बीजेपीला वाटतेय राहुल गांधींची भीती

By Admin | Updated: September 27, 2015 00:42 IST2015-09-27T00:42:24+5:302015-09-27T00:42:24+5:30

केंद्रातील भारतीय जनता पक्षाच्या सरकारला राहूल गांधी यांची भीती वाटते आहे, त्यामुळे राहूल काही बोलले तर लगेच अनेक केंद्रीय मंत्री त्यांचा प्रतिवाद करायला धावतात

BJP feels Rahul Gandhi's fears | बीजेपीला वाटतेय राहुल गांधींची भीती

बीजेपीला वाटतेय राहुल गांधींची भीती

पुणे : केंद्रातील भारतीय जनता पक्षाच्या सरकारला राहूल गांधी यांची भीती वाटते आहे, त्यामुळे राहूल काही बोलले तर लगेच अनेक केंद्रीय मंत्री त्यांचा प्रतिवाद करायला धावतात. १६ महिने झाले, केंद्र सरकारने दाखवलेल्या सर्व स्वप्नांचा फुगा आता फुटला आहे, त्यामुळेच पंतप्रधान मोदी सतत देशाबाहेर राहतात अशी टीका माजी केंद्रीय व्यापार मंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आनंद शर्मा यांनी शनिवारी पुण्यात केली.
एका कार्यक्रमानंतर शर्मा यांनी पत्रकारांशी अनौपचारिक संवाद साधला. पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजप सरकारवर हल्ला चढवताना ते म्हणाले, ‘‘ जनतेला स्वप्नांचे गाजर दाखवत त्या लाटेवर निवडून आलेल्या मोदी सरकारला गेल्या १६ महिन्यात काहीही करून दाखवता आले नाही. काँग्रेसचे उपाध्यक्ष राहूल यांच्यावर ते सतत टिका करतात, याचे कारण त्यांना त्यांची भिती वाटते हेच आहे. राहूल चांगले काम करीत असून त्यांच्या प्रयत्नांमुळेच भूसंपादन कायद्याच्या प्रश्नावर भाजप सरकारला गुडघे टेकणे भाग पडले.’’
पेट्रोलचा आंतरराष्ट्रीय व्यापार कोसळत आहे, त्याचा मोठा फायदा भारताला होत आहे, मात्र हा फायदा जनतेपर्यंत पोहचत नाही. त्याचे काय होते याची चौकशी झाली पाहिजे. पंतप्रधान संसदेत अधिवेशनाला उपस्थित रहात नाहीत, माध्यमांबरोबर बोलत नाहीत, सतत परदेशात असतात. तिथे त्यांच्या मोठमोठ्या सभा होतात. या सभेचे खर्च कोण करीत आहे असा सवाल शर्मा यांनी उपस्थित केला. १६ महिन्यात त्यांचे २९ परदेश दौरे झाले, आताही ते अमेरिकेत आहेत, आणखी काही दिवसांनी ते फ्रान्सला चालले आहेत. परदेश दौऱ्यांचा त्यांना विक्रम करायचा असावा अशी टिका शर्मा यांनी केली.
राहूल गांधी काँग्रेसच्या उपाध्यक्ष पदावर निवडून आले आहेत, त्यांची निवड झालेली नाही. योग्य वेळ येताच ते अध्यक्षपदही स्विकारतील. सध्या काँग्रेसजवळ सोनिया गांधींसारख्या आदर्श अध्यक्ष आहेत. तरीही माध्यमांकडून राहूल गांधी यांच्याबाबत प्रश्न केले जातात. मात्र बीजेपीचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह त्या पदापर्यंत कसे पोहचले? त्यांच्या भूतकाळाविषयी सर्व माहिती असूनही त्याबद्धल मात्र काहीही विचारले जात नाही, असे मत शर्मा यांनी व्यक्त केले. काँग्रेसच्या अखिल भारतीय समितीचे सदस्य गोपाळ तिवारी, कॉँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष अभय छाजेड, पिंपरी- चिंचवड शहराध्यक्ष भाऊसाहेब भोईर उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: BJP feels Rahul Gandhi's fears