Ajit Pawar Funeral Live: “विलासराव, मुंडे आणि आता अजितदादा…बीड जिल्ह्याला शाप आहे का?” सुरेश धस यांची वेदनादायक प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2026 11:53 IST2026-01-29T11:53:32+5:302026-01-29T11:53:55+5:30
Ajit Pawar Funeral Live लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा, प्रशासनावर पकड असलेला आणि सामान्य माणसाच्या प्रश्नांवर ठोस भूमिका घेणारा नेता आपण गमावला आहे

Ajit Pawar Funeral Live: “विलासराव, मुंडे आणि आता अजितदादा…बीड जिल्ह्याला शाप आहे का?” सुरेश धस यांची वेदनादायक प्रतिक्रिया
किरण शिंदे
पुणे : “हे आमचं (बीड जिल्ह्याचं) दुर्दैव आहे. आमचे दादा पालकमंत्री झाले आणि जिल्ह्यातील अनेक प्रलंबित प्रश्न मार्गी लागू लागले होते. विकासाची गती दिसू लागली होती. पण आम्हाला शाप आहे की काय, असंच वाटायला लागलंय. याआधी विलासराव देशमुख आणि गोपीनाथराव मुंडे हेही काही काळ बीड जिल्ह्याचे पालकमंत्री होते आणि ते दोघेही अकाली गेले. आता अजितदादाही आपल्यातून निघून गेले. ६७, ६६ आणि ६४ अशा वयात ही तीन मोठी नेतृत्वं हरपणं हे अत्यंत वेदनादायक आहे.”
बारामतीतील विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार पार पडणार आहेत. या अंत्यसंस्कारासाठी आमदार सुरेश धसबारामतीत उपस्थित असून, त्याआधी माध्यमांशी संवाद साधत त्यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.
अजित पवार यांच्याबद्दल बोलताना सुरेश धस म्हणाले, “अजित पवारांच्या निधनाने महाराष्ट्राची मोठी हानी झाली आहे. राज्याचं अपरिमित नुकसान झालं आहे. कुठलाही प्रश्न त्यांच्या समोर मांडला की ते एक घावात दोन तुकडे करणारा निर्णय घ्यायचे. पोकळ आश्वासन देणारे ते कधीच नव्हते. काम होणार असेल तर स्पष्ट ‘हो’ आणि शक्य नसेल तर ठाम ‘नाही’ म्हणण्याची प्रामाणिकता त्यांच्यात होती,” ते पुढे म्हणाले,“आज महाराष्ट्रात अशी निर्णयक्षमता असलेली दुसरी व्यक्ती नाही. लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा, प्रशासनावर पकड असलेला आणि सामान्य माणसाच्या प्रश्नांवर ठोस भूमिका घेणारा नेता आपण गमावला आहे. ही पोकळी सहज भरून निघणारी नाही.”