भोर शहराला दहा दिवसांपासून होतोय दिवसाआड पाणी पुरवठा; तालुक्यातील २७ गावांत पाणीटंचाईची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2025 11:06 IST2025-06-10T11:06:09+5:302025-06-10T11:06:53+5:30
- पावसाने ओढ दिल्याचा परिणाम, भाटघर धरणात ७ टक्के पाणीसाठा, त्यातही निम्मा गाळ, यावर्षी चार गावांना सुरु होता टँकरने पाणीपुरवठा

भोर शहराला दहा दिवसांपासून होतोय दिवसाआड पाणी पुरवठा; तालुक्यातील २७ गावांत पाणीटंचाईची शक्यता
भोर - भोर भाटघर धरणात ७ टक्के पाणीसाठा असून भोर नगरपालिकेच्या नियोजन अभावामुळे मागील दहा दिवसांपासून भोर शहराला दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येत आहे. येणाऱ्या काळात अपेक्षित असा पाऊस न पडल्यास भाटघर धरणाच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या २७ गावातही पाणी टंचाईची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
दरम्यान भोर तालुक्यात मे महिन्यात पाऊस सुरु झाला मात्र पुन्हा पावसाने विश्रांती घेतल्याने भाटघर आणि निरादेवघर धरणातील पाणीसाठा अत्यंत कमी झाला आहे. भाटघर धरणात केवळ ७ टक्के पाणीसाठा शिल्लक असून त्यात निम्मा गाळ आहे. त्यामुळे भोर शहराला मागील दहा दिवसांपासून दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. भाटघर धरणात फक्त ७ टक्के पाणीसाठा शिल्लक असून पाऊस असाच राहिल्यास शहरासह भाटघर धरणाच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या भुतोंडे व वेळवंड खोऱ्यातील सुमारे ४२ गावांतील पिण्याच्या पाण्याच्या विहिरींना पाणी कमी पडण्याची शक्यता आहे.
यावर्षी चार गावांना टँकरने पाणीपुरवठा केला जात होता मात्र पाऊस पडल्यावर टैंकर बंद करण्यात आले आहेत. मागील वर्षी दोन्ही भागातील २७ गावांना सुमारे १८ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. तालुक्यात पाऊस सुरू होऊन पुन्हा उघडीप दिल्याने धरणातील पाणीसाठा वाढलेला नाही. त्यामुळे पाणीटंचाई कमी झालेली नाही.
भोर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या भाटघर धरणाच्या भिंतीच्या खालच्या बाजूला भोर शहराला पाणीपुरवठा करणारी विहीर आहे. धरणाच्या भिंतीपासून चारी खोदून विहिरीत पाणी घेतलेले आहे मात्र धरणात केवळ ७ टक्के पाणीसाठा असल्यामुळे चारीतून पाहिजे त्या प्रमाणात पाणी विहिरीत येत नाही. शिवाय धरणावरील वीजनिर्मिती केंद्रही बंद आहे. त्यामुळे विहिरीत येणाऱ्या पाण्याचे प्रमाण फारच कमी झाले आहे.
शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी ९० एचपी आणि ६० एचपी क्षमता असलेले प्रत्येकी दोन पंप आहेत, मात्र पाण्याची पातळी कमी झाल्यामुळे फक्त एक ६० एचपीची व एक १० एचपी मोटारच सुरू आहे. त्यामुळे भोर शहराला कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे.
पालिकेकडून पाटबंधारे विभागाला दरवर्षी १८ लाख
भाटघर धरणाच्या वीज निर्मिती केंद्रातून (लिक होणारे) बाहेर पडणारे पाणी चारी काढून भोर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीत सोडतात आणि तिथून पाणी चार किलोमीटरवर असलेल्या भोरला आणले जाते या पाण्यासाठी भोर नगरपालिका दरवर्षी १८ लाख पाटबंधारे विभागाला पाण्याचा मोबदला दिला जातो. मात्र तरीही दर मे महिन्याच्या शेवटी आणि जून महिन्याचे १५ दिवस महिना दीड महिना दिवसाआड पाणीपुरवठा करावा लागतो, मात्र भोर नगरपलिकेकडून तात्पुरती मलमपट्टी केली जाते. कोणत्याही प्रकारच्या ठोस उपाययोजना केल्या जात नाहीत. त्यामुळे नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे.
नगरपालिकेकडून तात्पुरती मलमपट्टी
भोर शहरातील लोकांना चांगले स्वच्छ पाणी मिळावे. यासाठी दिवसाआड पाणीपुरवठा केला जात असल्याचे पालिकेकडून सांगितले जाते. मात्र मागील १० दिवासांपासून दिवसाआड पाणीपुरवठा सुरु आहे. वीज गेली तर पाणीही भरता येत नाही दरवर्षी मे महिन्यात धरणातील पाणीसाठा कमी झाला की भोर शहरात पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवते. त्यामुळे दिवसाआड पाणीपुरवठा करावा लागत आहे मात्र भोर नगरपालिकेकडून तात्पुरती मलमपट्टी केली जाते. कोणत्याही प्रकारच्या ठोस उपाययोजना केल्या जात नाहीत. ऐन पावसाळ्यात नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागते.
पिण्याच्या पाण्याचे योग्य नियोजनाचा अभाव असल्यामुळे भोर शहराला दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. यामुळे पालिकेचा गलथान कारभार समोर आला आहे. ठोस उपाययोजना करण्याची गरज आहे. - प्रमोद कुलकर्णी, सामाजिक कार्यकर्ते
भाटघर धरणात पाणीसाठा अत्यंत कमी झाला आहे. त्यामुळे पुरेसा पाणीपुरवठा होत नाही. शिवाय स्वच्छ पाणीपुरवठा व्हावा म्हणून दिवसाआड पाणीपुरवठा सुरु आहे. पुढील १० दिवसांत नियमित पाणीपुरवठा केला जाईल. - गजानन शिंदे, मुख्याधिकारी भोर नगरपालिका