Ashadhi Wari 2025 : सुरुवातीला वारीसोबत बैलगाड्या, १९८५ नंतर टॅक्टर, ट्रक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2025 13:21 IST2025-06-21T13:18:59+5:302025-06-21T13:21:49+5:30

- पूर्वी बैलगाडीत वारकऱ्यांना जेवणासाठी लागणारे धान्य, कपडालत्ता घेऊन जावे लागायचे. आता प्रत्येक दिंडीत वाहनांची सोय झाल्यामुळे वारकऱ्यांची सोय हायटेक झाली आहे.

Ashadhi Wari 2025 Initially, bullock carts accompanied by wari, after 1985, tractors, trucks | Ashadhi Wari 2025 : सुरुवातीला वारीसोबत बैलगाड्या, १९८५ नंतर टॅक्टर, ट्रक

Ashadhi Wari 2025 : सुरुवातीला वारीसोबत बैलगाड्या, १९८५ नंतर टॅक्टर, ट्रक

- अंबादास गवंडी

पुणे :
डोक्यावर तुळशी वृंदावन, कपाळावर टिळा, हातामध्ये टाळ आणि मृदंग, मुखामध्ये हरिनामाचा गजर करत शेकडो वर्षांपासून वारी सुरू आहे. आता वारीला जाणाऱ्या वारकऱ्यांमध्ये भक्ती आणि भाव तोच आहे; परंतु १९८५ वारकऱ्यांच्या दिंडीमध्ये टॅक्टर, ट्रक व इतर वाहने दाखल झाले. पूर्वी बैलगाडीत वारकऱ्यांना जेवणासाठी लागणारे धान्य, कपडालत्ता घेऊन जावे लागायचे. आता प्रत्येक दिंडीत वाहनांची सोय झाल्यामुळे वारकऱ्यांची सोय हायटेक झाली आहे.

महाराष्ट्र हा भक्ती आणि शक्ती गुणाने संपन्न, समृद्ध आहे. याला इतिहास आणि भूगोल साक्षीदार आहे. याच साक्षीने गेल्या शेकडो वर्षांपासून श्री संत ज्ञानेश्वर महाराज आणि श्री संत जगद्गुरू तुकाराम महाराज यांची पालखी सोहळा देहू, आळंदीवरून पंढरपूरला जातात. वारीला जाणाऱ्या वारकऱ्यांनी संख्या १९८० नंतर वाढत गेली आणि आजही ती वाढतच आहे; परंतु पूर्वी वारकऱ्यांना जेवणासाठी लागणाऱ्या धान्य, वस्तू ठेवण्यासाठी बैलगाड्यांचा सर्रास वापर होत होता.

कालांतराने तंत्रज्ञानाच्या युगात विविध वाहने उपलब्ध होऊ लागली. त्यामुळे वारीमध्ये टॅक्टर, ट्रक अशी वाहने मोठ्या प्रमाणात सामील झाली. वाहने उपलब्ध झाल्यामुळे वारकऱ्यांना लागणाऱ्या वस्तू ठेवण्यासाठी सोय झाली असून, गॅस सिलिंडरपासून चहा पावडरपर्यंत सर्व वस्तू सुरक्षित राहतात; परंतु पूर्वीच्या काळी जोरदार पाऊस आल्यावर बैलगाडीला बांधण्यात आलेल्या राहुट्यांतून पाणी यायचे. त्यामुळे सर्व वस्तू भिजून जायचे. यामुळे वारकऱ्यांचे हाल होत असे; परंतु वाहनांमुळे सोयीचे झाल्याने वारकऱ्यांना मोठा आधार मिळत आहे.
 
रस्त्यावरील पाणी टँकर झाले गायब 

वारकऱ्यांना पिण्याच्या पाण्याची सोयी व्हावी, यासाठी २००५ पर्यंत प्रत्येक एक किलोमीटर अंतरावर स्थानिक प्रशासनाकडून पाण्याचे टँकर उभे केले जात होते. त्याच ठिकाणी वारकरी अंघोळ करायचे आणि पुढे जायचे. आता प्रत्येक गावात शाळेमध्ये वारकऱ्यांसाठी राहण्याची, जेवणाची सोयी केली जाते. अंघोळीसाठी गरम पाण्यापासून जेवणासाठी सर्व सोय केली जाते. त्यामुळे पाण्याचे टँकर कमी होत गेले.
 
अन् मळकट वारी गायब झाली  

पूर्वी वारीला जाताना वारकरी एकच धोतर आणि सदरा घेऊन जायचे. त्यामुळे दोन-तीन दिवस तोच धोतर आणि सदरा घालायचे; परंतु आता वाहनांमध्ये कपडे ठेवण्याची सोय झाल्याने प्रत्येक वारकरी किमान दहा ते पंधरा जोड धोतर आणि सदरा घेऊन जातात. शिवाय बारामती, इंदापूर आणि माळीनगर या ठिकाणी वारकऱ्यांच्या कपडे धुण्याची सोय स्थानिक नागरिकांकडून केली जाते. परिणामी कितीही पाऊस आला तरी दररोज कपडे बदलल्यामुळे मळकट, कळकट वारकरी दिसायचे बंद झाले.

वारी म्हणजे वारकऱ्यांच्या शिस्तीचा आणि विठ्ठलभक्तीच्या संगम आहे. मी गेल्या ३२ वर्षांपासून वारी करत आहे. पूर्वीच्या काळी वारकऱ्यांना सोयी नव्हत्या. त्यामुळे अनेक अडचणी येत होत्या; परंतु आता प्रत्येक मुक्कामी सोय आहे. शिवाय दिंड्यांमध्ये वाहने आहेत. त्यामुळे दैनंदिन लागणाऱ्या वस्तू सुरक्षित राहतात. वारीला लोकांची गर्दी वाढली तरी वारकऱ्यांमध्ये शिस्त, वागणे, बोलणे, मुखात हरिनाम, भाव आणि भक्ती तोच आहे.  -सतीश गव्हाणे, वारकरी

Web Title: Ashadhi Wari 2025 Initially, bullock carts accompanied by wari, after 1985, tractors, trucks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.