विमानसेवेच्या सुरक्षिततेकडे अधिक गांभीर्यानं लक्ष देण्याची गरज; अजित पवारांचे आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2025 17:56 IST2025-06-12T17:55:40+5:302025-06-12T17:56:35+5:30
Air India Ahmedabad Plane Crash विमानसेवा कंपन्यांनी त्यांच्या विमानसेवेच्या सुरक्षेचा फेरआढावा घेऊन, सुरक्षितता मानकांचं पालन करुन भविष्यात अशी दुर्घटना होणार नाही, हे सुनिश्चित करावं

विमानसेवेच्या सुरक्षिततेकडे अधिक गांभीर्यानं लक्ष देण्याची गरज; अजित पवारांचे आवाहन
पुणे : गुजरातच्या अहमदाबाद इथं भीषण विमानअपघात घडला. गुरुवारी एअर इंडियाचं AI171 विमानअहमदाबादहून लंडनच्या गॅटविकला जाणार होते. मात्र उड्डाणानंतर अवघ्या काही मिनिटांतच ६२५ फूटावरून हे विमान खाली जमिनीवर कोसळले. घटनास्थळी एनडीआरएफ टीमसह अग्निशमन दलाच्या गाड्या रेस्क्यू ऑपरेशन करत आहेत. त्याशिवाय आणखी २ टीम तिथे रवाना झाल्या आहेत. अहमदाबादचे महापालिका आयुक्त, पोलीस आयुक्त यांच्यासह सर्व वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी हजर आहेत. या दुर्दैवी घटनेनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आवाहन करत विमानसेवेच्या सुरक्षिततेकडे अधिक गांभीर्यानं लक्ष देण्याची गरज असल्याचे समाजमाध्यमवरून सांगितले आहे. (Air India Ahmedabad Plane Crash)
अजित पवार म्हणाले, गुजरातच्या अहमदाबाद विमानतळावरुन लंडनला निघालेलं एअर इंडियाचं विमान अहमदाबाद शहरातील इमारतींवर कोसळून झालेल्या अपघातात प्रवासी तसंच स्थानिक नागरिकांचा झालेला मृत्यू ही धक्कादायक, क्लेशदायक, दुर्दैवी घटना आहे. अहमदाबाद शहरातील या विमान अपघातामुळे महाराष्ट्रासह संपूर्ण देश आज दु:खी असून मृत्यू पावलेल्यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांच्या दु:खात प्रत्येक महाराष्ट्रवासी सहभागी आहे.
गुजरात पोलीस, अग्निशमन, रुग्णवाहिका सेवा, वैद्यकीय पथकांनी, सुरक्षा दलांनी दुर्घटनास्थळी पोहोचून बचाव व मदतकार्य तातडीनं राबवलं. परंतु झालेली जीवितहानी खुप मोठी असून ती भरुन निघणार नाही. अपघाताचं निश्चित कारण अद्याप कळलं नसलं तरी, चौकशीअंती ते स्पष्ट होईल. परंतु अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी पावलं उचलण्याची गरज आहे. या दुर्घटनेच्या निमित्तानं विमानसेवेच्या सुरक्षिततेकडे अधिक गांभीर्यानं लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे. विमानसेवा कंपन्यांनी त्यांच्या विमानसेवेच्या सुरक्षेचा फेरआढावा घेऊन, सुरक्षितता मानकांचं पालन करुन भविष्यात अशी दुर्घटना होणार नाही, हे सुनिश्चित करावं, असं आवाहन अजित पवारांनी यावेळी केल आहे.
विमान BJ मेडिकलच्या इमारतीवर कोसळले
मेघानीनगर भागात या विमानाचा अपघात झाला तिथे BJ मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल होते. याच मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेल इमारतीवर दुर्घटनाग्रस्त विमान धडकले. हॉस्टेलमध्ये कॅन्टिनमध्ये मेडिकलचे विद्यार्थी जेवत असताना हा अपघात घडला. या दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती आहे. अद्याप याची अधिकृत माहिती समोर आली नाही. BJ मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेलवर एअर इंडियाचे विमान कोसळले. त्यानंतरचे अनेक फोटो समोर आलेत. या फोटोत विमानाचा मागील भाग इमारतीत घुसल्याचे दिसत आहे. विमानाच्या धडकेमुळे संपूर्ण इमारतीला आग लागली आणि आकाशात काळा धूर पसरला.