इराण-इस्रायल संघर्षामुळे बासमती तांदळाच्या निर्यातीवर परिणाम;स्थानिक उत्पादक शेतकरी, व्यापाऱ्यांना मोठा फटका
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2025 19:01 IST2025-06-24T19:01:10+5:302025-06-24T19:01:33+5:30
भारतातून दरवर्षी निर्यात होणाऱ्या बासमती तांदळापैकी तब्बल २५ टक्के तांदूळ इराणला पाठवला जातो. सध्या सुरू असलेल्या संघर्षामुळे हे प्रमाण मोठ्या प्रमाणावर घटले आहे.

इराण-इस्रायल संघर्षामुळे बासमती तांदळाच्या निर्यातीवर परिणाम;स्थानिक उत्पादक शेतकरी, व्यापाऱ्यांना मोठा फटका
पुणे :इस्रायल-इराण संघर्षाचा भारताच्या तांदूळ निर्यातीवर मोठा परिणाम झाला आहे. बासमती तांदळाच्या दरात मोठी घसरण झाली आहे. भारतातून दरवर्षी निर्यात होणाऱ्या बासमती तांदळापैकी तब्बल २५ टक्के तांदूळ इराणला पाठवला जातो. सध्या सुरू असलेल्या संघर्षामुळे हे प्रमाण मोठ्या प्रमाणावर घटले आहे.
त्यामुळे तांदूळ उत्पादक शेतकरी व व्यापाऱ्यांना याचा फटका बसण्याची शक्यता आहे. यामुळे यावर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी शेतकरी व निर्यातदार व्यापाऱ्यांकडून केली जात आहे. गाझियाबादमधील धान्य बाजारात बासमती १५०९ तांदळाच्या दरात केवळ दोन दिवसांत २०० ते ३०० रुपयांची घसरण झाली आहे. काही व्यापाऱ्यांच्या मते ही घसरण ८०० रुपयांपर्यंत पोहोचली आहे.
वाणिज्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, गेल्या तिमाहीत इराणला बासमतीच्या निर्यातीत ३० टक्के घट झाली आहे आणि संघर्ष अधिक वाढल्यास ही घट ५० टक्क्यांपर्यंत पोहचू शकते. यामधून अंदाजे १५,००० कोटी रुपयांचे नुकसान होण्याची भीती वर्तवली जात आहे.
हे आहेत प्रमुख मुद्दे
- इराणने २१ ऑक्टोबर ते २१ डिसेंबर दरम्यान तांदूळ आयात बंदी घातल्यामुळे निर्यातीत घट.
- भारतातून निर्यात होणाऱ्या एकूण बासमती तांदळापैकी सुमारे २५ टक्के तांदूळ इराणला निर्यात केला जातो, मात्र इस्रायल-इराण संघर्षामुळे गंभीर परिणाम.
- गाझियाबादच्या बाजारात बासमती १५०९ या तांदळाच्या दरात २००-३०० रुपये प्रति क्विंटलने घट, शेतकऱ्यांचा नफा अर्ध्यावर.
- विमा कंपन्यांनी इराणला तांदूळ निर्यातीसाठी विमा देणे बंद केले आहे, त्यामुळे निर्यातीच्या शक्यता आणखी धोक्यात.
- लाल समुद्र मार्ग टाळून केप ऑफ गुड होप मार्ग वापरण्याची शक्यता, परिणामी वाहतूक खर्चात मोठी वाढ.
इराण-इस्रायल संघर्षाचा भारताच्या बासमती तांदूळ निर्यातीवर परिणाम झाला आहे. इराण सरकारने स्थानिक उत्पादनाला चालना देण्यासाठी दोन महिन्यांची आयात बंदी जाहीर केली आहे. त्यामुळे भारतातील २५ टक्के तांदूळ हा इराणला निर्यात केला जातो. यामुळे भारतातील तांदूळ उत्पादन शेतकरी व व्यापाऱ्यांना फटका बसत आहे. त्यात विमा कंपन्यांनी युद्धजन्य परिस्थितीमुळे इराणला निर्यातीसाठी विमा देण्यास नकार दिला आहे. त्यामुळे मालवाहतुकीचे खर्च वाढले. - राजेश शाह, बासमती तांदूळ निर्यातदार