Ashadhi Wari 2025 : पांगुळ झालाे तरी, दणकट माझे बाहू अन् मजबूत दाेन्ही हात..!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2025 16:43 IST2025-06-22T16:41:16+5:302025-06-22T16:43:45+5:30
चैतन्याचा झरा म्हणजे वारी... जगण्याचे बळ म्हणजे वारी... शक्ती आणि भक्तीचा संयाेग म्हणजे वारी... याचा प्रत्यय जीवनात आला आणि मी वारकरी झालाे. सुरुवातीस काही वर्षे आषाढी वारीत सहभागी हाेणाऱ्या भाविकांना गंध लावण्याचे काम करीत असे...

Ashadhi Wari 2025 : पांगुळ झालाे तरी, दणकट माझे बाहू अन् मजबूत दाेन्ही हात..!
- उद्धव धुमाळे
पुणे : चैतन्याचा झरा म्हणजे वारी... जगण्याचे बळ म्हणजे वारी... शक्ती आणि भक्तीचा संयाेग म्हणजे वारी... याचा प्रत्यय जीवनात आला आणि मी वारकरी झालाे. सुरुवातीस काही वर्षे आषाढी वारीत सहभागी हाेणाऱ्या भाविकांना गंध लावण्याचे काम करीत असे... रेल्वे अपघातात दाेन्ही पाय गेले आणि वारी करायची कसं, असा प्रश्न पडला. त्याच क्षणी भक्तिविजय ग्रंथ डाेळ्यासमाेर आला. दाेन हात, दाेन पाय गमावलेले कुर्मदास यांची विठ्ठल भक्ती आठवली. माझ्याकडे तर दणकट बाहू अन् मजबूत दाेन हात आहेत. या विचाराने नवी ऊर्जा मिळाली आणि ढकलगाडा घेऊन वारीत सहभागी झालाे. गेली २७ वर्षे वारी करीत आहे. विशेष म्हणजे परतीची वारीसुद्धा करत आहे.
अंगावर शहारे आणणारे हे बाेल आहेत साेलापूर जिल्ह्यातील म्हाळुंग गावचे वारकरी दीपक जालिंदर माने यांचे. ‘या रे या रे लहान थोर । याति भलते नारीनर, करावा विचार । न लगे चिंता कोणासी’ असा हा वारकरी सांप्रदाय आहे. येथे सर्वांना अधिकार आहे. वारीत सहभागी हाेणाऱ्या प्रत्येकाची काळजी साक्षात पांडुरंग घेत असताे. त्यामुळेच गेली २७ वर्षे मी वारी करू शकलाे. गावी छाेटेशे दुकान आहे. त्यातून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालताे. मला एक मुलगी आणि एक मुलगा आहे. त्यांचे शिक्षण सुरू आहे. मुलीची बारावी झाली आहे. मी वारीत आल्यानंतर कुटुंबाचा संपूर्ण डाेलारा पत्नीच सांभाळते, असे दीपक अभिमानाने सांगत हाेते.
अपंगांकडे केवळ दया-करुणेतून न पाहता त्यांच्या ठिकाणी स्वत:ला ठेवून अनुभव मांडणारा हा वारकरी सांप्रदाय आहे. त्यामुळेच दिव्यांगांनाही वारी आपली वाटते. दाेन्ही डाेळ्यांनी अंध असलेले सूरदास महाराज इतक उत्कृष्ट गायचे की, पुढे काेणी चांगलं गात असेल तर काैतुकाने त्याला सूरदास उपाधी दिली जायची, असे डाॅ. सदानंद माेरे यांनी सांगतात. संत तुकाराम महाराज पालखीत सहभागी दीपक माने यांच्याकडे पाहिले की, जीवनाकडे बघण्याची नवी दृष्टी मिळते.
...अन देवच भेटीला आले..!
पैठण गावातील कुर्मदास जन्माने पांगळा होते. त्यांना गुडघ्यांपासून पाय आणि कोपरापासून हात नव्हते. देवावर त्यांची गाढ श्रद्धा, भक्ती होती. लहान असल्यापासूनच टाळ-मृदंगाचा आवाज त्यांना स्वस्थ बसून देत नव्हता. गळ्यात माळ, कपाळावर गंध लावून कुर्मदास फरफटत फरफटत भजन, कीर्तनात जाऊन बसत. त्यांना पांडुरंगाच्या भेटीची ओढ लागली. एके दिवशी कुर्मदास उठले आणि फरफटत फरफटत पंढरपूरच्या दिशेने निघाले. सकाळ हाेईपर्यंत पुढच्या गावात पोहोचलेही. असे करता करता येरमाळा बार्शी व नंतर लहुळे गाव गाठलं. अन्न-पाण्याविना प्रवास केल्याने अंगात शक्ती उरली नव्हती. प्राण कंठाशी आले होते. सगळे पोट रक्ताने माखले होते त्यात दगडाचे तुकडे काड्या, कचरा गेला होता सगळे अंग खरवडून निघाले होते. अखेर रुख्मिणी वारी तू सांभाळ मी चाललो माझ्या कुर्मदासाला भेटायला, असे म्हणून पांडुरंग स्वत: लहुळे येथे आल्याचे सांगितले जाते. विशेष म्हणजे यावेळी देवासाेबत संत नामदेव आणि ज्ञानेश्वर महाराज आले हाेते. त्यामुळे या लहुळे गावाला धाकट पंढरपूर म्हटले जाते.