मुंबई: गोवा विधासभा निवडणुकीच्या (Goa Election 2022) पार्श्वभूमीवर राजकीय रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. सध्या गोव्याच्या राजकारणात केवळ उत्पल पर्रिकर आणि भाजप त्यांच्यावर करत असलेला अन्याय, यावर मोठी चर्चा सुरू आहे. अन्य पक्षांपेक्षा शिवसेना यावर अधिक भाष्य करताना दिसत आहे. गोव्यात भाजप सत्ता राखण्यास यशस्वी होईल, असा अंदाज काहींनी वर्तवला असला, तरी शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी गोव्यात कुणालाच बहुमत मिळणार नाही, असे भाकित वर्तवले आहे.
संजय राऊत यांनी मुंबईत मीडियाशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी गोव्यातील राजकीय परिस्थितीबाबत भाष्य केले आहे. लवकरच गोव्यात जात असून, उमेदवारांची यादी घोषित करू. राष्ट्रवादीदेखील त्यांच्या उमेदवारांची यादी जाहीर करेल. आम्ही उद्या लढण्यासंबंधी चर्चा करू. गोवा लहान राज्य आहे. प्रत्येकजण आपला उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करत असून, कोणलाही बहुमत मिळणार नाही. गोव्यात वेगळीच खिचडी शिजत आहे, असा दावा संजय राऊत यांनी केला.
राष्ट्रवादीशी चर्चा केल्यानंतर यादी जाहीर करू
गोव्यात राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र लढत आहे. लवकरच गोव्यात जाणार आहे. राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल गोव्यात आहेत. त्यांच्याशी सविस्तर चर्चा करणार आहे. त्यानंतर आम्ही आमच्या उमेदवारांची यादी जाहीर करू. तसेच राष्ट्रवादीशी चर्चा केल्यानंतर कोण कुठल्या जागांवर लढणार याबाबतही निर्णय घेतला जाईल, अशी माहिती संजय राऊत यांनी दिली.
दरम्यान, जर उत्पल पर्रिकर अपक्ष उभे राहणार असतील, तर मनोहर पर्रिकरांना आदरांजली म्हणून सर्व राजकीय पक्षांनी विरोधात उमेदवार देऊ नये, असे संजय राऊत म्हणाले होते. यानंतर चंद्रकांत पाटील यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली होती. दुसरीकडे, उत्पल पर्रिकर यांच्याविषयी आम्हाला चिंता आहे. गेले महिनाभर उत्पलच्या संपर्कात आहे. आम्ही अजून त्याच्याशी चर्चा करू, असे भाजपचे नेते व गोवा निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.