Pune Accident: काळजी करू नका, व्यवस्थित उपचार केले जातील; जखमी विद्यार्थ्याला एकनाथ शिंदेंचा फोन
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2025 22:12 IST2025-05-31T22:11:12+5:302025-05-31T22:12:32+5:30
एकनाथ शिंदेंनी प्रशांत बंडगर या विद्यार्थ्यांशी संवाद साधला. काळजी करू नका व्यवस्थित उपचार केले जातील असे आश्वासन दिले.

Pune Accident: काळजी करू नका, व्यवस्थित उपचार केले जातील; जखमी विद्यार्थ्याला एकनाथ शिंदेंचा फोन
पुणे : शहराच्या मध्यवर्ती भागात सदाशिव पेठेत असलेल्या भावे हायस्कूल जवळ एका कारचालकाने १२ जणांना उडविल्याची घटना शनिवारी (दि. ३१) सायंकाळी पावणे सहाच्या सुमारास घडली. या घटनेत चालकाने मद्यपान केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मध्यवर्ती भागातून असे मद्यपी गाड्या चालवत असतील. तर सामान्य माणसाने रस्त्याने चालायचे कसे? असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.
या घटनेत जखमी झालेल्या विद्यार्थ्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. अपघातात प्रशांत बंडगर या विद्यार्थ्याचा पाय फ्रॅक्चर झाला आहे. या भावे हायस्कुल परिसरातील युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंशी प्रशांतचे बोलणे करून दिले. एकनाथ शिंदेंनी प्रशांत बंडगर या विद्यार्थ्यांशी संवाद साधला. काळजी करू नका व्यवस्थित उपचार केले जातील असे आश्वासन दिले. तुमच्या अभ्यासाचे नुकसान होणार नाही असेही ते यावेळी म्हणाल्याचे बंडगर याने सांगितले आहे.
अविनाश दादासो फाळके ,प्रथमेश पांडुरंग पतंगे, संदीप सुनील खोपडे, सोनाली सुधाकर घोळवे, मंगेश आत्माराम सुरवसे, अमित अशोक गांधी, समीर श्रीपाद भालचिकर, सोमनाथ केशव मेरूकट, प्रशांत ब्रह्मदेव बंडगर, किशोर हरिभाऊ भापकर, पायल आदेश कुमार दुर्गे, गुलणाज सिराज अहमद अशी जखमी विद्यार्थ्यांची नावे आहेत. चालक जयराम शिवाजी मुळे (वय २७, रा. बिबवेवाडी) याला विश्रामबाग पोलिसांनी ताब्यात गेतले असून तो मद्यधुंद असल्याचे सांगितले जात आहे. जखमी विद्यार्थी एका चहाच्या टपरीवर चहासाठी एकत्रित आले होते. कारचालकाचे नियंत्रण सुटल्याने त्याने बारा जणांना धडक दिली. प्राथमिक माहितीनुसार या बारा जणांपैकी तिघांना संचेती हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे तर अन्य नऊ किरकोळ जखमींना योगेश हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
अरुंद रस्ते तरीही मोठा अपघात
शहराच्या मध्यवर्ती भागात भावे हायस्कुल जवळ हा अपघात झाला आहे. या परिसरातील रस्ते अतिशय अरुंद आहेत. २ चारचाकी एकत्र आल्या तरी ट्राफिक झाल्याचे निदर्शनास आले आहे. अशा ठिकाणी हा भीषण अपघात घडला आहे. त्यामुळे नागरिकात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अशातच मद्यधुंद चालकाने १२ जणांना उडवल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त होऊ लागला आहे. सर्व जण जखमी झाले असून कोणत्याही प्रकारची जीवितहानी न झाल्याची माहिती समोर आली आहे.
भावे हायस्कूलजवळ झालेल्या अपघातातील जखमींमध्ये १२ जणांपैकी काही विद्यार्थी असून ते स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत. त्याची एक परीक्षा उद्या होणार असल्याने या विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी फोनवर बोलणे झाले असून विद्यार्थ्यांना दिलासा देण्यासाठी सकारात्मक निर्णय घेण्याचा शब्द त्यांनी दिला आहे. तसेच जखमींचा सर्व खर्च हा सरकारच्या माध्यमातून करण्यात येईल. - हेमंत रासने, आमदार कसबा विधानसभा