मनमानी पद्धतीने पैसे उकळणे; उद्धट वर्तन, आरटीओची १७४ रिक्षाचालकांवर कडक कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2026 11:59 IST2026-02-25T11:58:52+5:302026-02-25T11:59:31+5:30
रिक्षाचालकांच्या काही तक्रारी असल्यास प्रवाशांनी आपले नाव, मोबाइल क्रमांक आणि संबंधित रिक्षाचा फोटो ८२७५३३०१०१ या व्हॉट्सॲप क्रमांकावर पाठवावा

मनमानी पद्धतीने पैसे उकळणे; उद्धट वर्तन, आरटीओची १७४ रिक्षाचालकांवर कडक कारवाई
पुणे: प्रवाशांकडून मीटरनुसार भाडे न आकारता मनमानी पद्धतीने पैसे उकळणे, जादा प्रवासी घेणे, भाडे नाकारणे, उद्धट वर्तन करणे तसेच ‘मीटर फास्ट’ ठेवणे अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) पुणेने जानेवारी २०२६ मध्ये विशेष मोहीम राबवली. यामध्ये तब्बल ४७७ ऑटो रिक्षांची तपासणी करण्यात आली असून, त्यापैकी १७४ रिक्षाचालक नियमभंग करताना आढळले. दोषी आढळलेल्या चालकांवर कडक कारवाई करत सहा रिक्षाचालकांचे परवाने निलंबित केले आहेत. तसेच उर्वरित चालकांवर दंडात्मक कारवाई करून एकूण ५५ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
तपासणीदरम्यान जादा भाडे आकारणाऱ्या २९ प्रकरणांची नोंद झाली. ‘मीटर फास्ट’ ठेवून प्रवाशांची फसवणूक करणाऱ्या १० चालकांवर कारवाई करण्यात आली. जादा प्रवाशी घेणाऱ्या एक, भाडे नाकारणारे १०, उद्धट वर्तन करणारे १७ तसेच इतर विविध नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चालकांचा समावेश असून, एकूण १७४ रिक्षांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. शहरात वाढत्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर आरटीओने ही मोहीम हाती घेतली होती. कोणत्याही ऑटो रिक्षाचालकाने नियमांचे पालन न केल्यास दंडात्मक तसेच परवाना निलंबनाची कारवाई केली जाईल. जादा भाडे आकारणे, भाडे नाकारणे, मीटर फास्ट असणे किंवा उद्धट वर्तन करणे अशा तक्रारी असल्यास प्रवाशांनी आपले नाव, मोबाइल क्रमांक आणि संबंधित रिक्षाचा फोटो ८२७५३३०१०१ या व्हॉट्सॲप क्रमांकावर पाठवावा. प्राप्त तक्रारीवर तत्काळ कारवाई करण्यात येईल, अशी माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी स्वप्निल भोसले यांनी दिली.
रिक्षावाले आकारतात अधिक भाडे
सध्या ओला, उबेर या ॲपवरून रिक्षा बुक केल्यानंतर त्यात जे नियमानुसार भाडे आहे, ते सुरुवातीला दिसते. परंतु, जेव्हा रिक्षा घरासमोर येते, तेव्हा मात्र रिक्षावाले मीटरने भाडे आकारू, असे सांगतात. त्यावर ग्राहक आणि त्यांचा वाद होतो. जर मीटरवर भाडे आकारायचे असेल तर मग ॲपमधून बुकिंग कशाला केले जाते. यावर शहरभर वाद सुरू आहे. त्यामुळे याविषयी आरटीओने देखील लक्ष देऊन असे प्रकार होऊ नये, यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे, अशी मागणी ग्राहकांकडून होत आहे.