विलीनीकरण व्हावे अशी अजितदादांची इच्छा होती, माझीही आहे : जयंत पाटील
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2026 12:05 IST2026-02-15T12:03:56+5:302026-02-15T12:05:47+5:30
ज्येष्ठ नेते शरद पवार यांची प्रकृती ठीक नसल्यामुळे रुग्णालयात दाखल केले होते. त्यांना शनिवारी डिस्चार्ज देण्यात आला.

विलीनीकरण व्हावे अशी अजितदादांची इच्छा होती, माझीही आहे : जयंत पाटील
पुणे : राष्ट्रवादीच्या विलीनीकरणासाठी अजित पवार यांच्याशी मोजून ११ वेळा चर्चा, बैठका झाल्या होत्या. त्यांच्या पुढाकारानेच ही चर्चा झाली होती. पण, आता तेच राहिले नाहीत, त्यामुळे त्यावर मला काही बोलावे वाटत नाही, मी आज पुण्यात शरद पवार साहेबांच्या प्रकृतीची चौकशी करायला आलो होतो. त्यांच्याशी राजकारणावर काही बोलणे झाले नाही, असे स्पष्टीकरण राष्ट्रवादी (शरद पवार)चे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी शनिवारी (दि. १४) पुण्यात माध्यमांशी बोलताना दिले. विलीनीकरण व्हावे, अशी माझी इच्छा आहे आणि अजितदादादेखील सकारात्मक होते, एकत्र आलो तर आमचा पक्ष आणखी जोमाने पुढे जाईल, असेही त्यांनी सांगितले.
ज्येष्ठ नेते शरद पवार यांची प्रकृती ठीक नसल्यामुळे रुग्णालयात दाखल केले होते. त्यांना शनिवारी डिस्चार्ज देण्यात आला. त्यांच्या भेटीला रात्री उशिरा जयंत पाटील पुण्यात आले होते. तेव्हा भेटीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यांना विलीनीकरणाबाबत विचारले असता, त्यांनी आता यावर बोलणे योग्य नाही, असे सांगितले.
विलीनीकरणाबाबत राज्याचे प्रमुख नेते शशिकांत शिंदे आणि सुप्रिया सुळे हे निर्णय घेतील, ते जो निर्णय घेतील, तो आम्हाला मान्य असणार आहे. त्यानुसार आमची पुढची पावले पडतील. पक्षाचे कामकाज सुरूच आहे. त्याचे स्वतंत्र व्यक्तिमत्त्व आहे. मी यापूर्वी यावर तपशिलात चर्चा केलेली आहे. पण, ती चर्चा आता सांगणे बरे नाही, असेही ते म्हणाले.
“अजितदादा आज नाहीत. त्यामुळे राजकारणात पुढे काही होईल, ते सांगता येत नाही. पण, महाराष्ट्रात अनेक प्रश्न आहेत, त्यावर आम्ही काम करू. त्यादृष्टीने आमचा पक्ष काम करेल. पक्ष विलीनीकरणावर आज भाष्य करावे वाटत नाही.” सुनेत्रावहिनींनादेखील मी भेटलो. त्यामुळे त्यांना आम्ही बोललो की, त्यांना काही अडचणी आल्या तर त्या आम्ही सोडवू. त्यांना कुठे अडले तर मदत करू, असे जयंत पाटील यांनी सांगितले.