मोशीतील प्रस्तावित कत्तलखाना आरक्षण अखेर रद्द;मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2025 14:06 IST2025-06-21T13:52:52+5:302025-06-21T14:06:25+5:30
- जो काही विकास आराखडा आहे. त्या विकास आराखड्यामध्ये मोशी-आळंदी येथे कत्तलखाण्याचे आरक्षण दाखवण्यात आले आहे. मात्र कुठल्याही परिस्थितीमध्ये कत्तलखाना होऊ दिला जाणार नाही.

मोशीतील प्रस्तावित कत्तलखाना आरक्षण अखेर रद्द;मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा
पुणे : तीर्थक्षेत्र आळंदी लगत असणाऱ्या मोशी - डुडुळगाव परिसरात पिंपरी - चिंचवड महापालिकेने चार एकर जागेवर कत्तलखाना उभारण्यासाठी जागा आरक्षित केली आहे. या धक्कादायक निर्णयामुळे संपूर्ण हिंदू समाज, विविध हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि लोकप्रतिनिधींमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे या परिसरात राम मंदिर अयोध्याचे कोषाध्यक्ष पूज्य गोविंददेव गिरी महाराज यांचा वेदव्यास 'तपोवन' आश्रम असून हजारो विद्यार्थी त्याठिकाणी वेदिक शिक्षण घेत आहेत. अशा पवित्र स्थळी कत्तलखाना उभारण्याचा निर्णय म्हणजे हिंदू धर्म, अध्यात्म व परंपरेवर थेट हल्ला असल्याचा आरोप केला जात आहे.
अशात आज माध्यमांशी बोलतांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, जो काही विकास आराखडा आहे. त्या विकास आराखड्यामध्ये मोशी-आळंदी येथे कत्तलखाण्याचे आरक्षण दाखवण्यात आले आहे. मात्र कुठल्याही परिस्थितीमध्ये कत्तलखाना होऊ दिला जाणार नाही. त्याबाबतच्या आरक्षण वगळण्याच्या आदेश मी दिले आहेत. वारकऱ्यांना आणि वारकरी नेत्यांना सांगू इच्छितो कोणत्याही परिस्थितीत कत्तलखाना होणार नाही.
ते पुढे म्हणाले, पिंपरी-चिंचवड महापालिका सुधारित विकास आराखड्यामध्ये प्रस्तावित केलेला मोशी व तीर्थक्षेत्र आळंदीच्या परिसरातील कत्तलखान्याचे आरक्षण रद्द करण्यात येईल. वारकरी, भूमिपुत्र आणि शेतकऱ्यांच्या श्रद्धेच्या बाबतीत कोणतीही तडजोड केली जाणार नाही, अशी घोषणा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचा आषाढी वारी पायी पालखी सोहळा पुण्यात दाखल झाला आहे. या ठिकाणी मुख्यमंत्री फडणवीस यांनी पालखीचे दर्शन घेतले आणि वारकऱ्यांशी संवाद साधला.