'लग्न करू नका, तुम्ही मध्ये पडू नका', शशांकने वैष्णवीला बघण्यासाठी आलेल्या मुलांनाही धमकावले होते
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2025 14:21 IST2025-05-27T14:19:39+5:302025-05-27T14:21:52+5:30
“तू दुसऱ्याशी लग्न केलंस, तर तुला आणि त्यालाही मारून टाकीन”, “तुझं आयुष्य उद्ध्वस्त करीन” अशा धमकी वैष्णवीला वारंवार दिली जात होती

'लग्न करू नका, तुम्ही मध्ये पडू नका', शशांकने वैष्णवीला बघण्यासाठी आलेल्या मुलांनाही धमकावले होते
पुणे: ५१ तोळे सोनं, आलिशान फॉर्च्युनर गाडी, चांदीची भांडी आणि धुमधडाक्यात लग्न लावून दिल्यानंतरही वैष्णवी हगवणेचा सासरी छळ सुरू होता. सासरा, सासू, पती, दीर, नणंद सगळेच वैष्णवीचा छळ करायचे. इतकंच नाही तर तिला मारहाणही करायचे. अखेर वैष्णवीने टोकाचं पाऊल उचलून आत्महत्या केली त्यानंतर आता हगवणे कुटुंबीयांनी अटक करण्यात आली आहे. त्यांच्या पोलीस कोठडीतही वाढ करण्यात आली आहे. अशातच शशांक हगवणे याने दुसरं कुणाशी लग्न करू नये. म्हणून वैष्णवीला धमकवल्याची माहिती समोर आली आहे.
“तू दुसऱ्याशी लग्न केलंस, तर तुला आणि त्यालाही मारून टाकीन”, “तुझं आयुष्य उद्ध्वस्त करीन” अशा धमकी वैष्णवीला वारंवार दिली जात होती. जी तिच्या मोबाईलवरील काही चॅट्स व कॉल रेकॉर्डिंग्समध्ये असल्याचं पोलिसांना आढळलं आहे. वैष्णवीचं दुसऱ्याशी लग्न होऊ नये म्हणून शशांकने तिचं नाव बदनाम करण्याचा प्रयत्न केला, काही ठिकाणी धमक्या देऊन तिच्याशी लग्न करून नका असंही सांगितल्याची माहिती समोर आली आहे. कस्पटे कुटुंबीयांनी स्थळे बघण्यास सुरुवात केली होती. त्यावेळी वैष्णवीला मुलं पाहण्यास येत होती. त्या मुलांना शशांकने फोन करून वैष्णवीशी लग्न करू नका, तुम्ही मध्ये पडू नका अशी धमकी दिल्याची माहिती कुटुंबीयांनी दिली आहे.
वैष्णवीच्या हट्टासमोर मामाही हतबल
वैष्णवीचे मामा उत्तम बहिरट यांनी माध्यमांशी बोलताना लग्नाला सगळ्यांचा विरोध असल्याचे सांगितले होते. मामा म्हणाले होते की, हे लव्ह मॅरेज आहे. त्याला सगळ्यांचा विरोध होता. घरातील सगळ्यांचा विरोध असूनही वैष्णवीने माझ्याकडे लग्न करण्यासाठी हट्ट धरला होता. तिला त्याच्याशीच लग्न करायचं होत. त्यांच्या घरात यावरुन वाद झाले. त्यावेळी वैष्णवीचे वडील आनंद ऍडमिट होते. शशांक तिच्या घरी इथं आला. आणि आपण पळून जाऊन लग्न करू असं म्हणत तिला चल म्हणाला. त्यावेळी तिने माझ्या मुलाला पळून लग्न करणार असल्याचे सांगितले. माझ्य मुलाने असं काय निर्णय घेऊ नको. वडील आयसीयू मध्ये आहेत असे सांगून तिला समजवण्याचा प्रयत्न केला. पण ती ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती. त्याने लगेच मला फोन करून सांगितलं. आम्ही धावतपळत घरी आलो. तिला समजावून सांगितलं. तसेहच शशांकला फोन करून सांगितलं कि आपण निर्णय नंतर घेऊ. त्यानंतर आपली समाजात बदनामी होऊ नये. म्हणून लग्न लावून दिल असल्याची माहिती मामाने दिली होती.