सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्नशील राहणार; नव्या आयुक्तांचे आश्वासन, बघू काय होतंय...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2025 11:22 IST2025-06-03T11:22:07+5:302025-06-03T11:22:22+5:30

पाणी, रस्ते, नदी सुधारणा, लाईट, पावसाळ्यात येणारी पूरजन्य परिस्थिती, अतिक्रमण अशा समस्यांच्या विळख्यात पुणे शहर आणि उपनगर अडकले आहे

Efforts to solve the problems of the common man; New Commissioner's assurance, let's see what happens... | सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्नशील राहणार; नव्या आयुक्तांचे आश्वासन, बघू काय होतंय...

सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्नशील राहणार; नव्या आयुक्तांचे आश्वासन, बघू काय होतंय...

पुणे: सर्वसामान्य नागरिक केंद्रबिंदू ठेवून त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी आपला प्रयत्न राहणार आहे. शहरातील नदी सुधारणा, मेट्रो, जायका प्रकल्पांना विशेष प्राधान्य देणार असल्याचे पुणे महापालिकेेचे नवनियुक्त आयुक्त नवल किशोर राम यांनी सांगितले आहे. सर्वत्र पुणे शहर समस्यांच्या विळख्यात अडकले आहे. ट्राफिक, रस्ते, अस्वच्छता, नदी सुधारणा, पावसाळ्यात येणारी पूरजन्य परिस्थिती यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. उपनगरात तर पाण्याच्या गंभीर समस्या निर्माण झाल्या आहेत. अजूनही अनेक भागात टँकरने पुरवठा होत आहे. अशातच नवनियुक्त आयुक्तांनी सामान्य नसागरिकांच्या समस्या सोडवण्याचे आश्वासन दिले आहे. आता नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी पालिका प्रयत्न करणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.   

महापालिकेच्या आयुक्तपदाची जबाबदारी घेतल्यानंतर नवल किशोर राम यांनी महापालिकेतील विविध खात्यांचा आढावा घेतला. यावेळी विभागप्रमुखांनी त्यांच्यासमोर सादरीकरण केले. त्यानंतर महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी पत्रकारांशी संवाद साधला. शहरात नदी सुधारणा योजनेचे काम गेले अनेक वर्षे सुरू आहे. ही शहरासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण योजना असून, त्याचे काम संथ गतीने सुरू आहे. पंतप्रधान कार्यालयात असल्यापासून या योजनेच्या कामाची गती पाहत आहे. याबरोबर सक्षम सार्वजनिक वाहतुकीमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजाविणारा मेट्रो प्रकल्प, घनकचरा व्यवस्थापन याकडे विशेष लक्ष दिले जाणार आहे. या योजना नागरिकांसाठी महत्त्वपूर्ण असून, यामधून नागरिकांच्या राहणीमानाचा दर्जा सुधारणार असल्याने या प्रकल्पांची कामे प्राधान्याने मार्गी लावण्याचा प्रयत्न असल्याचे आहे. महापालिका आयुक्तांनी दैनंदिन कामात न अडकता शहरातच्या आणि नागरिकांच्या हितासाठी महत्त्वपूर्ण ठरतील अशा योजना सुरू करणे यावर आपला भर राहणार आहे. महापालिकेतील अधिकाऱ्यांकडून मिळणाऱ्या माहितीवर अवलंबून न राहता वेगवेगळ्या माध्यमातून माहिती घेऊन नागरिकांच्या फायद्यासाठी उपक्रम राबविले जाणार आहेत. नागरिकांकडून तसेच विविध घटकांकडून माहिती घेत कामाचा प्राधान्यक्रम ठरविला जाणार आहे. प्रसंगी प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी भेट देण्यावर भर राहणार असल्याचे नवल किशाेर राम यांनी सांगितले.

रुग्णालयांचे फायर ऑडिट करण्याचे आदेश

शहरातील रुग्णालयांमध्ये उपचारासाठी जाणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी शहरातील महापालिकेच्या रुग्णालयांसह खासगी रुग्णालयांचे फायर ऑडिट करण्याचे आदेश संबधित विभागांना दिले असल्याची माहिती आयुक्त नवल किशाेर राम यांनी दिली. रुग्णालयांमध्ये आवश्यक ती खबरदारी घेतली जात नसल्याने आग लागणे, अपघात होण्याचे प्रकार घडतात. या पार्श्वभूमीवर खासगी रुग्णालयांनी आवश्यक नियमांचे पालन करुन सुरक्षिततेच्या दृष्टीने त्याची पूर्तता केली आहे का ? याची तपासणी होणे गरजेचे आहे. यासाठी शंभर टक्के फायर ऑडिट करण्याचे आदेश दिले आहेत. ज्या रुग्णालयांमध्ये नियमांची पूर्तता होत नाही, हे समोर येईल, त्यांना टाळे ठोकण्यात येणार आहे, असेही नवल किशाेर राम यांनी सांगितले.

Web Title: Efforts to solve the problems of the common man; New Commissioner's assurance, let's see what happens...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.