जे खपते, ते विकणाऱ्याच्या मागेच निर्माते; 'सामना'सारखे ध्येयवादी चित्रपट काढणे त्यांच्यासाठी कठीण - सुशीलकुमार शिंदे

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2025 10:57 IST2025-06-03T10:55:13+5:302025-06-03T10:57:05+5:30

हुल्लडबाज चित्रपटांच्या तुलनेत ध्येयवादी चित्रपटांना कमी प्रतिसाद मिळतो, परंतु दूरदृष्टीच्या कसोटीवर पाहिल्यास ध्येयवादी चित्रपटच टिकून राहतात

Producers are after the seller of what is consumed It is difficult for them to make a visionary film like 'Saamana' - Sushilkumar Shinde | जे खपते, ते विकणाऱ्याच्या मागेच निर्माते; 'सामना'सारखे ध्येयवादी चित्रपट काढणे त्यांच्यासाठी कठीण - सुशीलकुमार शिंदे

जे खपते, ते विकणाऱ्याच्या मागेच निर्माते; 'सामना'सारखे ध्येयवादी चित्रपट काढणे त्यांच्यासाठी कठीण - सुशीलकुमार शिंदे

पुणे : आज लाखात नव्हे तर कोटींमध्ये चित्रपट निघतात. मात्र, 'सामना'सारखे ध्येयवादी चित्रपट काढणे ही निर्मात्यांसाठी कठीण गोष्ट आहे. हुल्लडबाज चित्रपटांच्या तुलनेत ध्येयवादी चित्रपटांना कमी प्रतिसाद मिळतो. परंतु, दूरदृष्टीच्या कसोटीवर पाहिल्यास ध्येयवादी चित्रपटच टिकून राहतात. जे खपते, ते विकणाऱ्याच्या मागे निर्माते उभे राहतात, ही आजची शोकांतिका आहे. आज कलेला ध्येयवादाकडून कुठे घेऊन चाललो आहोत याचा विचार करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केले. रामदास फुटाणे यांच्यासारखा एकच माणूस आहे, ज्याने ध्येयवादाचे उद्दिष्ट ठेवून चित्रपटाची निर्मिती केली आहे, असेही कौतुकोद्गार त्यांनी काढले.

राजकारण आणि समाजकारण याचा वास्तववादी चेहरा समोर आणणारा 'सामना' चित्रपट मैलाचा दगड ठरला. सत्तरीच्या दशकातील ‘सामना’ची पन्नाशी. चित्रपटाचे निर्माता, कलाकार यांना प्रत्यक्ष मुलाखतीतून अनुभवण्याची संधी अन् चित्रपटाचे प्रक्षेपण.. असा तिहेरी योग जुळून आल्याने रसिकांची राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयात तुडुंब गर्दी झाली होती. सभागृहात पाय ठेवायला देखील जागा नव्हती. सभागृहात बसण्यास जागा न मिळाल्याने रसिकांनी जमिनीवर बसून सामना पाहण्याचा आनंद लुटला. एखाद्या सत्तरीच्या दशकातील चित्रपटाला एकविसाव्या शतकातही गर्दी होणे यातून या चित्रपटाचे गारुड रसिक मनावर आजही कायम असल्याचे दिसून आले.

ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे, सामनाचे निर्माते व वात्रटिकाकार रामदास फुटाणे, विलास रकटे, कोहिनूर ग्रुपचे चेअरमन कृष्णकुमार गोयल, आशय फिल्म क्लबचे वीरेंद्र चित्राव व सतीश जकातदार, साहित्य कला गौरवचे गौरव फुटाणे आदी यावेळी उपस्थित होते.

यावेळी विजय तेंडुलकर, निळू फुले, डॉ. श्रीराम लागू आणि भास्कर चंदावरकर यांच्या स्मरणार्थ पहिला ‘साहित्य कला गौरव सामना सन्मान’ ‘वाळवी’ या राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त चित्रपटासाठी निर्मात्या मधुगंधा कुलकर्णी आणि परेश मोकाशी यांना प्रदान करण्यात आला. यावेळी ‘कोहिनूर कट्टा’च्या बोधचिन्हाचे अनावरण करण्यात आले. यावेळी झालेल्या चर्चासत्रात ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे, विलास रकटे, निर्माते रामदास फुटाणे, परेश मोकाशी सहभागी झाले होते. या चर्चेचे सूत्रसंचालन ज्येष्ठ समीक्षक दिलीप ठाकूर यांनी केले.

मला राजकारणाचे कोणतेही आकलन नसताना हा चित्रपट काढला होता. त्यावेळी हा चित्रपट फ्लॉप झाला असला तरी आत्ता लोक या चित्रपटाला दाद देत आहेत. त्यामुळे 'सामना'चे यश हे तेंडुलकरांचे यश आहे. तेंडुलकर कळणे महत्त्वाचे आहे. ज्यांना तेंडुलकर कळले त्यांनाच चित्रपट काढणे शक्य आहे. आजच्या काळातही मारुती कांबळे लागू होतो. एससी आणि ओबीसी यांना कसे वापरायचे हे राजकारण्यांना कळते. - रामदास फुटाणे

ज्या चित्रपटाचा कंटेंट उत्कृष्ट असतो तो चित्रपट कधीच कालबाह्य होत नाही. तो आजही लागू पडतो.. हा विजय तेंडुलकर याचा चित्रपट आहे. निळू फुले आणि डॉ. श्रीराम लागू यांचा अभिनय हेच या चित्रपटाचे व्हिज्युअल आहे. - डॉ. मोहन आगाशे

आज ' सामना' चित्रपटासारखीच एवढी गर्दी मराठी चित्रपटांना झाली पाहिजे, त्यासाठी सामनासारख्या दर्जेदार चित्रपटांची निर्मिती झाली पाहिजे. एका निर्मात्याकडून जेव्हा शाबासकीची थाप मिळते तेव्हा चित्रपट करण्याची उभारी मिळते. - मधुगंधा कुलकर्णी

Web Title: Producers are after the seller of what is consumed It is difficult for them to make a visionary film like 'Saamana' - Sushilkumar Shinde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.