येणाऱ्या काळात ‘मुख्यमंत्री’ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचाच; दत्तात्रय भरणे यांचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2022 13:19 IST2022-10-26T13:05:03+5:302022-10-26T13:19:12+5:30
राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळण्याची गरज

येणाऱ्या काळात ‘मुख्यमंत्री’ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचाच; दत्तात्रय भरणे यांचा दावा
बारामती : अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे सर्वसामान्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांना मदत मिळालेली नाही. माध्यम जनतेमध्ये जातात. त्यांनी सर्वसामान्यांचा रोष जाणुन घ्यावा, त्यांची भावना जाणून घेतल्यानंतर तुम्हाला समजेल आगामी निवडणुकीत मुख्यमंत्रीराष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचाच असेल, असा दावा माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केला आहे.
बारामती येथे गोविंदबागेत ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासह अजित पवार आदी पवार कुटुंबियांना भरणे यांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी भरणे यांनी राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळण्याची गरज असल्याचे स्पष्ट केले. लोकांना केवळ घोषणाबाजी आवडत नाही. तर मदतीची गरज आहे, त्यामुळे सध्या सत्ताधाऱ्यांनी शेतकऱ्यांकडे लक्ष द्यावे. त्यामुळे याचा रोष आगामी विधानसभा निवडणुकीत दिसेल, मुख्यमंत्रीराष्ट्रवादी काँग्रेसचाच होईल, असे भरणे म्हणाले.
सर्वसामान्य शेतकरी अतिवृष्टीत मोठे नुकसान झाले आहे. त्यांना मदत मिळाली पाहिजे. सरकारने मदत करावी. मदत करणे हे सरकारचे कर्तव्य आहे. यंदा अनेक सर्वसामान्य गोरगरीबांची दिवाळी साजरी झालेली दिसत नाही. मराठा समाज, धनगर आरक्षण प्रश्न, एसटी कामगार प्रश्नाबाबत राज्य सरकाने लक्ष घालण्याची मागणी भरणे यांनी केली.
संपुर्ण राज्यातून लोक गोविंदबागेत येतात. ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर उर्जा मिळते. साहेबांचा आशिर्वाद वर्षभर आम्हाला काम करण्याची शक्ती आम्हा सर्वांना देतो. आमचे कामकाज करण्यासाठी या प्रेरणा उर्जेचा उपयोग होतो. ते एक चालत बोलत विद्यापीठ आहे. आम्हा कार्यकर्त्यांसाठी ते दैवत असल्याचे भरणे यांनी सांगितले.