पुणेकरांचा निरोप घेत दोन्ही पालखी सोहळा वेगवेगळ्या वाटेने पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2025 17:53 IST2025-06-22T17:52:09+5:302025-06-22T17:53:47+5:30
भक्तिमय वातावरणात संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा पुणेकरांचा निरोप घेऊन हडपसरमधून वेगवेगळ्या वाटेने पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाला.

पुणेकरांचा निरोप घेत दोन्ही पालखी सोहळा वेगवेगळ्या वाटेने पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ
हडपसर : टाळ-मृदंगाच्या तालावर, भजनात दंग वारकऱ्यांची पावले. वारकऱ्यांच्या मुखी ज्ञानोबा-तुकोबाचा गजर आणि आसमंतात घुमणारा टाळ-मृदुंगांचा नाद, खांद्यावर पताका, डोक्यावर तुळशी वृंदावन, गळ्यात वीणा, मृदंग, कपाळी चंदनाचा टिळा, अशा भक्तिमय वातावरणात संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा पुणेकरांचा निरोप घेऊन हडपसरमधून वेगवेगळ्या वाटेने पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाला.
वैदुवाडी मगरपट्टा येथे दुरून दिसणारा माउली व तुकाराम महाराजांच्या पालखी रथाचा कळस पाहताच भाविक नतमस्तक झाले. विसावास्थळी रांगोळ्यांच्या पायघड्या व फुलांच्या वर्षावाने वारकऱ्यांचे स्वागत करण्यात आले. हडपसरमध्ये दोन्ही पालखी सोहळ्यांच्या स्वागतासाठी रस्त्याच्या दोन्ही बाजूला गर्दी केली होती. हडपसर मार्गावर वारकऱ्यांना फराळाचे वाटप केले.
पुण्यातून सकाळी ६ वाजता माउलीच्या पालखीचे प्रस्थान झाले. त्यानंतर सकाळी ८ वाजता शिंदे छत्री येथे आरती झाली. सकाळी ९ वाजून ५ मिनिटांनी संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी हडपसरला पोहोचली. संत तुकाराम महाराजांची पालखी दुपारी १२:२० वाजता गाडीतळावरील विसावा ठिकाणी आली. सुमारे दीड तासाच्या विसाव्यानंतर ती लोणी काळभोरला रवाना झाली.
केवळ ४५ मिनिटांचा विसावा घेतल्यानंतर संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी सासवडकडे मार्गस्थ झाली. यावेळी महिला व पुरुषांनी दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या.
खांद्यावर, पताका, डोक्यावर तुळसी वृंदावन, गळ्यात विना, मृदुंग, कपाळी चंदनाचा टिळा, मुखी ज्ञानोबा-तुकोबाचा गजर, चेहऱ्यावर विठ्ठलाच्या भेटीची आस, आसमंतभर घुमणारा टाळ-मृदुंगांचा नाद, असे रूप धारण केलेला वारकरी भक्तिमय वातावरणात सोहळा रंगला.
हडपसरवरून पालखी मार्गस्थ होत असताना वरुण राजाने आज विश्रांती घेतल्याने वारकऱ्यांचा पायी प्रवास सुखरूप झाला. ऊन-सावलीच्या खेळाने घामाच्या धारादेखील निघत होत्या.
पालिकेवर हद्दीतून ग्रामीण भागात दोन्ही पालखींचे प्रवेश होताच ग्रामस्थांनी केलेल्या स्वागताने वारकरी भारावून गेले. दोन वाजण्याच्या सुमारास माउलींनी दुपारचा विसावा उरळी देवाची येथे ठेवला, तर तुकाराम महाराजांच्या पालखीचा विसावा मांजरी फार्म येथे घेतला. वारकऱ्यांनी फराळाचा आस्वाद घेत तासाभराच्या विश्रांतीनंतर घाटाच्या पायथ्याकडे मार्गक्रमण करण्यास सुरुवात केली.
दिवे घाटाच्या नागमोडी वळणाचा प्रवास करण्यापूर्वी माउलींची पालखी वडकी नाला येथे सुमारे चारला पोहोचली. एक तासाची विश्रांती घेतल्यानंतर अवघड असा दिवेघाट चढण्यास सुरुवात झाली. यावेळी माउलींच्या रथाला वडकी नाला येथे तयार असलेल्या दोन बैलजोड्या लावण्यात आल्या. टाळ-मृदुंगाच्या गजरात वारकऱ्यांनी दिवेघाट चढण्यास सुरुवात केली.
वारीत वारकऱ्यांप्रमाणेच वासुदेवदेखील सामील झाले. त्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर दिसत होती. आपल्या चिमुकल्यांना वारकऱ्यांची वेशभूषा करून सोहळा पाहणाऱ्यासाठी येणाऱ्यांची संख्या लक्षणीय होती. पुण्यातून पालखी सोहळ्यास निरोप देण्यासाठी पुणेकर यांनी सासवडपर्यंत पायी प्रवास केला.