उच्चशिक्षण क्षेत्राला ‘सीएचबी’चा लकवा..! प्राध्यापक भरतीकडे सर्वांचे लक्ष;सरकारकडून नुसती आश्वासने अन् गाजर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2025 13:38 IST2025-06-27T13:36:32+5:302025-06-27T13:38:16+5:30

- शिक्षणाची गंगा घराेघरी पाेहाेचावी. समाज शिक्षित व्हावा. सर्वसामान्यांची मुलं शिकून साहेब व्हावीत, या ध्यासाने संत आणि महापुरुषांनी कार्य केले.

Higher education sector paralyzed by CHB All eyes on professor recruitment; Only promises and carrots from the government | उच्चशिक्षण क्षेत्राला ‘सीएचबी’चा लकवा..! प्राध्यापक भरतीकडे सर्वांचे लक्ष;सरकारकडून नुसती आश्वासने अन् गाजर

उच्चशिक्षण क्षेत्राला ‘सीएचबी’चा लकवा..! प्राध्यापक भरतीकडे सर्वांचे लक्ष;सरकारकडून नुसती आश्वासने अन् गाजर

उद्धव धुमाळे 

पुणे : घरची परिस्थिती फारच बिकट... इतकी भीषण की दिवसभर काबाड कष्ट केलं तरच रात्रीची चूल पेटते. त्यातूनही शिक्षणाची ओढ असल्याने रात्रीचा दिवस करून आम्ही शिकलाे. प्राध्यापक हाेणार आणि पुढील पिढी घडविणार हे उराशी स्वप्न हाेते. त्यामुळे मिळेल तसं अर्थ वेळ किंवा काही तास कष्टाची कामे करून शिक्षणाचा खर्च उभा केला. एम.ए.,एम.एस्सी, एम.टेक., एम.ए., आदी त्या-त्या विभागांतील पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. प्राध्यापक हाेण्यासाठी सेट-नेट परीक्षाही उत्तीर्ण झालाे. विशेष म्हणजे संशाेधन क्षेत्रातही मागे न राहता पीएच.डी. केली. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवर संशाेधन पेपर सादर केले, तरीही कायमस्वरूपी नाेकरी काही मिळेना. त्यामुळे मागील पंधरा-वीस वर्षांपासून तासिका तत्त्वावर (सीएचबी) किंवा करार पद्धतीने काम करीत आहे. ही व्यथा आहे सुरेश, किशाेर, सुधाकर, शिवाजी, राजर्षी, मनीषा, ज्याेती, पल्लवी आणि यांच्यासारख्या अनेकांची.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील अनेक विभागांमध्ये केवळ एक-दाेन प्राध्यापक आहेत. विभागांतील रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू असून, यात प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक आणि सहायक प्राध्यापक अशा १११ पदांची प्रक्रिया सुरू आहे. याबाबतची सद्य:स्थिती काय ? अशी विचारणा केली असता अर्जांची पडताळणी सुरू आहे, असे सांगितले जात आहे.

दरम्यान, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने क्यूएस वर्ल्ड रँकिंगमध्ये विद्यापीठाने जगात ५६६ व्या स्थानी झेप घेतली. भक्ती-याेग कार्यक्रमानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील विद्यापीठात आले असता भरती प्रक्रियेला सरकारने मान्यता दिली असून, ती लवकरच राबविले जाईल, अशा शब्दांत आश्वस्त केले हाेते. त्यावर कुलगुरू डाॅ. सुरेश गाेसावी यांच्याकडे विचारणा केली असता, भरती प्रक्रियेला गती दिली जाईल. पंधरा दिवसांत पुढील टप्पा पार पडेल, असे सांगितले. त्याचबराेबर विद्यापीठ पातळीवर करार पद्धतीने काही जागा भरल्या जातील, असे स्पष्ट केले हाेते. त्यानुसार करार पद्धतीने भरती करण्यासाठीची जाहिरातदेखील प्रसिद्ध झाली आहे; पण कायमस्वरूपी भरतीचं काय ? हा प्रश्न इच्छुक उमेदवारांना पडला आहे.

सहन हाेईना अन् सांगताही येईना

शिक्षणाची गंगा घराेघरी पाेहाेचावी. समाज शिक्षित व्हावा. सर्वसामान्यांची मुलं शिकून साहेब व्हावीत, या ध्यासाने संत आणि महापुरुषांनी कार्य केले. ‘हातावर भाकर खा, पण मुलांना शिकवा. माेठा साहेब बनवा. जाे शिकत नाही त्याची अवस्था खटाराच्या बैलाप्रमाणे हाेईल,’ असे संत गाडगेबाबा सांगत. पण, शासन धाेरणांमुळे मागील वीस-तीस वर्षांत अशी स्थिती झाली आहे की, उच्च शिक्षण घेतलेल्यांच्या काेपऱ्याला गूळ लावून दिवस-रात्र राबून घेतले जात आहे. त्यांचे आर्थिक-मानसिक-शारीरिक छळ हाेत असून, ते सहन हाेईना आणि काेणाला सांगताही येईना, अशी त्यांची अवस्था झाली आहे.

याबाबत अतिशय दुर्गम भागातील सामान्य शेतकरी कुटुंबातला पहिल्या पिढीचा शिक्षित आणि मागील १५ वर्षांपासून पुण्यात ‘सीएचबी’वर काम करणारा प्रा. शिवम म्हणतात, चांगली नाेकरी मिळेल. पुढची आदर्श पिढी घडविण्याचे भाग्य मिळेल, या अपेक्षेने धडपड करीत आहे. यातच अर्धे वय उलटले. आमची अवस्था वेटबिगारी माणसापेक्षा वाईट झाली आहे. आता तरी भरती हाेऊन आधार मिळेल ही अपेक्षा आहे.

आमच्या संयमाचा अंत पाहू नका..!

मागील अनेक वर्षांपासून नाेकरीपासून वंचित असलेला डाॅ. सुधीर म्हणाले, मी २००८ सालापासून कधी तासिका, तर कधी करार तत्त्वावर नाेकरी करीत आहे. आज ना उद्या भरती सुरू हाेईल आणि आपल्यालाही अच्छे दिन येतील, या आशेवर काम करीत आहे. पण, जे वाट्याला येत आहे ते इतके भयानक आहे की, ते सहन हाेत नाही आणि काेणाला सांगू पण शकत नाही. वयाची पन्नाशी जवळ आली तरी ना घर, ना नाेकरीचा ठाव-ठिकाणा, त्यामुळे कुणी पाेरगीही देईना. सरकार बेराेजगार तरुणाईच्या संयमाचा अंत न पाहता पारदर्शकपणे आणि तत्काळ भरती करावी ही अपेक्षा आहे.

नवी अस्पृश्यता थांबणार कधी ?

शिक्षण क्षेत्रात सीएचबी आणि कायमस्वरूपी यांच्यात एक प्रकारची नवी अस्पृश्यता तयार झाली आहे. घाण्यावर जुंपलेल्या बैलाप्रमाणे आमची अवस्था झाली आहे. सरकार आठवड्यातील केवळ नऊ तास ‘सीएचबी’साठी ठेवतंय; पण महाविद्यालयामधील कायमस्वरूपी प्राध्यापक, प्राचार्य मात्र त्याच्याकडून दरराेज बारा-बारा तास काम करून घेतात. वर्षभरात केवळ नऊ ते दहा महिने काम. त्यातही तास हाेतील त्याप्रमाणे मानधन निघणार. महाविद्यालयाने मानधन काढले तरी उच्चशिक्षण सहसंचालक त्यात त्रुटी काढून आडून ठेवणार, असे करून सर्वच पातळीवर शाेषण आणि शाेषण सहन करावं लागत आहे, असे प्रा. श्रीधर सांगत हाेता. आता बास! हे थांबलं पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त करीत हाेता. 

Web Title: Higher education sector paralyzed by CHB All eyes on professor recruitment; Only promises and carrots from the government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.