Ashadhi Wari 2025 : माऊली मंदिरात रेलिंग तुटून दुर्घटनेची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2025 16:13 IST2025-06-21T16:09:02+5:302025-06-21T16:13:33+5:30
माऊलींचा आषाढी पायी वारी प्रस्थान सोहळ्यात सहभागी होण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो वारकरी अलंकापुरीत दाखल होत असतात.

Ashadhi Wari 2025 : माऊली मंदिरात रेलिंग तुटून दुर्घटनेची शक्यता
- भानुदास पऱ्हाड
आळंदी : संत ज्ञानेश्वर महाराजांच्या आषाढी पायीवारी पालखीचे गुरुवारी (दि. १९) रात्री पावणे अकराच्या सुमारास प्रस्थान झाले. दरवर्षी या प्रस्थान सोहळ्याला मानाच्या दिंड्यांमधील वारकऱ्यांना प्रवेश दिला जात असतो. मात्र या वारकऱ्यांव्यतिरिक्त प्रस्थान सोहळ्याला इतर वशिलेबाजांची संख्या जास्त असते. परिणामी देऊळवाड्याभोवती असलेल्या टेरेसवर प्रचंड गर्दी होते. टेरेसवर उभे राहिलेले 'हौसे' लोक रेलिंगवर भार देऊन प्रस्थान सोहळा पाहत असतात. सदरचा भार लोखंडी कठड्यांना सहन झाला नाही तर अचानक हे रेलिंग तुटून मोठी दुर्घटना होण्याची शक्यता निर्माण होत आहे.
माऊलींचा आषाढी पायी वारी प्रस्थान सोहळ्यात सहभागी होण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो वारकरी अलंकापुरीत दाखल होत असतात. आळंदीत आलेला प्रत्येक वारकऱ्याला माऊलींचा प्रस्थान सोहळा स्वतःच्या नयनांनी अनुभवायची इच्छा असते. मात्र देऊळवाड्यातील मर्यादित जागेमुळे तो प्रत्येकाला मंदिरात उपस्थित राहून पाहणे शक्य होत नाही. यावर मंदिर प्रशासनाने गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी नियमावली तयार केली आहे.
प्रस्थान सोहळ्याच्या दिवशी मंदिरात 'श्रीं'च्या रथापुढील २० आणि रथामागील २७ यांसह अन्य काही उपदिंड्यांतील प्रत्येकी ९० वारकरी, मीडिया, मानकरी तसेच प्रस्थान संबंधित घटकांना (पासधारक) मंदिरात प्रवेश दिला जातो. गतवर्षी जिल्हा सत्र न्यायाधीश महेंद्र महाजन यांच्या अध्यक्षतेखाली दिंडी प्रमुख, फडकरी, मानकरी, चोपदार, महसूल विभाग, पोलीस प्रशासन व आळंदी देवस्थानचे पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत हा निर्णय घेतला होता.
यंदाही हाच नियम कायम होता. प्रस्थान सोहळ्यापूर्वी पोलिसांकडून मंदिर रिकामे केले जाते. तरीसुद्धा अनेक 'वशिलेबाज' मंदिरात राहतात. सदरचे लोक हे धोकादायकपणे मंदिरासभोवतालच्या टेरेसवर उभे राहतात. प्रस्थान सोहळ्याच्या वेळी वारकरी देहभान विसरून नाचत असतात. अशातच एखाद्या वेळी रेलिंग तुटले तर टेरेसवरचे 'हौसे' वारकऱ्यांच्या अंगावर पडून दुर्घटना होऊ शकते. एकीकडे मंदिर प्रवेशासाठी स्थानिकांना वाद घालावा लागतो. मात्र दुसरीकडे 'वशिलेबाज' मोठ्या थाटात मंदिरात प्रवेश करत असल्याची सत्यस्थिती आहे. यावर वेळीच नियंत्रण आणणे गरजेचे असल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले.