VIDEO: हिंजवडीतलं OYO हॉटेल, रूम नं 306; 'त्या' रात्री भयंकर घडलं...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2024 15:23 IST2024-01-30T15:22:20+5:302024-01-30T15:23:36+5:30
तिच्यासोबत असणारा प्रियकर मात्र गायब होता. घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली. तपासाची चक्र फिरवली.. आणि समोर आलं भयंकर सत्य....

VIDEO: हिंजवडीतलं OYO हॉटेल, रूम नं 306; 'त्या' रात्री भयंकर घडलं...
- किरण शिंदे
पुणे : वंदना द्विवेदी ही २६ वर्षाची तरुणी. मुळची उत्तर प्रदेशच्या लखनऊची. सध्या हिंजवडीच्या आयटी पार्कमध्ये नोकरीला होती. मात्र २७ जानेवारी हा दिवस तिच्या आयुष्याचा अखेरचा दिवस ठरला. या दिवशी ती प्रियकरासोबत हिंजवडीतील एका ओयो हॉटेलमध्ये गेली होती. रात्रभर तिचा तिथेच मुक्काम होता. मात्र सकाळ होताच एक भयंकर प्रकार उघडकीस आला. या ओयो हॉटेलमध्ये रक्ताच्या थारोळ्यात वंदनाचा मृतदेह पडला होता. तिच्यासोबत असणारा प्रियकर मात्र गायब होता. घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली. तपासाची चक्र फिरवली.. आणि समोर आलं भयंकर सत्य.
ऋषभ निगम आणि वंदना हे दोघेही लखनऊ येथील रहिवासी. एकाच परिसरात राहणारे. शाळेपासून दोघांची मैत्री होती. जुनी मैत्री प्रेम संबंधात कधी बदलली त्या दोघांनाही कळले नाही. शाळा संपली, कॉलेज संपलं, नोकरीसाठी वंदना पुण्यात आली. पुण्यातील नामांकित आयटी कंपनीत कामाला लागली.तर ऋषभ हा लखनौत ब्रोकर म्हणून छोटी मोठी कामे करत होता. वंदना पुण्यात ऋषभ लखनऊमध्ये. एरवी तासनतास एकमेकांना वेळ देणाऱ्या या दोघात बोलणं कमी झालं. यामुळे ऋषभ मात्र सैरभैर झाला. वंदनावर संशय घेऊ लागला. तिचं बाहेर अफेअर तर नाही ना अशी भीती त्याला सतावू लागली. संशयाचे हे भूत दिवसेंदिवस वाढत गेलं आणि हृषभने टोकाचे पाऊल उचलण्याचं ठरवलं.
25 जानेवारीला तो पुण्यात आला. त्याने हिंजवडीतील ओयो हॉटेलमध्ये रूम घेतली. २६ जानेवारीला वंदना त्याला भेटायला आली. वेळ दोघांनी सोबत घालवला आणि ती लगेच परतली. २७ जानेवारीला वंदना परत आली. दोघांनी एकत्र शॉपिंग केली, दिवसभर दोघेही एकत्रच होते. रात्री परत हॉटेलमध्ये आले. दोघेही बेडवर असताना ऋषभने अचानक बंदूक काढली आणि पाच गोळ्या वंदनावर झाडल्या. डोक्यात गोळ्या लागल्याने वंदनाचा जागीच मृत्यू झाला.
नाकाबंदीमुळे आरोपी सापडला-
अतिशय थंड डोक्याने ऋषभने वंदनाचा खून केला. त्यानंतर रात्री दहा वाजण्याच्या सुमारास तो खोलीतून बाहेर पडला आणि मुंबईच्या दिशेने निघून गेला. मुंबईत पोलिसांच्या नाकाबंदी दरम्यान संशयास्पद वाटलेल्या ऋषभची पोलिसांनी अंग झडती घेतली. तेव्हा त्यांना त्याच्या बॅगेत एक बंदूक सापडली. त्यानंतर ऋषभचं हे बिंग फुटलं. मुंबई पोलिसांनी त्याला पिंपरी चिंचवड पोलिसांच्या ताब्यात सोपवलं. पोलिसांनी त्याला अटकही केली. केवळ डोक्यात संशयाचे भूत शिरल्याने ऋषभने प्रेयसी वंदनाचा खून केला.