शासकीय अधिकाऱ्यांवर गाडी घातल्यास मोक्का लावणार; अजित पवार यांनी ठणकावून सांगितले
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2025 10:00 IST2025-06-10T09:59:28+5:302025-06-10T10:00:12+5:30
तशी धमक सरकारमध्ये आहे. आता हे प्रत्यक्ष कृतीत आणू, असे सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वाळू माफियांवर मोक्का लावणार असल्याचे ठणकावून सांगितले.

शासकीय अधिकाऱ्यांवर गाडी घातल्यास मोक्का लावणार; अजित पवार यांनी ठणकावून सांगितले
पुणे : प्रशासकीय अधिकारी आपले काम करत असतात. अवैध वाळू उत्खनन रोखण्यासाठी आणि कारवाई करण्यास जातात. त्यावेळी काही मस्तवाल लोक त्यांच्यावर गाडी घालण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे अशा वाळू माफियांची मस्ती उतरावी लागेल. तशी धमक सरकारमध्ये आहे. आता हे प्रत्यक्ष कृतीत आणू, असे सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वाळू माफियांवर मोक्का लावणार असल्याचे ठणकावून सांगितले. त्यांना चक्की पिसिंग करायला लावणार आहे, त्याशिवाय हे वाळू माफिया सरळ होणार नाही, असेही पवार यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने आयोजित महसूल लोकअदालतीत ते बोलत होते. यावेळी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आमदार बापू पठारे, भीमराव तापकीर, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, अतिरिक्त जिल्हाधिकारी सुहास मापारी उपस्थित होते.
पवार म्हणाले, प्रशासन आपली जबाबदारी बजावत असताना जे गुन्हेगारीवृत्तीने काम करतात, अशांविरोधात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यानुसार (मकोका) कारवाई केली पाहिजे. त्यादृष्टीने कायद्यात बदल करणे गरजेचे आहे. अशा लोकांची मस्ती कमी करण्याचे काम आम्ही करू.
नागपूर जिल्ह्यात महसूल विभागाला अत्याधुनिक बहुउद्देशीय (मल्टिपर्पज) वाहने देण्याचा निर्णय यापूर्वी सरकारने घेतला असून राज्यातील पुणे, नाशिक, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, कोकण महसुली विभागीय मुख्यालयांच्या ठिकाणीदेखील यावर्षी अशी वाहने महसूल विभागाला देण्यात येतील, अशी घोषणा ही त्यांनी यावेळी केली.
या महसूल अदालतीत जवळपास ११ हजार महसुली दावे तडजोडीने निकाली निघणार असल्याने महसूल विभाग आणि न्याय व्यवस्थेवरीलही ताण कमी होणार आहे. उर्वरित २० हजार दावेही अशा महसूल अदालतीचे आयोजन करून तडजोडीने निकाली काढावेत. सरकारचे जे विभाग अधिकाधिक महसूल शासनाच्या तिजोरीत आणतील त्यांना त्याप्रमाणात प्रोत्साहन निधी देण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती पवार यांनी दिली.
राज्य सरकारतर्फे विविध शासकीय इमारती उभारण्यात येत आहेत. यशदा येथे मसुरीच्या धर्तीवर राज्यातील अधिकाऱ्यांसाठी देशात इतर कोणत्याही राज्यात नसेल असे भव्य प्रशिक्षण केंद्र उभारण्यात येणार आहे. त्यासाठी १२० एकर जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे, अशी माहितीदेखील उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.