Maharashtra Weather Update: आता थंडीची चाहूल हळूहळू लागणार! ऑक्टोबर अखेर पावसाची सांगता होणार
By श्रीकिशन काळे | Updated: October 22, 2024 16:35 IST2024-10-22T16:35:10+5:302024-10-22T16:35:57+5:30
येत्या आठवड्याभरात नाशिक, जालना, संभाजीनगर, जळगांव, बुलढाणा, अमरावती, अकोला ह्या भागात थंडीला सुरवात होण्याचे संकेत मिळू लागले आहेत

Maharashtra Weather Update: आता थंडीची चाहूल हळूहळू लागणार! ऑक्टोबर अखेर पावसाची सांगता होणार
पुणे : सध्या राज्यात सुरू असलेला पाऊस आता विश्रांती घेणार असून, या मॉन्सूनची सांगता ऑक्टोबर अखेर होणार आहे. तसेच ‘ला-निना’ अजूनही दृष्टीपथात नाही, त्यामुळे लगेच थंडीची चाहूल महाराष्ट्रात लागण्याची शक्यता आहे, अशी माहिती सेवानिवृत्त हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली.
येत्या आठवड्याभरात नाशिक, जालना, संभाजीनगर, जळगांव, बुलढाणा, अमरावती, अकोला ह्या भागात थंडीला सुरवात होण्याचे संकेत मिळू लागले आहेत. दक्षिण महाराष्ट्रातील जिल्ह्यात मात्र ह्या आठवड्यात लगेच थंडी जाणवणार नाही. एक नोव्हेंबर नंतर मात्र संपूर्ण महाराष्ट्रात हळूहळू थंडीत वाढ होऊ शकते. जोपर्यंत 'ला- निना' अवतरत नाही तोपर्यंत ऑक्टोबर व नोव्हेंबर मध्ये थंडीची ही स्थिती कायमच टिकून राहू शकते. 'ला- निना' च्या हजेरीनंतर होणाऱ्या वातावरणीय बदलानुसार थंडीचे चढ-उतार, त्या-त्या वेळी नक्कीच स्पष्ट करता येतील.
सध्या काही ठिकाणी होत असलेला पाऊस शेतकामासाठी काहीसा अडचणींचा ठरत असला तरी आता हा पाऊस चांगल्या स्वरूपाचा असून, रब्बीची हंगामाची शेतजमीन बैठक तयार करण्यास मदत करणारा आहे, असे खुळे यांनी स्पष्ट केले.
हलक्या पावसाची शक्यता
राज्यामध्ये शनिवारी (दि.२६ ते २९) मंगळवारपर्यंतच्या चार दिवसात दक्षिण नगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, बीड, धाराशिव, लातूर, हिंगोली, नांदेड, परभणी, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा गोंदिया, चंद्रपूर अश्या १८ जिल्ह्यात ढगाळ वातावरण राहून तुरळक ठिकाणी मध्यम ते हलक्या पावसाची शक्यता जाणवते, असे हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी सांगितले.