Ajit Pawar Passed Away : ‘शब्दाला पक्के, ग्रामीण महाराष्ट्राचे नस ओळखणारे नेते हरपले’
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2026 16:19 IST2026-01-29T16:18:22+5:302026-01-29T16:19:11+5:30
संपूर्ण महाराष्ट्र शोकाकुल आहे; राज्य सरकारने ३ दिवसांचा दुखवटा जाहीर केला.

Ajit Pawar Passed Away : ‘शब्दाला पक्के, ग्रामीण महाराष्ट्राचे नस ओळखणारे नेते हरपले’
राजगुरुनगर :बारामतीजवळील विमान अपघातात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे दुःखद निधन झाले. मुंबईहून बारामतीकडे जात असताना Learjet 45 चार्टर विमान लँडिंगदरम्यान क्रॅश झाले; अजितदादांसह ५ जणांचा जागीच मृत्यू झाला. विमान आग लागून जळून खाक झाले. संपूर्ण महाराष्ट्र शोकाकुल आहे; राज्य सरकारने ३ दिवसांचा दुखवटा जाहीर केला.
खेड तालुका शिक्षणप्रसारक मंडळाचे अध्यक्ष ॲड. देवेंद्र बुट्टे पाटील यांनी भावुक होऊन श्रद्धांजली वाहिली - "अजितदादांचे आमचे कौटुंबिक नाते होते. शैक्षणिक कामांसाठी अनेकदा भेटी, चर्चा व्हायच्या. खेड तालुक्यातील शिक्षणाला त्यांचा कायम पाठिंबा होता. २००१ मध्ये साहेबराव बुट्टे पाटील यांच्या निधनानंतर सांत्वनासाठी ते आमच्या घरी आले. २००३ मध्ये महाविद्यालयातील पुतळ्याचे अनावरण, २००५ मध्ये विद्यार्थिनी वसतिगृह उद्घाटन... एकत्र जेवण, गप्पा, कुटुंब फोटो – त्या आठवणी आज डोळ्यांत येऊन अश्रू आणतात."
ते पुढे म्हणाले, "राजकीय मतभेद असले तरी दादांबरोबरचा स्नेह कायम होता. शब्दाला पक्के, राजकारणापलीकडे सर्वांना मदत करणारे, ग्रामीण महाराष्ट्राचे नस ओळखणारे नेते आज आपल्यातून निघून गेले. बारामती, पुणे, संपूर्ण राज्याचे नुकसान झाले. खेड तालुका शिक्षणप्रसारक मंडळाच्या वतीने मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो."