Ashadhi Wari : तुकोबांच्या पालखी सोहळ्याचे काटेवाडीत धोतराच्या पायघड्यांनी स्वागत
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2025 20:32 IST2025-06-27T20:32:25+5:302025-06-27T20:32:54+5:30
- पहिल्या मेंढ्यांच्या गोल रिंगण सोहळ्याने फेडले डोळ्यांचे पारणे

Ashadhi Wari : तुकोबांच्या पालखी सोहळ्याचे काटेवाडीत धोतराच्या पायघड्यांनी स्वागत
- प्रशांत ननवरे
बारामती : संतश्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील पहिले गोल रिंगण शुक्रवारी (दि. २७) काटेवाडीत हरिनामाचा गजर आणि भक्तिमय वातावरणात पार पडले. पालखी सोहळ्यातील मेंढ्यांचं पहिलं गोल रिंगण पाहण्यासाठी अनेक वारकरी भक्तांनी मोठी गर्दी केली होती. विठुरायाच्या जयघोष, टाळ मृदंगाच्या गजर आणि अभंगमय वातावरणात पार पडलेल्या या सोहळ्याने भाविकांच्या डोळ्याचे पारणे फेडले.
शुक्रवारी रात्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळा बारामती शहरात मुक्कामी होता. पालखी सोहळ्याने शुक्रवारी सकाळी बारामती शहरातून काटेवाडीच्या दिशेने प्रस्थान ठेवले. मोतीबार, बांदलवाडी, पिंपळी येथील स्वागत सत्कार स्वीकारत पालखी सोहळा सकाळी ११च्या सुमारास काटेवाडीत पोहोचला. काटेवाडी गावाच्या वेशीजवळ आल्यानंतर पालखी खांद्यावर घेण्यात आली. यावेळी काटेवाडीतील परिट समाजातील ननवरे बंधू यांच्यावतीने पारंपरिक पद्धतीने पांढऱ्या शुभ्र धोतराच्या पायघड्या घालून तुकोबांच्या पालखीचे मनोभावे स्वागत केले. यावेळी घराबाहेर रांगोळ्यांच्या पायघड्याही घालण्यात आल्या होत्या.
गावच्या वेशीतून बँडपथक, शालेय लेझिमपथक, हरिनामाच्या गजरात मोठ्या उत्साहात ग्रामस्थांनी पालखी खांद्यावरून दर्शन मंडपात नेली. यावेळी पालखी सोहळ्याचे, शरयु फाउंडेशनच्या अध्यक्षा शर्मिला पवार, सरपंच मंदाकिनी भिसे, उपसरपंच मिलिंद काटे, माजी सरपंच विद्याधर काटे, माजी उपसरपंच श्रीधर घुले, राजेंद्र पवार, अजित काटे, नियोजन मंडळाचे सदस्य पांडुरंग कचरे आदींनी स्वागत केले. फुलांची आकर्षक सजावट केलेल्या मनमोहक दर्शन मंडपातील ओट्यावर पालखी विसावल्यानंतर ग्रामस्थांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केल्याचे चित्र होते.
त्यानंतर दुपारी ३ वाजता प्रथम पालखीभोवती वारकऱ्यांनी रिंगण केलं आणि डोळ्यांचं पारणं फेडणारा रिंगण सोहळा सुरू झाला. संभाजी काळे, तात्यासो मासाळ, महादेव काळे, सुभाष मासाळ, हरी महारनवर यांच्या मेंढ्यांनी पालखी रथाभोवती पाच प्रदक्षिणा घालून मेंढ्यांनी रिंगण पूर्ण केले. यावेळी उपस्थित भाविकांनी हरिनामाचा गजर केला. यावेळी पताकावाले, तुळशी वृंदावनसह कलश डोईवर घेतलेल्या महिला वारकरी, विणेकरी, पखवाजवाले आणि टाळकरी रिंगणाभोवती उभे होते. रिंगणाच्या पाच फेऱ्या पूर्ण होईपर्यंत अखंड ज्ञानबा तुकारामचा नामघोष सुरू होता. रिंगण सोहळ्यानंतर पालखीने इंदापूर तालुक्यातील सणसर मुक्कामी प्रस्थान केले. शनिवारी (दि २८) बेलवाडी येथे पालखी सोहळ्याचे पहिले अश्वरिंगण सोहळा पार पडणार आहे.
पालखी विसावल्यानंतर भाविकांनी दर्शनासाठी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. तसंच वारकऱ्यांनी गावातील जेवणाबरोबरच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या काटेवाडी येथील जेवणाचा आस्वाद घेतला. यावेळी खासदार सुनेत्रा पवार, पार्थ पवार यांनी वारकरी भाविकांचे स्वागत केले. काटेवाडीत पालखीच्या स्वागतासाठी ठिकठिकाणी पताका, स्वागत कमानी लावून परिसरात सजावट केली होती. तसेच परिसरात तरुण मंडळ, संस्था आदींनी अन्नदानासह विविध सामाजिक उपक्रम राबविले.
पूर्वीच्या काळात संत तुकाराम महाराज पालखी सोहळा पंढरपूरच्या दिशेने या मार्गावरून निघाला होता. यावेळी काटेवाडी येथे मेंढपाळांनी संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा मार्गस्थ होताना मेंढ्यांची रोगराई जाण्यासाठी पालखी रथाभोवती गोल रिंगण घातले होते. तेव्हापासून मेंढ्यांच्या रिंगण सोहळ्याची परंपरा भाविकांनी श्रद्धेने जपली आहे.