जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील पावसाने शेतकऱ्यांचे नुकसान; बाजरी पिके भुईसपाट
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2025 09:31 IST2025-05-31T09:31:39+5:302025-05-31T09:31:53+5:30
बांगरवाडी येथे जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे काही वेळातच नद्या-नाल्यांना पूर आला.

जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील पावसाने शेतकऱ्यांचे नुकसान; बाजरी पिके भुईसपाट
बेल्हा : जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागात गेल्या ११ दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. मे महिन्यात पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. या पावसाने शेतकऱ्यांच्या शेतमालाचे नुकसान केले आहे.
बांगरवाडी येथे जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे काही वेळातच नद्या-नाल्यांना पूर आला. अनेक भागांमध्ये पावसाने नुकसान केले असून, आंब्याचे नुकसान झाले आहे. वादळाने कैऱ्या पडल्याने हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरवला आहे. तसेच उन्हाळी बाजरी भुईसपाट झाली आहे. गेल्या ११ दिवसांपासून संततधार सुरू असलेल्या पावसामुळे वातावरणामध्ये गारवा पसरला आहे.
काही ठिकाणी बीट काढणी चालू असल्यामुळे बिटाच्या शेतामध्ये पाणी साठल्याने काढणी खोळंबली आहे. कांद्याच्या शेतामध्येसुद्धा पाणी साठल्याने कांदा सडू लागला आहे. पूर्व भागातील आणे, पेमदरा, गुळूंचवाडी, नळावणे, शिंदेवाडी, तांबेवाडी आदी गावांमध्ये पाऊस झाला. या भागातील टोमॅटो, कांदा, भुईमूग ही पिके पाण्याखाली गेली आहेत. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. तसेच चारा पिकेही शेतात पूर्णपणे आडवी पडली असून, त्यांचेही नुकसान झाले आहे. सतत पडलेल्या पावसामुळे शेतात पाणी साचून राहिल्याने नुकसान झाले असून, पिकांचा पंचनामा करण्याची मागणी संतोष आंग्रे यांनी केली आहे.