Maharashtra Kesari 2026: मी सरकारी नोकरीसाठी ४ ते ५ वर्ष झटलो; मात्र कुणीच दखल घेतली नाही, हर्षवर्धन सदगीरची खंत
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2026 14:28 IST2026-03-23T14:27:22+5:302026-03-23T14:28:37+5:30
Maharashtra Kesari 2026 २०२० सालीच महाराष्ट्र केसरी झाल्यावर मला सरकारी नोकरी मिळेल अशी अपेक्षा होती, त्यासाठी मी चार ते पाच वर्षे खूप झटलो

Maharashtra Kesari 2026: मी सरकारी नोकरीसाठी ४ ते ५ वर्ष झटलो; मात्र कुणीच दखल घेतली नाही, हर्षवर्धन सदगीरची खंत
पुणे : नाशिकच्या हर्षवर्धन सदगीर याने लौकिकाला साजेसा खेळ करत सोलापूरच्या महेंद्र गायकवाडवर ४-१ अशी मात केली आणि दुसऱ्यांदा मानाचा महाराष्ट्र केसरी किताब पटकावला. हे दोन्ही मल्ल अर्जुन पुरस्कार विजेते काका पवार यांच्या तालमीत तयार झालेले आहेत. महेंद्र गायकवाडचे पुन्हा एकदा विजेतेपदाचे स्वप्न भंगले.
रामकृष्ण अण्णा सातव पाटील यांच्या आयोजनातून पार पडलेल्या ६८व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेची अंतिम लढत तुल्यबळ होती. दोन्ही पैलवानांनी माघार न जोरदार लढत दिली. महेंद्रने सदगीरला बाहेर ढकलून पहिल्यांदा एक गुण मिळवला. त्यानंतर महेंद्रने नकारात्मक कुस्ती केल्यामुळे सदगीरला एक गुण देण्यात आला. दोन्ही पैलवान हप्ते डावाची पकड करण्याचा प्रयत्न करत होते, पण दोघांनाही यश आले नाही. त्यानंतर हर्षवर्धन सदगीरने महेंद्रची पकड घेत दोन गुण घेत ३-१ अशी आघाडी घेतली. त्यानंतर पुन्हा एक गुण घेत ४-१ अशी आघाडी घेतली. त्यानंतर गुण मिळवण्यात अपयश आल्याने महेंद्र हतबल झालेला दिसला. आघाडी कायम राखत हर्षवर्धनने मानाची गदा पटकावली.
हर्षवर्धनने महाराष्ट्र केसरी झाल्यावर आज श्रीमंत दगडूशेठ दर्शन घेतले. यावेळी त्याने सरकारी नोकरी न मिळाल्याची खंत माध्यमांशी बोलताना व्यक्त केली. हर्षवर्धन म्हणाला, २०२० सालीच महाराष्ट्र केसरी झाल्यावर मला सरकारी नोकरी मिळेल अशी अपेक्षा होती. त्यासाठी मी चार ते पाच वर्षे खूप झटलो. मात्र माझी दखल कुणीच घेतली नाही. आता नोकरी नाही मिळाली तरी चालेल मला हे हव ते मिळाल आहे अशी खंत काल महाराष्ट्र केसरीचा किताब मिळालेल्या हर्षवर्धन सदगीर यांनी व्यक्त केली आहे. सरकारी नोकरी कुणाला नको ,मात्र रिस्पॉन्स कोणाचा मिळत नसेन तर काय करायचं असा उद्विग्न सवाल सदगीरने विचारला आहे.
माती विभागात सोलापूरचे तर गादी विभागात कोल्हापूरचे वर्चस्व
माती विभागात सोलापूरच्या मल्लांचे वर्चस्व विशेष ठरले. महाराष्ट्र केसरी गटात सोलापूरच्या महेंद्र गायकवाडने हिंगोलीच्या सिकंदर शेखवर मात करत प्रथम क्रमांक पटकावला. तसेच ८६ किलो गटात मशीद शेख आणि ९७ किलो गटात रोहन पवार यांनी सुवर्ण कामगिरी करत सोलापूरची ताकद दाखवून दिली. याशिवाय माती विभागातील १० पैकी तब्बल ५ वजनी गटांत सोलापूर जिल्ह्याच्या मल्लांनी अव्वल स्थान मिळवत संपूर्ण स्पर्धेवर आपला ठसा उमटवला. ५७ किलो गटात कोल्हापूर जिल्ह्याच्या मृणाल पाटीलनेही उल्लेखनीय कामगिरी नोंदवत पहिले स्थान मिळवले.
गादी विभागातील विविध वजनी गटांमध्ये कोल्हापूर शहराच्या मल्लांनी वर्चस्व राखले. ५७ किलो गटात अक्षय ढेरे, ६१ किलोमध्ये वैभव पाटील, ७४ किलोमध्ये आदर्श पाटील, ९२ किलोमध्ये श्रेयस गाट आणि ९७ किलोमध्ये मोहन पाटील यांनी प्रथम क्रमांक पटकावला.