“पंतप्रधानांना हाथरस प्रकरणी दुःख झालं असेल तर योगींचा राजीनामा घेऊन सरकार बरखास्त करावं”
By प्रविण मरगळे | Published: September 30, 2020 03:00 PM2020-09-30T15:00:07+5:302020-09-30T15:02:55+5:30
Hathras Gangrape Case: हाथरसप्रकरणी पंतप्रधानांना दु:ख झालं असेल तर योगींचा तात्काळ राजीनामा घेवून सरकार बरखास्त करावे अशी मागणीही नवाब मलिक यांनी केली आहे.
मुंबई – उत्तर प्रदेशातील हाथरस येथे झालेल्या घटनेमुळे संपूर्ण देशभरात संतापाचं वातावरण आहे. या घटनेत पोलिसांच्या भूमिकेवर अनेकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत, त्यावरुन आता उत्तर प्रदेशातील योगी सरकारवर चहुबाजूने टीका होऊ लागली आहे. उत्तरप्रदेशमध्ये आता कायद्याचं राज्य राहिलं नाही तर योगींच्या खास लोकांचं राज्य आलं आहे. योगी हे महाराज आहेत परंतु राज्य राजासारखं चालवत असून हे लोकशाहीला घातक आहे अशा शब्दात राष्ट्रवादीचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा समाचार घेतला आहे.
या घटनेवर नवाब मलिक म्हणाले की, उत्तर प्रदेशमध्ये योगीजी ज्यापध्दतीने सरकार चालवत आहेत यावरून ते त्यांच्या सहकाऱ्यांना व कार्यकर्त्यांना खुली सूट देत आहेत. हाथरसमध्ये दलित बालिकेवर सामुहिक बलात्कार झाला. त्यानंतर तिची हत्या झाली. सुरुवातीला फेक न्यूज आहे असं काही घडलंच नाही म्हणणार्या योगी सरकारने त्या बालिकेवर रातोरात अंत्यसंस्कार का केले? यातून स्पष्ट होते की उत्तर प्रदेशमध्ये कायद्याचं राज्य राहिलेले नाही असा आरोप त्यांनी केला.
तसेच उन्नावमध्ये भाजपा आमदार सेंगरला वाचवण्याचा प्रयत्न झाला तसा या केसमध्ये आणि यासारख्या अनेक केसेस उत्तरप्रदेशमध्ये आहेत. ज्यांना सरकार अशी वागणूक देत आहे, हाथरसप्रकरणी पंतप्रधानांना दु:ख झालं असेल तर योगींचा तात्काळ राजीनामा घेवून सरकार बरखास्त करावे अशी मागणीही नवाब मलिक यांनी केली आहे.
काय म्हणाले योगी आदित्यनाथ?
योगी आदित्यनाथ यांनी या घटनेबाबत माहिती देताना सांगितले की, हाथरस सामूहिक बलात्काराच्या घटनेतील दोषींना वाचवले जाणार नाही. घटनेच्या चौकशीसाठी एसआयटीची स्थापना करण्यात आली आहे, हे पथक पुढील ७ दिवसांत अहवाल सादर करेल. वेगवान न्याय मिळावा यासाठी या खटल्याची सुनावणी फास्ट- ट्रॅक न्यायालयात करणार असल्याची माहिती योगी आदित्यनाथ यांनी दिली.
दोषींवर कठोर कारवाई करा- पंतप्रधान नरेंद्र मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील हाथरस सामूहिक बलात्काराच्या घटनेचा निषेध केला. नरेंद्र मोदींनी या घटनेसंदर्भात माहिती जाणून घेतली. यानंतर दोषींवर कठोर कारवाई करण्याची सूचना नरेंद्र मोदी यांनी दिल्याचे योगी आदित्यनाथ यांनी सांगितले.
काय आहे प्रकरण?
हाथरस जिल्ह्यातील चंदपा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका गावात १४ सप्टेंबर रोजी या मुलीवर सामूहिक बलात्कार झाला होता. पीडित मुलगी आपल्या आईसह शेतात गेली होती आणि अचानक गायब झाली होती. नंतर अत्यंत गंभीर जखमी अवस्थेत ती आढळून आली. आरोपीने तिचा गळा दाबण्याचा प्रयत्नही केला होता. पीडित मुलीला दुसर्या दिवशी तिला अलिगढ येथील रुग्णालयात नेण्यात आले. मात्र प्रकृती गंभीर असल्याने उत्तम वैद्यकीय सुविधांकरिता तिला दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात हलविण्यात आले. पीडित मुलीची प्रकृती चिंताजनक आणि व्हेंटिलेटरवर होती. पण दुर्देवाने मंगळवारी तिने अखेरचा श्वास घेतला, यानंतर पोलिसांनी तिच्या आईवडिलांना दूर ठेवत तिच्या मृतदेहावर मध्यरात्री अंत्यसंस्कार केले.