अनैतिक संबंधातून चुलतीचा खून; बिबट्याच्या हल्ल्याचे रचले नाटक, दौंड तालुक्यातील खळबळजनक घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2025 11:14 IST2025-03-05T11:13:36+5:302025-03-05T11:14:50+5:30
‘बिबट्याने हल्ला करून ठार केले,’ असे खोटे सांगितले, शवविच्छेदन अहवालात हा मृत्यू बिबट्याच्या हल्ल्याने झालेला नसल्याचे स्पष्ट झाले

अनैतिक संबंधातून चुलतीचा खून; बिबट्याच्या हल्ल्याचे रचले नाटक, दौंड तालुक्यातील खळबळजनक घटना
यवत / वरवंड : दोन महिन्यांपूर्वी बिबट्याच्या हल्ल्याचे नाटक करून चुलतीचा खून करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. यवत पोलिसांच्या तपासादरम्यान पोलिस निरीक्षक नारायण देशमुख आणि फौजदार सलीम शेख यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून हा कट उघड झाला. चौकशीत आरोपीने खुनाची कबुली दिल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.
या प्रकरणी अनिल पोपट धावडे (रा. कडेठाण) व सतीलाल वाल्मीक मोरे (रा. चाळीसगाव) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे. ७ डिसेंबर २०२४ रोजी लता धावडे या महिलेचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला असल्याची घटना समोर आली होती. त्यानुसार पुतण्या अनिल धावडे यांनी तक्रार दिली होती. घटनास्थळी वन विभागाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी पंचनामा केला होता. महिलेला झालेल्या जखमा नक्की कशामुळे झाल्या, यासाठी व्हिसेरा तपासणीसाठी नागपूर येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आला होता. वैद्यकीय अहवालानंतर पोलिसांनी तपासाची सूत्रे फिरवून खरी घटना उघडकीस आणली आहे. ३ मार्च २०२५ रोजी पोलिस तपास सुरू असताना फौजदार सलीम शेख यांना गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार ऊसतोड मजूर सतीलाल मोरे हा संशयास्पद वाटला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता त्याने लता धावडे यांच्या खुनाची कबुली दिली. हा प्रकार समोर आल्यानंतर दौंड तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे. बिबट्याचा हल्ला म्हणून समजला गेलेला प्रकार हा खून असल्याचे उघड झाल्याने गावकरीही चकित झाले आहेत.
अनैतिक संबंध आणि पैशांचा व्यवहार
अनिल धावडे आणि त्याची चुलती लता धावडे यांच्यात अनैतिक संबंध होते. दोघे शेतात भेटत असत. मात्र, काही दिवसांपासून लता धावडे भेटायला येत नव्हती आणि पैशांची मागणी करत होती. त्यामुळे अनिल धावडेने सतीलाल मोरे याला ‘तुला दीड लाख रुपये देतो, आपण दोघे मिळून तिला संपवू,’ असे सांगितले. ठरल्याप्रमाणे सतीलाल मोरे आणि अनिल धावडे यांनी लता धावडे यांचा चेहरा व डोके ठेचून त्यांना ठार मारले. यानंतर कोणाला संशय येऊ नये म्हणून बिबट्याच्या हल्ल्याचा बनाव रचला. गावकऱ्यांना आणि पोलिसांना दिशाभूल करण्यासाठी दोघांनी मृतदेह शेताच्या बाजूला टाकून, ‘बिबट्याने हल्ला करून ठार केले,’ असे खोटे सांगितले. मात्र, शवविच्छेदन आणि नागपूर प्रयोगशाळेच्या अहवालात हा मृत्यू बिबट्याच्या हल्ल्याने झालेला नसल्याचे स्पष्ट झाले. यावरून पोलिसांनी सखोल तपास करत आरोपींना अटक केली. अनिल धावडे आणि सतीलाल मोरे यांना अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.