अमित शहांचा कोल्हापूर दौरा सुरक्षित करायचा असेल तर.... : राजू शेट्टी यांनी केली 'ही' मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2019 16:13 IST2019-01-14T16:07:32+5:302019-01-14T16:13:17+5:30
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांचा आगामी कोल्हापूर दौरा सुरक्षित करायचा असेल ऊस उत्पादक सरकारने शेतकऱ्यांची थकीत एफआरपीची संपूर्ण रक्कम द्यावी असे विधान खासदार राजू शेट्टी यांनी पुण्यात केले आहे.

अमित शहांचा कोल्हापूर दौरा सुरक्षित करायचा असेल तर.... : राजू शेट्टी यांनी केली 'ही' मागणी
पुणे : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांचा आगामी कोल्हापूर दौरा सुरक्षित करायचा असेल ऊस उत्पादक सरकारने शेतकऱ्यांची थकीत एफआरपीची संपूर्ण रक्कम द्यावी असे विधान खासदार राजू शेट्टी यांनी पुण्यात केले आहे.
राज्यातील १८८ साखर कारखान्यांपैकी केवळ १० टक्के कारखान्यांनी पूर्ण एफआरपी शेतकऱ्यांना दिली आहे. उर्वरित ८० कारखान्यांनी २५ टक्के तर ७४ टक्के कारखान्यांनी एकही रुपया दिलेला नाही. त्यामुळे एकूण ७ हजार ४५० कोटी रुपयांपैकी २ हजार ८७४ कोटी रुपये शेतकऱ्यांपर्यंत पोचले असून उर्वरित रकमेसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. याबाबत त्यांना नोटीसा पाठवल्या आहेत, पत्रके पाठवली आहेत. हे सर्व कारखान्यांवर कारवाई व्हायला हवी असे शेट्टी म्हणाले.
याबाबतचा हवाला देताना शेट्टी यांनी ऑक्टोबर महिन्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेले विधान सांगितले. वेळप्रसंगी शेतकऱ्यांच्या एफआरपीसाठी तिजोरी रिकामी करू असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले असताना आता ती तिजोरी आणि तिची चावी कुठे आहे असा सवालही त्यांनी विचारला. २४ तारखेला शहा यांचा दौरा सुरक्षित करायचा असेल तर त्याआधी एफआरपीची थकीत रक्कम शेतकऱ्यांना द्यावी अन्यथा शेतकरी त्यांना बघून घेतील असा सूचक इशारा त्यांनी दिला.