पाकिस्तानचे ४८ तासांचे नियोजन भारतीय लष्कराने ८ तासांत उधळले; संरक्षण दल प्रमुखांची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2025 11:42 IST2025-06-04T11:41:31+5:302025-06-04T11:42:22+5:30
धर्माच्या नावाखाली घडविलेल्या या हत्या केवळ अमानवीच नव्हे, तर संपूर्ण देशाला हादरविणाऱ्या होत्या

पाकिस्तानचे ४८ तासांचे नियोजन भारतीय लष्कराने ८ तासांत उधळले; संरक्षण दल प्रमुखांची माहिती
पुणे: पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंंतर भारतीय लष्कराने मोठी कारवाई करीत पाकिस्तानला जोरदार प्रत्युत्तर दिले. त्यानंतर भारतालाही ४८ तासांत शरणागती पत्करण्यास प्रवृत्त करू, अशी वल्गना पाकिस्तानने केली होती. मात्र, भारतीय लष्कराने दिलेल्या उत्तराने पाकिस्तानची कारवाई अवघ्या आठ तासांतच संपविली, अशी स्पष्टोक्ती संरक्षण दल प्रमुख (चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ) अनिल चौहान यांनी दिली.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ‘संरक्षण आणि सामरिक अभ्यास विभागा’तर्फे ‘भविष्यातील युद्ध आणि युद्धतंत्र’ या विषयावर चौहान यांचे व्याख्यान आयोजित केले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी विद्यापीठाचे कुलगुरू सुरेश गोसावी, प्र-कुलगुरू पराग काळकर, प्रभारी कुलसचिव डॉ. चारुशीला गायके, संरक्षण आणि सामरिक अभ्यास विभागाचे प्रमुख विजय खरे आदी उपस्थित होते. चौहान यांनी पहलगाम आणि अन्य लष्करी कारवायासंदर्भातील अनेक बाबींवर त्यांनी भाष्य केले. तसेच ‘ऑपरेशन सिंदूर’बाबत त्यांनी पाकिस्तानच्या त्या फोनबाबतही भूमिका मांडली.
चौहान म्हणाले, “पहलगाम येथील दहशतवादी हल्ला भीषण होता. अनेकांना त्यांच्या कुटुंबीयांसमोर धर्म विचारून क्रूरपणे गोळ्या घातल्या. धर्माच्या नावाखाली घडविलेल्या या हत्या केवळ अमानवीच नव्हे, तर संपूर्ण देशाला हादरविणाऱ्या होत्या. या घटनेनंतर ‘ऑपरेशन सिंदूर’ ही त्यावरील तत्काळ आणि कठोर प्रतिक्रिया होती. भारत आणि पाकिस्तान दोन्ही देशांनी अनेक प्रकारच्या संरक्षण क्षमता आत्मसात केल्या आहेत. अशा परिस्थितीत धोका नेहमीच असतो. युद्धभूमीत क्षमतेची चाचणी घेतली जाते. येथे नेहमीच धोका असतो; पण, जोपर्यंत तुम्ही धोका पत्करत नाही तोपर्यंत तुम्ही यशस्वी होऊ शकत नाही. भारत आता दहशतवाद सहन करणार नाही. भारतावर हल्ला झाला, तर त्याचे प्रत्युत्तरही अधिक कठोर आणि अचूक दिले जाणार आहे. त्यामुळे ऑपरेशन सिंदूर अद्याप पूर्णपणे संपलेले नसून केवळ तात्पुरता शांतता करार झाला आहे. यासाठी सजग राहण्याची गरज आहे. पाकिस्तानने भारताला दहशतवादी कारवायांद्वारे वेठीस धरू नये. भारत आता दहशतवाद आणि अणुबॉम्बच्या दहशतीखाली जगणार नाही,” असेही जनरल चौहान यांनी स्पष्ट केले.
पराभव महत्त्वाचा नाही, निकाल महत्त्वाचा आहे : चौहान
ते म्हणाले, “युद्धभूमी ही क्षमतेची परीक्षा असते. येथे नेहमीच धोका असतो; पण, जोपर्यंत तुम्ही जोखीम घेत नाही तोपर्यंत तुम्ही यशस्वी होऊ शकत नाही. पराभव महत्त्वाचा नाही; पण, निकाल महत्त्वाचा आहे. व्यावसायिक लष्करावर पराभवाचा कोणताही परिणाम होत नाही. पाकिस्तानने प्रायोजित दहशतवाद थांबवावा, हा ‘ऑपरेशन सिंदूर’मागील विचार आहे. आपल्याकडे चांगल्या काउंटर ड्रोन सिस्टीम आहेत, याची आम्हाला माहिती होती.”
काही वर्षांनंतर ‘यंत्र विरुद्ध यंत्र’ युद्ध होण्याची शक्यता
जमीन, सागरी आणि हवाई अशा पारंपरिक क्षेत्रांबरोबरच आता अवकाश, सायबर, सेन्सर्स, प्रगत साहित्य, हायपरसोनिक्स, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मोठा डेटा अशा अनेक क्षेत्रांपर्यंत युद्धाचा विस्तार झाला आहे. लष्करी कारवायांमधील पहिली क्रांती ही हाताने युद्ध करण्याशी संबंधित होती, ती जमिनीवरील आणि हवाई गतिशीलतेतील प्रगतीमुळे घडली. दुसरी क्रांती नेट केंद्रित होती, ज्यामध्ये माहिती अनन्यसाधारण महत्त्वाची बनली. आधी माणसा-माणसांत युद्ध व्हायचे. आता आपण अशा वळणावर आहोत, जेथे मानव आणि यंत्र यात युद्ध होऊ शकते आणि आगामी काळात यंत्र विरुद्ध यंत्र असे युद्ध पाहायला मिळेल.
पुन्हा एकदा १९६५ च्या कराराचा उल्लेख
१९६५ मध्ये झुल्फिकार अली भुट्टो यांनी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेला संबोधित करताना भारताविरुद्ध हजार वर्षांचे युद्ध घोषित केले होते. झिया-उल-हक यांनी या युद्धाच्या विशिष्ट सिद्धान्ताला मूर्त स्वरूप दिले. तेव्हापासून आपली राजकीय उद्दिष्टे साध्य करण्यासाठी दहशतवादाचा वापर एक साधन म्हणून पाकिस्तान करीत आहे. याबाबत अनेक पाश्चात्त्य युद्ध अभ्यासकांनीदेखील पाकिस्तानचे वरिष्ठ राजकीय आणि ‘आयएसआय’च्या अधिकाऱ्यांचा दाखला दिला आहे.