सरकारने शेतकऱ्यांना मदतीची आशा दाखवून केला लुटण्याचा प्रकार, बारामतीत शेतकरी वर्गातून संतप्त प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2021 15:15 IST2021-05-16T15:15:10+5:302021-05-16T15:15:18+5:30
रासायनिक खतांच्या किमतीत वाढ, शेतकऱ्याच्या कंबरेचे सोडून त्याच्याच डोक्याला बांधण्याचा प्रकार

सरकारने शेतकऱ्यांना मदतीची आशा दाखवून केला लुटण्याचा प्रकार, बारामतीत शेतकरी वर्गातून संतप्त प्रतिक्रिया
बारामती: किसान सन्मान योजनेचे पैसे जमा केल्यानंतर लगेच आगामी खरीप हंगामाच्या तोंडावर रासायनिक खतांच्या किंमती ३० ते ४० टक्क्यांनी वाढवण्यात आल्या आहेत. हे म्हणजे शेतकऱ्याच्या कंबरेचे सोडून त्याच्याच डोक्याला बांधण्याचा प्रकार आहे. सरकारने आम्हाला मदतीची आशा दाखवून लुटण्याचा प्रकार केला असल्याच्या संतप्त प्रतिक्रिया शेतकरी वर्गामध्ये उमटू लागल्या आहेत.
रासायनिक खतांच्या किंमतीचे नियंत्रण पूर्णपणे केंद्र सरकारकडे असते. सलग दुसऱ्या वर्षी कोरोना संकटाचा सामना करत शेतकरी वर्गाकडून खरिपाची तयारी सुरू आहे. तर बागायती पट्ट्यात देखील याच सुमारास ऊस लागवडी केल्या जातात. नेमकी हीच वेळ साधत रासायनिक खतांच्या किंमती वाढवण्यात आल्या आहेत. परिणामी शेतकऱ्याच्या उत्पादन खर्चाचे गणित कोलमडणार आहे.
कोरोना संकटामुळे अनेक ठिकाणी शेतमालाला कवडीचीही किंमत मिळत नसल्याचे वास्तव आहे. त्यामुळे आगामी हंगामात भांडवल कसे उभे करायचे या विवंचनेत शेतकरी असतानाच रासायनिक खतांच्या किंमतीत ३० ते ४० टक्क्यांनी वाढ करण्यात आली. इंधनदरवाढीमुळे मशागतीचा देखील खर्च वाढला आहे. आता खतांच्या किंमती सुद्धा वाढल्याने शेतकरी मेटाकुटीला येणार आहे. दोन ते तीन दिवसांपूर्वी केंद्र सरकारने किसान सन्मान योजने अंतर्गत तीन महिन्यातून एकदा २ हजार याप्रमाणे पैसे जमा केले. त्यानंतर लगेच रासायनिक खतांच्या किंमती वाढल्याने शेतकऱ्यांना मदत केल्यासारखे दाखवून लुटण्याचा हा प्रकार असल्याचा आरोप शेतकरी संघटनानी केला आहे.