दिवसभरात सव्वा टीएमसी पाणीसाठा जमा, धरणातून ८ हजार ७३४ क्युसेकने मुठा नदीत विसर्ग
By नितीन चौधरी | Updated: June 19, 2025 20:48 IST2025-06-19T20:45:49+5:302025-06-19T20:48:28+5:30
पहाटेपासून सुरू असलेल्या पावसामुळे धरणांमधील आवक वाढली परिणामी जलसंपदा विभागाने सायंकाळी ७ वाजता खडकवासला धरणातून ८ हजार ७३४ क्युसेकने मुठा नदीत विसर्ग सुरू केला होता.

दिवसभरात सव्वा टीएमसी पाणीसाठा जमा, धरणातून ८ हजार ७३४ क्युसेकने मुठा नदीत विसर्ग
पुणे : खडकवासला प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात गुरुवारी पहाटेपासून सुरू झालेल्या संततधार पावसामुळे दिवसभरात सुमारे सव्वा टीएमसी पाणीसाठा वाढला आहे. त्यामुळे चारही धरणांची क्षमता ३० टक्क्यांपर्यंत पोहोचली असून, एकूण पाणीसाठा ८.६८ टीएमसी इतका झाला आहे.
पहाटेपासून सुरू असलेल्या पावसामुळे धरणांमधील आवक वाढली परिणामी जलसंपदा विभागाने सायंकाळी ७ वाजता खडकवासला धरणातून ८ हजार ७३४ क्युसेकने मुठा नदीत विसर्ग सुरू केला होता. पावसाचा जोर वाढल्यास यात आणखी वाढ होण्याची शक्यता विभागाने वर्तवली आहे. यामुळे नदीकाठी असणाऱ्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
शहरात गुरुवारी पहाटेपासूनच मध्यम स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावत शहरात सर्वत्र पाणीच पाणी केले. पावसाचा हा जोर खडकवासला प्रकल्पाच्या चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात होता. त्यामुळे धरणांमध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरू झाली. जलसंपदा विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार गुरुवारी पहाटे सकाळी ६ वाजेपर्यंत चारही धरणांमध्ये एकत्रित पाणीसाठा ७.४० टीएमसी अर्थात २५.३९ टक्के इतका होता. दिवसभर सुरू असलेल्या पावसामुळे सायंकाळी ५ वाजेपर्यंत हा पाणीसाठा ८.६८ टीएमसी अर्थात २९.७८ टक्के इतका झाला. दिवसभरात त्यामुळे सुमारे १.२८ टीएमसीची वाढ नोंदविण्यात आली. तर एकूण क्षमतेच्या हा साठा ३० टक्के झाला आहे.
जलसंपदा विभागाने दिलेल्या माहितीनुसार दिवसभरात खडकवासला धरणात ७३ मिलिमीटर, पानशेतमध्ये ११६, वरसगावमध्ये ११३ तर टेमघर धरण परिसरात ९० मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली. चारही धरणांमध्ये एकूण १ हजार २८० दशलक्ष घनफूट पाण्याची आवक सुरू होती.
परिणामी पावसाचा जोर लक्षात घेऊन जलसंपदा विभागाने दुपारी १ वाजेपासून खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदीपात्रामध्ये १ हजार ९२० क्युसेकने विसर्गास सुरुवात आली. यानंतरही पावसाचा जोर कायम राहिल्याने सायंकाळी ६ वाजता हा विसर्ग ४ हजार ३४५ क्युसेक इतका करण्यात आला. तर तासाभरानंतर अर्थात सात वाजता विसर्ग साडेचार हजार क्युसेकने वाढवून एकूण ८ हजार ७३४ क्युसेक इतका करण्यात आला. पाणलोट क्षेत्रात रात्री पावसाचा जोर कायम राहणार असल्याने खडकवासला धरणामधून मुठा नदी पात्रात विसर्ग वाढविला जाऊ शकतो. त्यामुळे नदीपात्राशेजारील नागरिकांनी सतर्क राहावे, असा इशारा विभागाने दिला आहे.
पुणे शहरात संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालख्या दोन दिवस मुक्कामी आहेत .त्या पालख्यांना पाण्याची सोय व्हावी यासाठी नवीन मुठा कालव्यातून 50 क्युसेसने पाणी सोडण्यात आले आहे. अशी माहिती खडकवासला पाट्बंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता श्वेता कु-हाडे यांनी दिली. दरम्यान बंडगार्डन बंधा-यातून 36 हजार क्युसेसने पाणी सोडण्यात आले आहे.
सायंकाळी ५ वाजेपर्यंत जमा झालेला पाणीसाठा
धरण--पाऊस (मिमी)--टीएमसी--क्षमता (टक्के)
खडकवासला ७३-१.६६--८३.९५
पानशेत ११६--२.४६--२३.१३ वरसगाव ११३--४.१६--३२.४५
टेमघर ९०--०.४०--१०.८४
एकूण ८.६८ टीएमसी २९.७८ टक्के
गेल्या वर्षाची स्थिती
एकूण ३.६२ टीएमसी--१२.४३ टक्के