AI च्या वापरातून केेलेल्या बारामतीच्या ऊस शेतीची आंतरराष्ट्रीय स्तरावर दखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2025 19:18 IST2025-01-08T19:17:39+5:302025-01-08T19:18:39+5:30
कृषी विज्ञान केंद्रामध्ये या तंत्रज्ञानाद्वारे ऊसलागवडीचा प्रयोग करण्यात आला आहे.

AI च्या वापरातून केेलेल्या बारामतीच्या ऊस शेतीची आंतरराष्ट्रीय स्तरावर दखल
बारामती -बारामती येथील कृषि विज्ञान केंद्राच्या विविध शेतीसंशोधनाचे देशात दखल घेण्यात आली आहे.आता कृषि विज्ञान केंद्राने कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (एआय तंत्रज्ञानावर) कृषी क्षेत्रात वापर करीत केेलेली उसाची लागवडीची आंतरराष्ट्रीय स्तरावर दखल घेण्यात आली आहे. शेतीसाठी देखील एआय तंत्रज्ञान क्रांतीकारी ठरत असल्याचे यानिमित्ताने सिध्द झाले आहे.
कृषी विज्ञान केंद्रामध्ये या तंत्रज्ञानाद्वारे ऊसलागवडीचा प्रयोग करण्यात आला आहे. ‘कृषि विज्ञान केंद्राचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. निलेश नलवडे प्रगतशील शेतकरी सीमा चव्हाण त्यांनी दिल्ली येथे याचे सादरीकरण केले. संस्थेच्या कृषी क्षेत्रातील भरीव योगदानाची दखल देखील मायक्रोसॉफ्टचे पार्टनरशिप असलेल्या संस्थेने घेतली आहे. भविष्यातील शेती कशी असेल याला डोळ्यासमोर ठेवून आर्टिफिशिअल इंटेलिजन्स च्या माध्यमातून शेतीचा प्रयोग बारामतीमध्ये केला आहे. राज्यातील १०० शेतकऱ्यांना प्रायोगिक तत्वावर आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून अॅग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट ऊस या पिकासंदर्भात शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येत आहे.
सत्या नंडेला यांनी सोशल मीडियावर पोस्ट केल्याने अॅग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टचे सर्वत्र कौतुक होत आहे. बारामती येथील टीमला भेटून खूप आनंद झाला, जे आमच्या अेआय टूल्सचा वापर करून शेतकऱ्यांना सक्षम आणि शेतीमधील अधिक शाश्वत कापणीसाठी मदत करत आहेत, असे ट्विट सत्या नाडेला यांनी केलं. त्यावर, शरद पवार यांनी धन्यवाद असा ‘रिल्पाय’ दिला आहे. शेतीसाठी ‘अेआय’ चे फायदे हायलाइट करण्यासाठी आपले आभार. बारामतीमधील शेतकऱ्यांना या तंत्रानाचा चा फायदा मिळवून देण्यासाठी, अत्याधुनिक तंत्रज्ञान त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी ‘अेडीटी’ आम्ही वचनबद्ध आहोत. तसेच, शेती प्रयोगात तंत्रज्ञानाचा सर्वोत्तम वापर केला जाईल याची खात्री देत मायक्रोसाॅफ्ट सोबत काम करण्यास वचनबद्ध आहोत, असेही शरद पवार यांनी नमुद केलं आहे.
बारामती येथील ए.आय. तंत्रज्ञानाचा वापर आणि त्यातून होणारा शेतकऱ्यांचा फायदा याचा उल्लेख भारताला उद्देशून केलेल्या विशेष भाषणात मायक्रोसॉफ्टचे प्रमुख सत्या नाडेला यांनी केला. त्यांचे हे कौतुकाचे शब्द सर्व भारतीयांना,'ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट', ट्रस्टचे तंत्रज्ञ, कर्मचारी आणि शेतकऱ्यांसाठी अभिमानास्पद आणि मोलाचे आहेत. भविष्यात आपण सर्वजण मिळून शेती, शिक्षण आणि शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी कार्यरत राहू हा विश्वास आहे,अशा शब्दात खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील ‘एडीटी’चे काैतुक केले आहे.
कृषी विज्ञान केंद्रामध्ये ‘एआय’ या तंत्रज्ञानाद्वारे केलेला ऊसलागवडीचा प्रयोग गेमचेंंजर ठरणार आहे.त्यामुळे ऊसाचे अर्थकारण मोठ्या प्रमाणात बदलेल,तसेच शेतकर्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी मदत होणार आहे.राज्यात ऊस उत्पादनातून मिळणारे उत्पन्न ३० ते ३५ हजार कोटी आहे.तंत्रज्ञानाच्या वापराने यामध्ये ४५ हजार कोटींची वाढ होणार असल्याचा अंदाज ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी यापुर्वीच व्यक्त केला आहे.