नाथाभाऊ आमचे नेते, त्यांनी तिकडं गेल्यावर तरी खरं बोलावं: चंद्रकांत पाटलांचं प्रत्युत्तर
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2021 15:46 IST2021-06-07T15:40:23+5:302021-06-07T15:46:53+5:30
भाजपमध्ये कोणत्याही प्रकारची अस्वस्थता नाही..!

नाथाभाऊ आमचे नेते, त्यांनी तिकडं गेल्यावर तरी खरं बोलावं: चंद्रकांत पाटलांचं प्रत्युत्तर
पुणे: काही महिन्यांपूर्वी भाजपला रामराम ठोकत एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. पण त्याआधी आणि राष्ट्रवादी प्रवेशानंतर संधी मिळेल तेव्हा खडसे यांच्याकडून भाजपच्या नेत्यांवर टीकास्र सोडणे सुरूच आहे. आताही त्यांनी भाजपमध्ये अस्वस्थता असल्याचे मत व्यक्त केले होते. मात्र,भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी एकनाथ खडसे यांना 'नाथाभाऊ आमचे नेते, त्यांनी तिकडे गेल्यावर तरी खरं बोलावं' अशा शब्दात जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
पुण्यात एका कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलत होते. यववेली त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले. पाटील म्हणाले, भाजपमध्ये कोणत्याही प्रकारचे मतभेद नाहीत आणि असतील तरी ते सोडवण्यासाठी आम्ही समर्थ आहोत. तसेच आमच्याकडे पक्ष सोडल्यावर मारण्याची पद्धत नाही. जो पक्ष सोडून जातो त्याने जाईल तिथे सुखी रहा, अशी आमची पद्धत आहे. तसेच आम्हाला फसवलं गेलं याचं आम्हाला दु:खं आहे. आमच्याशी धोका झाला. पण दीड वर्षात त्यांनी एकही आंदोलन केलं नाही. आम्ही अनेक आंदोलने केली. पंढरपूरही जिंकलो. मात्र, भाजपमध्ये कोणत्याही प्रकारची अस्वस्थता नाही असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
आघाडी सरकारमध्ये प्रत्येकाला प्रेसमध्ये येेेण्याची घाई
आघाडी सरकारमध्ये कोणत्याही गोष्टीवर एकवाक्यता नाही. आणि प्रत्येकाला प्रेस समोर येण्याची घाई झाली आहे असे म्हणत पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारमध्ये एकवाक्यता नाही अशी टीकाही केली.
संजय राऊत यांनी ८० नव्हे २८० जागा लढवाव्यात..
संजय राऊत यांनी काही दिवसांपूर्वीच ८० जागा लढविणार असल्याचे जाहीर केले आहे. पण त्यांनी ८० नव्हे २८० जागा लढवाव्यात. आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत, अशा शब्दात चंद्रकांत पाटलांनी शिवसेना नेते राऊत यांना त्यांनी काढला.शिवसेना नेते संजय राऊत यांनाही टोला लगावला. राऊत यांचं नाव घेऊन तुम्ही माझा दिवस का बिघडवता आहात ? असा प्रश्न देखील पाटील यांनी उपस्थित केला.
काँग्रेसच्या इंधन दरवाढ विरुद्ध आंदोलनावर टीका...
उद्धव ठाकरे आणि अजित पवार यांना प्रत्येक गोष्ट केंद्राने करावी असे वाटत असते. मात्र, राज्याने आधी १० रुपये इंधनावरचा कर कमी करावा, मग केंद्राकडे ५ रुपये कर कमी करण्याची मागणी करावी असे मत व्यक्त करतानाच काँग्रेसच्या इंधन दरवाढ विरुद्ध आंदोलनावर टीका केली.