पुणे : ‘परिस्थिती कशीही असो, कितीही संकटे समोर असोत. त्याला पाठ दाखवून पळू नका. तिच्याकडे संधी म्हणून बघा. त्याचा सामना करा. तुम्हाला यश नक्कीच मिळेल,’ असा सल्ला माजी कसोटीपटू व्हीव्हीएस लक्ष्मण यांनी नवोदितांना दिला. क्रिकेटने आपल्याला आयुष्य कसे असते ते शिकवले हे सांगायलाही ते विसरले नाहीत.
खेळामध्ये यशस्वी कारकिर्द घडवायची असेल, तर प्रत्येकाने सर्वात आधी मनातला आवाज ओळखायला शिकावे आणि स्वतःला समजून घ्यावे असा मार्मिक सल्ला व्ही.व्ही.एस. लक्ष्मण याने उदयोन्मुख खेळाडूंना दिला. यावेळी महाराष्ट्र रणजी संघाचे माजी कर्णधार सुरेंद्र भावे यांनी ५० वर्षीय लक्ष्मण यांची मुलाखत घेतली. त्यावेळी लक्ष्मण यांनी आपली क्रिकेट कारकीर्द उलगडून दाखवली. त्याचसोबत क्रिकेटने आपल्या आयुष्यात कसे धडे दिले तो प्रवासही उलगडला.
लक्ष्मण म्हणाले की, लहाणपणापासूनच मला क्रिकेटची आवड होती. माझे आई-वडील डॉक्टर होते. कारकीर्द म्हणून क्रिकेट निवडण्यासाठी त्यांनी मला पाच वर्षे दिली. या पाच वर्षात यश मिळाले नाही, तर मलाही डॉक्टरीपेशाकडे वळावे लागणार होते. मात्र, मी मेहनत घेतली. मी किती धावा केल्या हे त्यांच्यासाठी महत्त्वाचे नव्हते. मी माझे स्वप्न पूर्ण करण्यासाठी किती मेहनत घेत होतो, याला माझ्या कुटुंबीयांनी पाठिंबा दिला.’
आपल्या आयुष्यातील अनेक घटनांचे, अनेक लढतींचे उदाहरण देऊन त्यांनी उपस्थितांना खचून न जाण्याचा सल्ला दिला. ते म्हणाले, माझे रणजी पदार्पण निराशाजनक होते. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येही मला अनेक चढ-उतारांचा सामना करावा लागला. मात्र, आयुष्यात तुम्हाला नो-बॉल मिळतोच. म्हणजे जीवनदान मिळतेच. फक्त मिळालेल्या संधीचा फायदा करून घेता यायला हवा. लक्ष्मण यांनी १३४ कसोटींत ४५.९७च्या सरासरीने ८७८१ धावा केल्या. यात १७ शतके आणि ५६ अर्धशतकांचा समावेश होता. ते भारताकडून ८६ वन-डे सामनेही खेळले. त्याचबरोबर २६७ प्रथम श्रेणी सामन्यांत त्यांनी ५१.६४च्या सरासरीने १९ हजार ७३० धावा केल्या. एवढी मोठी कारकीर्द असेल, असा कधीही विचार केला नव्हता. निवड समितीला सल्ला देताना ते म्हणाले, की खेळाडूंमधील कौशल्य बघायला शिकले पाहिजे. त्याला पाठिंबा दिला पाहिजे. सचिन तेंडुलकरसारख्या व्यक्ती माझ्या आयुष्यात होत्या. त्यामुळेच ही कारकीर्द घडू शकली.
देवधरांच्या पुतळ्याचे अनावरण
पीवायसी हिंदू जिमखान्याच्या वतीने विंचूरकर पॅव्हेलियनच्या नूतनीकरण वास्तूचे, प्रवेशद्वाराचे व पुतळ्याचे औपचारिक उदघाटन व अनावरण माजी भारतीय क्रिकेटपटू व्ही.व्ही.एस लक्ष्मण यांच्या हस्ते करण्यात आले. देवधर परिवारापैकी डॉ. दिपक आठवले, वृषाली आठवले आणि आदित्य पावनगडकर यांच्या उपस्थितीत हा समारंभ पार पडला. यावेळी पीवायसी हिंदू जिमखानाचे अध्यक्ष कुमार ताम्हाणे, मानद सचिव दीपक गाडगीळ, सहसचिव सारंग लागू, माजी रणजीपटू सुरेंद्र भावे, माजी भारतीय क्रिकेटपटू केदार जाधव, दोशी इंजिनियर्सचे संचालक अमित दोशी, क्लबचे खजिनदार चंद्रशेखर नानिवडेकर, अविनाश रानडे, तन्मय आगाशे, सिद्धार्थ भावे, अभिषेक ताम्हाणे, नंदन डोंगरे, शिरीष साठे, आमोद प्रधान, महेंद्र गोखले, निरंजन गोडबोले, विनायक द्रविड, ज्योती गोडबोले, संयोगिता मोडक उपस्थित होते.
लक्ष्मण म्हणाले...
- जो चेंडू टाकला गेला, तो इतिहास होतो. त्यामुळे वर्तमानात जगा.- अशक्य काहीही नसते. फक्त शक्य करून दाखविण्याची तयारी असायला हवी.- आयुष्य प्रत्येक क्षणी तुमची परीक्षा बघेल. आयुष्यात अनेक अडथळे येतील.- अडथळ्यांचा सामना करण्याची हिंमत असायला हवी.- चांगले खेळाडू होण्यासाठी तुम्ही स्वत:शी प्रमाणिक राहा.- छोटी स्वप्ने न बघता, मोठी स्वप्न बघा. ते पूर्ण करण्यासाठी मेहनत करा.
Web Summary : VVS Laxman advises youngsters to face challenges head-on, seeing them as opportunities for growth. He emphasized self-awareness and perseverance, drawing from his own cricketing journey. He highlighted the importance of family support and seizing opportunities, citing his own experiences with setbacks and comebacks in cricket.
Web Summary : वीवीएस लक्ष्मण ने युवाओं को चुनौतियों का सामना करने और उन्हें विकास के अवसर के रूप में देखने की सलाह दी। उन्होंने अपनी क्रिकेट यात्रा से प्रेरणा लेते हुए आत्म-जागरूकता और दृढ़ता पर जोर दिया। उन्होंने पारिवारिक समर्थन और अवसरों को भुनाने के महत्व पर प्रकाश डाला, और क्रिकेट में अपनी असफलताओं और वापसी के अनुभवों का हवाला दिया।