Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2025 20:10 IST2025-06-25T20:09:02+5:302025-06-25T20:10:50+5:30
विरोधकांचा अवघ्या एका जागेवर विजय;शरद पवार गटाला सभासदांनी नाकारले

Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
माळेगाव - माळेगाव कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या निमित्ताने राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील निळकंठेश्वर पॅनलने २० जागा जिंकत नेतृत्वाचा करीश्मा सिध्द केला.तर गुरुशिष्यांचा सहकार बचाव पॅनलला अवघ्या एका जागेवर समाधान मानाने लागले.यामध्ये ज्येष्ठ नेते चंद्रराव तावरे निवडुन आले,तर रंजन तावरे यांना पराभवाला सामोरे जावे लागले.तसेच शरद पवार गटाला सभासदांना सपशेल नाकारले.या गटाला एकही जागा मिळालेली नाही.
उपमुख्यमंत्री पवार यांनी ब वर्गातून स्वत:ची उमेदवारी जाहिर करुन स्वतःचेच नाव चेअरमन पदासाठी घोषित केले.त्यामुळे या निवडणुकीला मोठे महत्व प्राप्त झाले.अजित पवार यांनी हि निवडणुक गांभीर्याने घेत स्वत:ची रणनिती आखली. सलग आठ ते दहा दिवस कारखाना कार्यक्षेत्रात तळ ठोकत सभासदांच्या गाठीभेटी घेत नाराजी दुर करण्याचा प्रयत्न केला. तसेच दहा ते बारा सभा घेऊन विरोधकांच्या आरोपांना तितक्याच तत्परतेने उत्तर देत निवडणुकीची हवा व निकाल आपल्या बाजूने वळवण्यात पवार यांनी यश मिळविले.
या निवडणुकीत अजित पवार यांनी अत्यंत प्रभावी आणि आक्रमक प्रचार केला.आपल्या भाषणात त्यांनी सलग पाच वर्ष राज्यातील इतर कारखान्यांपेक्षा आपल्या कारखान्याला जास्तीचा ऊसाला दर देणार,निवडून येणाऱ्या संचालकांना कोणतेही वाहन अथवा ड्रायव्हर मिळणार नाही, संचालकांना भत्ता मिळणार नाही,त्यांना फक्त चहा मिळणार,कारखान्याला राज्याचा व केंद्राचा निधी मिळवून देणार,कारखाना कार्यक्षेत्रातील रस्ते एस.आर.एस फंडातून करणार.रस्ते करण्यासाठी सभासदांचा एकही रुपया घेतला जाणार नाही,केंद्राचे व राज्याचे अनेक कारखान्याला आणण्यासाठी मदत करणार,संचालकाला कारखान्यातून एकही रुपयाचा उचल मिळणार नसल्याची भर सभेत घोषणा केली. अजित पवार यांच्या या घोषणांनी सभासदांमध्ये एक वादळ निर्माण झाले. सभासदांनी देखील अजित पवारांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून प्रचंड बहुमताने पॅनल विजयी केले.
मागील निवडणुकीत विरोधकांचे चार संचालक निवडून आलेले होते .त्यामध्ये स्वतः सहकारमहर्षी चंद्रराव तावरे व रंजन तावरे यांच्यासह ॲड.जि.बी.गावडे व प्रताप आटोळे यांचा समावेश होता. त्यानंतर प्रताप आटोळे यांनी अजित पवारांच्या नेतृत्वाखाली काम करण्यासाठी अजित पवारांच्या गटात जाण्याचा निर्णय घेतला.उर्वरीत तीन संचालक कारखान्याच्या अनेक बोर्ड मीटिंगला हजर राहिले नाहीत,सभासदांची बाजू उचलून धरली नाही, कामगारांची प्रश्न हाताळण्यासाठी तसेच मिटवण्यासाठी पुढाकार घेतला नसल्याचे मुद्दे उपमुख्यमंत्री पवार यांनी सभेत उचलुन धरले. त्यातूनच विरोधी वातारवण निर्माण करण्यात पवार यांना यश आले.परीणामी विरोधकांना मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागल्याचे मानले जाते.
शरद पवार गटाने सुप्रिया सुळे व युगेंद्र पवार यांच्या नेतृत्वाखाली बळीराजा सहकार बचाव पॅनलचे २० उमेदवार या निवडणुकीमध्ये उभे केले होते. त्यांच्या उमेदवारांनी साधारणपणे ५०० ते १००० मते घेतली. त्यांच्या उमेदवारांचा आणि मतांचा कुठलाही परिणाम अजित पवार यांच्या पॅनलवर झालेला नसल्याचे आजच्या निकालाने अधोरेखित झाले.