Mumbai Pune Expressway: प्रवासी अडकले कोंडीत;‘एक्सप्रेस-वे’ बंदमुळे पुणे विभागातील ‘ई-शिवनेरी’च्या ७३ फेऱ्या रद्द
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2026 12:54 IST2026-02-05T12:53:33+5:302026-02-05T12:54:47+5:30
Mumbai Pune Expressway Latest News: सकाळी गेलेल्या बस रस्त्यामध्येच अडकले असून, दिवसभर प्रवासी अडकून पडले होते. त्यामुळे प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागला.

Mumbai Pune Expressway: प्रवासी अडकले कोंडीत;‘एक्सप्रेस-वे’ बंदमुळे पुणे विभागातील ‘ई-शिवनेरी’च्या ७३ फेऱ्या रद्द
पुणे :पुणे-मुंबई ‘एक्सप्रेस-वे’वर झालेल्या टँकर अपघातामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. याचा परिणाम महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) बससेवांवर झाला आहे. परिवहन विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातून दादर, बोरिवली आणि ठाणे या ठिकाणी धावणाऱ्या ७३ ‘ई-शिवनेरी’ रद्द करण्यात आले. शिवाय सकाळी गेलेल्या बस रस्त्यामध्येच अडकले असून, दिवसभर प्रवासी अडकून पडले होते. त्यामुळे प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागला.
स्वारगेट आणि पुणे स्टेशन येथून दादर, बोरिवली आणि ठाणेदरम्यान ई-शिवनेरी बस धावतात. पुणे ते मुंबईदरम्यान दररोज प्रवास करणारे चाकरमान्यांना या ई-शिवनेरी बसचा वापर होतो; परंतु बुधवारी ‘एक्सप्रेस-वे’वर अपघात झाल्यामुळे पुण्यातून स्वारगेट आणि पुणे स्टेशनवरून धावणाऱ्या बस रद्द करण्यात आले. यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. शिवाय विविध विभागांमधील एकूण ६६ बसफेऱ्या रद्द करण्यात आल्या. यामध्ये ७३ ‘ई-शिवनेरी’ व ६६ इतर बसफेऱ्यांचा समावेश आहे. तसेच, या ‘एक्सप्रेस-वे’वर महाराष्ट्र राज्य परिवहन विभागाची एकूण १६३ वाहने वाहतूक कोंडीत अडकली होती. यामध्ये सातारा विभागातील ४६, सोलापूर विभागातील ३६, पुणे विभागातील २०, सांगली विभागातील १८, कोल्हापूर विभागातील १३, पालघर विभागातील १२, ठाणे विभागातील ११ आणि मुंबई विभागातील ७ वाहनांचा एसटी बसचा समावेश आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात येत असून, परिस्थितीचा आढावा घेऊन एसटी महामंडळाकडून पर्यायी व्यवस्था उभारण्यात आल्या आहेत. वाहतूक सुरळीत होताच बससेवा टप्प्याटप्प्याने पूर्ववत करण्यात येतील, असे महाराष्ट्र राज्य परिवहन विभागाने कळविले आहे.
प्रवाशाचे प्रचंड हाल :
स्वारगेट आणि पुणे स्टेशनवरून ठाणे, बोरिवली आणि दादरला जाणाऱ्या ई-शिवनेरी बसची संख्या जास्त आहे. शिवाय चाकरमानी दररोज अपडाऊन करतात; परंतु बुधवारी (दि.४) मुंबईकडे लेन बंद पडल्याने सकाळी स्वारगेट आणि पुणे स्टेशनवरून सुटलेल्या बस या मधेच अडकून पडले. त्यामुळे प्रवाशांचे हाल झाले. सकाळी ९ नंतर स्वारगेट आणि पुणे स्टेशनवरून मुंबईकडे जाणाऱ्या सर्व बस रद्द करण्यात आले. त्यामुळे काही प्रवासी ऐनवेळी रेल्वेचा आधार घेतला.
स्वारगेट आगारातून ठाणे, बोरिवली आणि दादरला जाणाऱ्या ५० फेऱ्या रद्द करण्यात आल्या. - संतोष बोगरे, आगारप्रमुख, स्वारगेट