सेवेची परंपरा, श्रद्धेचा विसावा, पुण्यातील पालखी मुक्कामी वारकरी भारावले
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2025 15:15 IST2025-06-22T15:14:32+5:302025-06-22T15:15:43+5:30
शहरातील गणेश मंडळांनी या आदरातिथ्यात तसूभरही कमतरता जाणवू दिली नाही, या प्रेमळ मेजवानीमुळे अनेक वारकरी भावुक झाले.

सेवेची परंपरा, श्रद्धेचा विसावा, पुण्यातील पालखी मुक्कामी वारकरी भारावले
पुणे : ‘पुण्यात आल्यावर इतकं प्रेम, आदर आणि गोडधोड जेवण मिळतं की, वाटतं आपण आपल्याच घरी आलो आहोत,’ अशी भावना व्यक्त केली विठ्ठल गायकवाड यांनी. शहरातील गणेश मंडळांनी या आदरातिथ्यात तसूभरही कमतरता जाणवू दिली नाही, या प्रेमळ मेजवानीमुळे अनेक वारकरी भावुक झाले.
गायकवाड गेली १८ वर्षे संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीमध्ये सहभागी होत आहेत. संत ज्ञानेश्वर माउली आणि संत तुकाराम महाराजांच्या पालख्या पुण्यात विसावल्यानंतर दुसऱ्या दिवशी पुणेकरांनी आपल्या पारंपरिक आतिथ्यातिथ्याची प्रचिती देत वारकऱ्यांसाठी गोडधोडासह खास मेजवानीचे आयोजन केले.
पुणेकरांच्या या आत्मीय आणि आपुलकीने भरलेल्या स्वागताने वारकरी मंडळी भारावून गेली. शहरातील विविध गणपती मंडळांनी, सामाजिक संस्थांनी आणि स्थानिक नागरिकांनी नाश्ता, सकाळी व संध्याकाळचे जेवण अशी नियोजनबद्ध सेवा केली. अनेक ठिकाणी पोळी-भाजी, वरण-भात, आमटी, पिठलं, भजी, तर काही ठिकाणी पुरणपोळी, श्रीखंड, गोड शिरा आणि बासुंदी असा रुचकर गोडधोड मेनू तयार करण्यात आला होता.
सेवा हीच पुण्याची वाट
पुण्यातील अनेक नामवंत गणेश मंडळांनी या सेवेत पुढाकार घेत पालखी सोहळ्यात सहभागी दिंड्यांचे आत्मीयतेने स्वागत केले. काही मंडळांनी रात्री उशिरापर्यंत भोजनाची तयारी केली, तर काहींनी पहाटेपासून चहा, नाष्ट्याची वाटपसेवा सुरू केली. कसबा, नाना, भवानी, गणेश, शनिवार पेठेसह मध्यवर्ती भागांतही परिसरात उत्साही वातावरण दिसून आले.
ही सेवा नव्हे, ही संतांची कृपा
संतांच्या पावलांवर सेवा करता येणं म्हणजे आमच्यासाठी परमभाग्य. आम्ही फक्त अन्न देतो; पण त्यांचे आशीर्वाद मात्र आयुष्यभर पुरतात, असं एका मंडळाच्या कार्यकर्त्याने सांगितले. कस्तुरे चौक तरुण मंडळाच्या कार्यकर्त्याने याबाबत सांगितले की, ‘पालख्या मुक्कामाला येण्यापूर्वी एक महिना अगोदरच त्याचे नियोजन केले जाते. यामध्ये वारकऱ्यांसाठी ज्या दिवशी पालखी येते, त्या दिवशी संध्याकाळी चहा, जेवण व राहण्याची सोय करतो. दुसऱ्या दिवशी सकाळी दीड ते दोन हजार वारकऱ्यांना नाष्टा, दुपारी जेवण व संध्याकाळी भारुडाचा कार्यक्रम असतो. ही वारकरी सेवा आम्ही गेली २५ वर्षे अविरतपणे करत आलो आहोत. तसेच वैद्यकीय शिबिर, चरणसेवा, छत्री, चप्पलदुरुस्ती व इतर सेवा मंडळातर्फे दिल्या जातात. यामध्ये मंडळातील सर्व लहान-मोठे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने भाग घेतात.’ तर गवरी आळी मित्रमंडळातर्फे आनंदीबाई कर्वे कन्याशाळेत १० दिंड्यांना राहण्याची सोय, नाष्टा, जेवण आणि औषधांची सोय करण्यात येते. अशा असंख्य मंडळांनी वारकऱ्यांची सेवा केली.
दिंडीप्रमुख म्हणतात...
प्रत्येक वर्षी पुण्यात मिळणारी ही सेवा आमच्यासाठी उत्सवासारखी असते. यंदा तर पुरणपोळी, बासुंदी आणि श्रीखंड मिळालं. वारकऱ्यांसाठी पुणे हे केवळ विसावा नाही, तर श्रद्धेचा केंद्रबिंदू आहे, असे मत संत ज्ञानेश्वर पालखीतील एक दिंडीप्रमुख सुनील महाराज शेवडे यांनी व्यक्त केले.
पुणेकरांची आत्मीयता, वारकऱ्यांचा आनंद
या सेवेमुळे पुणे शहर भक्ती, एकात्मता आणि सामूहिक संस्कृतीचे प्रतीक ठरले. शहरात ठिकठिकाणी भाविकांनी वारकऱ्यांना मार्गदर्शन, अन्नसेवा, वैद्यकीय मदत अशा सेवा दिल्या. त्यामुळे केवळ शरीर नव्हे, तर मनदेखील तृप्त झाल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली. संतांच्या पालख्यांमुळे पुणे पावन होते आणि पुणेकर या सोहळ्याची आतुरतेने वाट पाहत असतात, अशी भावना एका ज्येष्ठ कार्यकर्त्याने व्यक्त केली.