पुणे : सिंधुताई सपकाळ यांच्या आश्रमात लग्नासाठी मुली आहेत. असं म्हणत अनेकांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सोशल मीडियावर अशा प्रकारचे मॅसेज तयार करून ते व्हायरल केले जातात. आणि त्यानंतर समोरून व्यक्तीने फोन केल्यानंतर या सगळ्या संदर्भातली माहिती दिली जाते. त्यानंतर नोंदणी साठी पंधरा हजार रुपये फोन पे किंवा गुगल पे ने मागवले जातात. एकदा पैसे मिळाल्यानंतर फोन बंद केला जातो. किंवा फोन उचलला जात नाही. दरम्यान अशा प्रकारे फसवणूक होत असल्याचं लक्षात आल्यानंतर एका व्यक्तीने सिंधुताई सपकाळ यांची मुलगी ममता सपकाळ यांच्यापर्यंत पोहोचला.
त्यानंतर ममता सपकाळ यांनी देखील आम्हाला लग्नासाठी मुलगी हवी आहे. तुमच्याकडे मुलगी आहे का? अशा आशयाने फोन करत सगळ्या प्रकाराची शहानिशा केली. त्यावेळी देखील समोरून पंधरा हजार रुपयाची मागणी करण्यात आली. शिवाय सगळे डिटेल देखील मागण्यात आले. याबाबत त्यांच्याशी संवाद साधत ममता सपकाळ यांनी संताप व्यक्त केला आहे. माईंच्या कुठल्या संस्थेमध्ये ज्या माईंच्या मुलींच्या संस्था आहेत. तिथे पैसा घेतला जात नाही. एकही पैसा हा नवरा मुलाकडनं घेतला जात नाही. एका घरातनं जशी मुलगी सासरी जाते तशी आमच्या संस्थेतून जाते. आमचे सगळे हितचिंतक, आमचे सगळे पाठीराखे, आमचे आश्रयदाते आमचे देणगीदार हे सगळे त्यावेळेला आमच्या सोबत असतात. असे ममता सपकाळ यांनी लोकमतशी बोलताना सांगितले आहे.
पंधरा हजार भरा, दहा हजार भरा. बरं ज्यांनी पैसे भरलेत नंतर ते अ नंतर तो फोन बंद होणं. आणि लोकांची अशा प्रकारे दिशाभूल होणं हा प्रकारचं मुळात अतिशय संतापजनक आहे. अतिशय चीड आणणारा आहे. आणि या पद्धतीने लोकांचा गरीब लोक जे कोणी तिथे पैसे भरत असेल ज्या कोणाच्या हतबलतेचा फायदा तिथे घेतला जातोय अतिशय वाईट आहे तर माझी सगळ्यांना विनंती आहे की, कृपया प्रत्येकानी ह्या विषयाला मनावर घ्या हे कोण आहेत कुठे असतात ही लोकं शोधून काढा आणि हे थांबवा! असे आवाहन त्यांनी केले आहे. दरम्यान अशा प्रकारे लोकांची फसवणूक होत असल्याचं लक्षात आल्यानंतर ममता सपकाळ यांनी पुणे पोलिसात या प्रकरणी तक्रार दिली आहे.
अर्थात सिंधुताई सपकाळ यांच्या नावाने अशा प्रकारे फसवणूक होत असल्याचं पाहून ममता सपकाळ यांनी चिंता व्यक्त केली. तसेच सध्या सिंधुताई सपकाळ यांच्या आश्रमात लग्नासाठी कुणीही मुलगी नाही. अशा प्रकारचा फोन आल्यास किंवा सोशल माध्यमातून माहिती मिळाल्यास नागरिकांनी विश्वास ठेऊ नये. असं आवाहनही त्यांनी केलंय.