Opinion Poll: राज्यात सेना-भाजपाला फटका बसणार; 'इतक्या' जागा घटणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2019 20:31 IST2019-04-08T20:28:46+5:302019-04-08T20:31:31+5:30
आता टाइम्स नाऊ आणि व्हीएमआरनं सर्व्हे केला आहे. त्यात सेना-भाजपाला फटका बसण्याची शक्यता आहे.

Opinion Poll: राज्यात सेना-भाजपाला फटका बसणार; 'इतक्या' जागा घटणार
नवी दिल्लीः देशात जोरदार प्रचाराचा धुरळा उडाला आहे. सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाही. त्यातच आता टाइम्स नाऊ आणि व्हीएमआरनं सर्व्हे केला आहे. त्यात सेना-भाजपाला फटका बसण्याची शक्यता आहे. मागच्या वेळच्या तुलनेत एनडीएच्या 4 जागा कमी होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. भाजपा युतीला 38 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला असून, काँग्रेस आघाडीला 10 जागा मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 2014ला एनडीएला महाराष्ट्रात 42 जागा मिळाल्या होत्या, यूपीएला अवघ्या 6 जागांवर समाधान मानावं लागलं होतं.
गेल्या वेळच्या तुलनेत यंदा सेना-भाजपाच्या चार जागा घटण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. 2014मध्ये सेना-भाजपाला 51.3 टक्के मतं मिळाली होती. तर काँग्रेस आघाडीच्या खात्यात 34.1 टक्के मतं जमा झाली होती. तर यंदा सेना-भाजपाच्या मतांच्या टक्केवारी घट होणार असून, त्यांना 48.15 टक्के मतं मिळण्याची शक्यता आहे. दुसरीकडे काँग्रेस आघाडीला 36. 88 टक्के मतं मिळणार आहेत, असं या सर्व्हेतून स्पष्ट करण्यात आलं आहे. तर एबीपी-सी व्होटरनं केलेल्या सर्व्हेतही सेना-भाजपाच्या जागा घटण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. ज्यातील 48 पैकी 35 जागांवर युती विजयी होईल, अशी शक्यता या सर्व्हेतून व्यक्त करण्यात आली आहे. एबीपी-सी व्होटरच्या सर्वेक्षणानुसार, यंदा राज्यात भाजपा-शिवसेना युतीला एकूण 35 जागांवर यश मिळू शकतं.
यंदा भाजपा 25 जागांवर निवडणूक लढवणार आहे. यातील 21 जागांवर त्यांना यश मिळेल, असा अंदाज आहे. मात्र गेली साडेचार वर्षे सरकारवर टीकेचे बाण सोडणाऱ्या शिवसेनेला फटका बसण्याची शक्यता आहे. 23 जागा लढवणाऱ्या शिवसेनेला 14 जागांवर यश मिळू शकतं. गेल्या निवडणुकीत शिवसेनेचे 18 उमेदवार विजयी झाले होते. मात्र यंदा त्यांना 4 जागांवर फटका बसू शकतो. तर गेल्या निवडणुकीच्या तुलनेत भाजपाची केवळ एक जागा कमी होईल, असा अंदाज आहे. 2014 मध्ये युतीनं राज्यात 42 (भाजपा-22, शिवसेना-18, स्वाभिमानी-1) जागा जिंकल्या होत्या. त्यात यंदा सात जागांची घट होऊ शकते.