक ठिकाणी गारांचा पाऊस झाल्याने फळपिकांसह ऊसपिकेही भुईसपाट झाली आहेत.
अचानक आलेल्या या पावसामुळे गहू काढणी सुरू असताना शेतकऱ्यांची मोठी धांदल उडाली. खामगाव परिसरात वादळी वाऱ्यासोबत गारांचा खच पडल्याचे दिसून आले. जोरदार वाऱ्यामुळे काही ठिकाणी झाडे उन्मळून पडली. डाळिंब, केळी, आंबा, पपई, कलिंगड यांसारख्या फळपिकांसह कांद्याचेही मोठे नुकसान झाले आहे.
खामगाव, उंडवडी, पाटेठाण, राहू आणि परिसरातील अनेक गावांमध्ये पिके भुईसपाट झाली असून वीटभट्ट्यांवरील कच्च्या विटा पावसात भिजल्याने वीट व्यावसायिकांनाही मोठा फटका बसला आहे.
गारपिटीमुळे गहू, कांदा आणि डाळिंब पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. शासनाने तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी. -रणजित देशमुख (शेतकरी)