अकरावी प्रवेशाच्या पहिल्या फेरीत ६ लाख ३२ हजार विद्यार्थ्यांना प्रवेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2025 20:10 IST2025-06-28T20:08:48+5:302025-06-28T20:10:13+5:30
- थेट महाविद्यालयात साेमवारपासून करता येणार प्रवेश निश्चित; दुसरी फेरी नऊ जुलैला

अकरावी प्रवेशाच्या पहिल्या फेरीत ६ लाख ३२ हजार विद्यार्थ्यांना प्रवेश
पुणे : राज्यात अकरावी प्रवेशाची पहिली गुणवत्तायादी शनिवारी (दि. २८) सायंकाळी प्रसिद्ध झाली आहे. या कॅप राउंड १ मध्ये एकूण ६ लाख ३२ हजार १९४ विद्यार्थ्यांना महाविद्यालय जाहीर झाले आहेत. यानुसार विद्यार्थ्यांनी साेमवारी (दि.३०) प्रत्यक्ष महाविद्यालयात जाऊन प्रवेश निश्चित करता येणार आहे. तसेच काेटांतर्गत ६० हजार ४८७ विद्यार्थ्यांनी अकरावी प्रवेश निश्चित केला आहे. दुसऱ्या फेरीसाठी दि. ९ जुलै रोजी रिक्त जागा प्रदर्शित केल्या जाणार आहेत, अशी माहिती माध्यमिक शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांनी दिली आहे.
या फेरीत एकूण १० लाख ६६ हजार ५ विद्यार्थ्यांनी अर्ज केला हाेता. त्यापैकी ६ लाख ९ हजार ७१८ विद्यार्थी विज्ञान शाखेचे हाेते. त्यातील ३ लाख ४२ हजार ८०१ विद्यार्थ्यांना गुणवत्तेनुसार पसंतीचे महाविद्यालय मिळाले आहे. वाणिज्य शाखेसाठी २ लाख २४ हजार ९३१ विद्यार्थ्यांनी अर्ज केला हाेता. त्यातील १ लाख ३९ हजार ६०२ विद्यार्थ्यांना पहिल्या फेरीत महाविद्यालय मिळाले आहे. त्याखालाेखाल कला शाखेचा क्रमांक लागताे. या फेरीत एकूण २ लाख ३१ हजार ३५६ अर्ज आले हाेते. त्यापैकी १ लाख ४९ हजार ७९१ विद्यार्थ्यांना महाविद्यालय निश्चित करता येणार आहे.
४ लाख ५७ हजार विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीचे महाविद्यालय
महाविद्यालय निवडीसाठी विद्यार्थ्यांना पसंतीक्रम भरण्यासाठी १० पर्याय उपलब्ध हाेते. विद्यार्थ्यांची गुणवत्ता आणि महाविद्यालयाचा कट ऑफ यानुसार पसंतीक्रमानुसार महाविद्यालय देण्यात आला आहे. यात १० लाख ६६ हजार ५ विद्यार्थ्यांपैकी ६ लाख ३२ हजार १९४ विद्यार्थ्यांना महाविद्यालय जाहीर करण्यात आले आहे. यापैकी ४ लाख ५७ हजार ८४१ विद्यार्थ्यांना त्यांनी दिलेल्या पहिल्या पसंतीक्रमानुसार महाविद्यालय मिळाले आहे. तसेच ७७ हजार ९९ विद्यार्थ्यांना त्यांनी दिलेल्या दुसऱ्या पसंतीक्रमानुसार प्रवेश मिळाला आहे. दहाव्या पसंतीचे महाविद्यालय मिळालेल्या विद्यार्थ्यांची संख्या २ हजार १४६ आहे.