अनाथ मुलींशी लग्न लावण्यासाठी उकळले पैसे,अज्ञातावर गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2025 15:54 IST2025-06-06T15:45:54+5:302025-06-06T15:54:56+5:30
अनाथ मुलींशी लग्न लावून देण्याच्या नावाखाली पुणे, अहिल्यानगर, रत्नागिरी आणि सोलापूर या भागातील शेकडो तरुणांची फसवणूक झाली

अनाथ मुलींशी लग्न लावण्यासाठी उकळले पैसे,अज्ञातावर गुन्हा
सासवड : अनाथांची माय अशी ओळख असलेल्या पद्मश्री डॉ. सौ. सिंधुताई सपकाळ यांच्या नावाचा गैरवापर होत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. अनाथ मुलींशी लग्न लावून देण्याच्या नावाखाली पुणे, अहिल्यानगर, रत्नागिरी आणि सोलापूर या भागातील शेकडो तरुणांची फसवणूक झाली असून, त्यांच्याकडून हजारो रुपये उकळण्यात आले आहेत. ही गंभीर बाब लक्षात येताच ममता बाल सदन (बालगृह) कुंभारवळण संस्थेचे अध्यक्ष दीपक गायकवाड यांनी सासवड पोलिस स्टेशनला तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या तक्रारीवरून सासवड पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरूद्ध आयपीसी ३१९ (२), ३१८ (४), ३५६ (२), ६६ (ड) कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे.
अनाथांची माय पद्मश्री डॉ. सौ. सिंधुताई सपकाळ यांनी अनाथ मुलींसाठी १९९३ साली ममता बाल सदन (बालगृह) कुंभारवळण (ता. पुरंदर) येथे अनाथ मुलींसाठी पहिला आश्रम सुरु केला. माईंनी आपले संपूर्ण आयुष्य अनाथ, निराधार व निराश्रित मुला-मुलींसाठी समर्पित केले. आज स्थितीत आश्रमात जवळपास ७५ मुली शिक्षण घेत असून, त्यातील काही मुली आता स्पर्धा परीक्षेची तयारी करीत आहेत. या संस्थेमार्फत मुलींचे शिक्षण, संगोपन आणि पुनर्वसन करण्यात येते.
पोलिसात तक्रार दाखल करा: ममता सिंधुताई सपकाळ
दुसऱ्याच्या गरजांचा फायदा उठवणारे हे जे कोणी आहेत, त्यांना कशाचीही भीती का बरे वाटत नसेल? मध्यंतरी आम्ही एक व्हिडीओ करून त्याद्वारे हे सत्य लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला होता. पण, आजच्या समाजाचं चित्रच इतकं विदारक आहे की, लग्नासाठी मुली मिळत नाहीयेत. त्यामुळे अशा जाहिरातींना लोकं बळी पडताना दिसत आहेत. त्यांची फसवणूक होत आहे. कुणालाही अशा प्रकारचे आमिष देऊन पैशांची मागणी केली, तर तत्काळ नजीकच्या पोलिसात तक्रार दाखल करा, असे आवाहन ममता सिंधुताई सपकाळ यांनी केले आहे.