'इथे कधीच होणार नाही', तीर्थक्षेत्र आळंदीलगतचे कत्तलखाना आरक्षण रद्द करू - उदय सामंत
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2025 11:13 IST2025-06-04T11:12:22+5:302025-06-04T11:13:21+5:30
तपोवन आश्रम असणाऱ्या पवित्र स्थळी कत्तलखाना उभारण्याचा निर्णय म्हणजे हिंदू धर्म, अध्यात्म व परंपरेवर थेट हल्ला असल्याचा आरोप केला जात आहे

'इथे कधीच होणार नाही', तीर्थक्षेत्र आळंदीलगतचे कत्तलखाना आरक्षण रद्द करू - उदय सामंत
आळंदी : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीत जे आरक्षण आहे, ते आम्ही रद्द करू. कत्तलखाना इथे कधीच होणार नाही असा शब्द उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिला. तीर्थक्षेत्र आळंदीत ह.भ.प.प्रमोद महाराज जगताप यांच्या षष्ठ्यब्दीपूर्ती कृतज्ञता सोहळा आणि गौरवग्रंथ प्रकाशन सोहळा उद्योग मंत्री उदय सामंत हस्ते संपन्न झाला. त्यावेळी ते बोलत होते.
मराठी भाषेचा मंत्री झाल्यापासून सहा महिन्यांत तीनदा आळंदीला आलो आहे. ज्ञानेश्वरी ही सर्वसामान्यांच्या हातात पोहोचली पाहिजे, अशी लोकांची मागणी होती. त्यानुसार, पुढच्या आठ तासांत ज्ञानेश्वरीची छपाई करण्याचा निर्णय घेतल्याचं मी नमूद केलं. इतर क्षेत्रांप्रमाणेच वारकरी पंथातही पद्म पुरस्कार दिला पाहिजे, असं मत व्यक्त करत लवकरच गुरुवर्य शांतीब्रह्म मारोतीबाबा महाराज कुरेकर यांना 'पद्म पुरस्कार' मिळण्याची शिफारस करणार असल्याचे मंत्री सामंत यांनी सांगितले.
तीर्थक्षेत्र आळंदी लगत असणाऱ्या मोशी - डुडुळगाव परिसरात पिंपरी - चिंचवड महापालिकेने चार एकर जागेवर कत्तलखाना उभारण्यासाठी जागा आरक्षित केली आहे. या धक्कादायक निर्णयामुळे संपूर्ण हिंदू समाज, विविध हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि लोकप्रतिनिधींमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे या परिसरात राम मंदिर अयोध्याचे कोषाध्यक्ष पूज्य गोविंददेव गिरी महाराज यांचा वेदव्यास 'तपोवन' आश्रम असून हजारो विद्यार्थी त्याठिकाणी वेदिक शिक्षण घेत आहेत. अशा पवित्र स्थळी कत्तलखाना उभारण्याचा निर्णय म्हणजे हिंदू धर्म, अध्यात्म व परंपरेवर थेट हल्ला असल्याचा आरोप केला जात आहे.