पारगावमध्ये उसाच्या पाचटाला आग; एका शेतकऱ्याचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2026 18:32 IST2026-02-22T18:25:00+5:302026-02-22T18:32:04+5:30
धुराचे मोठे लोट आणि ज्वाळांचा वेग यामुळे शेतकरी भाडळे यांना शेताबाहेर पडता आले नाही.

पारगावमध्ये उसाच्या पाचटाला आग; एका शेतकऱ्याचा मृत्यू
केडगाव : उसाच्या शेतातील पाचट जाळताना वाऱ्याचा वेग वाढल्याने लागलेल्या आगीत शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना दौंड तालुक्यातील पारगाव (ता. दौंड) येथे घडली. या अपघातात जालिंदर भालचंद्र भाडळे (वय ६९) यांचा मृत्यू झाला असून परिसरात शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भाडळे यांनी ऊस तोडणी पूर्ण झाल्यानंतर शेतात उरलेले पाचट जाळण्यासाठी (दि. २२) दुपारी १.३० वाजण्याच्या सुमारास आग लावली. सुरुवातीला नियंत्रित असलेली आग काही वेळातच वाऱ्याचा वेग वाढल्याने भडकली. आगीने अचानक तीव्र रूप धारण करत संपूर्ण शेताला वेढा घातला.
धुराचे मोठे लोट आणि ज्वाळांचा वेग यामुळे भाडळे यांना शेताबाहेर पडता आले नाही. काही वेळानंतर शेजारील शेतकऱ्यांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी शोधाशोध सुरू केली. त्यावेळी भाडळे गंभीररीत्या भाजलेल्या अवस्थेत आढळले. यावेळी त्यांना तत्काळ केडगाव येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी अंती मृत घोषित केले. घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी यवत येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला.
या दुर्दैवी घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त होत असून शेतकरी बांधवांकडून शोक व्यक्त केला जात आहे. दरम्यान, उसाचे पाचट जाळताना वाऱ्याचा वेग, हवामानाची स्थिती आणि आवश्यक सुरक्षात्मक उपाय यांचा विचार करणे अत्यावश्यक असल्याचे कृषी जाणकारांनी सांगितले आहे. योग्य खबरदारी न घेतल्यास अशा प्रकारच्या दुर्घटना टाळणे कठीण असल्याचेही त्यांनी नमूद केले.