Ashadi Ekadashi 2025 : यंदा फेसबुक दिंडीमध्ये 'वारी अभिजात मराठीची' मोहीम
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2025 13:06 IST2025-06-13T13:05:42+5:302025-06-13T13:06:24+5:30
मराठीची ऐतिहासिक परंपरा, साहित्यिक योगदान आणि सांस्कृतिक वारसा या क्षेत्रामधील महत्त्व उलगडणार

Ashadi Ekadashi 2025 : यंदा फेसबुक दिंडीमध्ये 'वारी अभिजात मराठीची' मोहीम
बारामती : संतश्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी सोहळ्याची इत्यंभूत माहिती इंटरनेटच्या माध्यमातून जगभरात पोहोचविण्यासाठी गेल्या १५ वर्षांपासून फेसबुक दिंडी कार्यरत आहे. फेसबुक दिंडी नेहमीच पंढरीच्या वारीतील ई- वारकऱ्यांसाठी पालखीचे फोटो, व्हिडीओ तसेच लाईव्ह अपडेट्स सोबतच सामाजिक बांधिलकी जपण्याच्या दृष्टिकोनातून नवनवीन उपक्रम घेऊन येत असते. टीम फेसबुक दिंडी यावर्षी 'वारी अभिजात मराठीची' या मोहिमेतून मराठीची ऐतिहासिक परंपरा, साहित्यिक योगदान आणि सांस्कृतिक वारसा या क्षेत्रामधील महत्त्व यंदाच्या वारीमध्ये मांडणार आहोत.
यावर्षी जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे ३४० वे वर्ष आणि आपल्या फेसबुक दिंडीचे हे १५ वे वर्ष. फेसबुक दिंडीतर्फे दरवर्षी नेहमीच्या वारीच्या 'अपडेट' सोबत सामाजिक उपक्रम राबविण्यात येतो. यंदाच्या वर्षी फेसबुक दिंडीतर्फे 'वारी अभिजात मराठीची' ही मोहीम राबविण्यात येणार आहे. माऊली म्हणतात, 'जैसी दीपांमाझि दिवटी। कां तिर्थीमाझि पूर्णिमा गोमटी। तैसी भाषांमध्ये मर्हाटी। सर्वोत्तम।।' मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळवून देण्यासाठी संत साहित्याचे योगदान अत्यंत मोलाचे आहे. संत ज्ञानेश्वर, तुकाराम, नामदेव, एकनाथ यांनी तत्त्वज्ञान, अध्यात्म आणि सामाजिक समतेचे विचार लोकसुलभ मराठीत मांडले. त्यांच्या अभंग, ओव्या व भारुडांमुळे मराठी भाषेचा लय, ताल, शब्दसंपदा आणि भावनिक पोत समृद्ध झाला. संत साहित्यामुळे मराठी भाषेला गहिरेपणा, सामाजिक मूल्यं आणि सांस्कृतिक वारसा लाभला जो अभिजाततेचा मुख्य आधार ठरतो.
आपल्या माय मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळवणे म्हणजे साहित्य, कला आणि संस्कृतीच्या गौरवाची मान्यता मिळणे. मराठी भाषेला अभिजात दर्जा दिला गेल्यामुळे तिची ऐतिहासिक परंपरा, साहित्यिक योगदान आणि सांस्कृतिक वारसा यांना मान्यता मिळाली. अभिजात भाषांच्या यादीत समावेश झाल्यामुळे आपल्या मराठी भाषेची ओळख जागतिक स्तरावर वाढली.
नवीन गाणे प्रदर्शित होणार
मराठी भाषा केवळ संवाद साधण्याचे एक साधन नाही, तर ती एक सांस्कृतिक ओळख, सामाजिक एकता आणि शैक्षणिक समृद्धीचे प्रतीक आहे. यामुळे मराठी भाषेच्या संवर्धनाकडे लक्ष देणे अत्यंत आवश्यक आहे. याचसोबत यंदाचे फेसबुक दिंडीचे नवीन गाणे 'चला रे पाहू सोहळा पंढरीचा' हे देखील लवकरच प्रदर्शित होणार आहे. याचे गीत लेखन व संगीत आनंद ओक यांनी केले आहे. यासाठी फेसबुक दिंडी टीमचे सदस्य स्वप्नील मोरे, सुरज दिघे, अमोल निंबाळकर, संतोष पाटील, अमोल गावडे, मंदार जाधव, सागर गंधारे, ओंकार महामुनी, निखिल पवार, सुमित चव्हाण कार्यरत आहेत.