काँग्रेसच्या हाती आला मोठ्ठा भोपळा; मोदी-शहांचा आणखी एक जोरदार दणका
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2021 14:16 IST2021-02-22T14:12:48+5:302021-02-22T14:16:07+5:30
Congress Party Lost Power In Puducherry: पुद्दुचेरी काँग्रेसच्या 'हाता'तून गेलं; मुख्यमंत्री बहुमत सिद्ध करण्यात अपयशी

काँग्रेसच्या हाती आला मोठ्ठा भोपळा; मोदी-शहांचा आणखी एक जोरदार दणका
नवी दिल्ली: गेल्या दोन लोकसभा निवडणुकांमध्ये सपाटून मार खाणाऱ्या काँग्रेसची पिछेहाट सुरूच आहे. पुद्दुचेरीत आमदारांच्या राजीनाम्यामुळे संकटात सापडलेलं काँग्रेसचं सरकार आज कोसळलं. मुख्यमंत्री नारायणसामींना बहुमत सिद्ध करण्यात अपयश आलं. त्यामुळे काँग्रेसच्या हातून आणखी एक राज्य गेलं. बहुमत चाचणी घेण्यापूर्वीच काँग्रेस आणि डीएमकेच्या आमदारांनी सभात्याग केला. त्यामुळे काँग्रेसला बहुमत सिद्ध करता आलं नाही.
पडुचेरीत काँग्रेसचं सरकार कोसळलं; नारायणसामींनी मोदी, हिंदी, बेदींवर साधला निशाणा
दक्षिण भारत कधीकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जायचा. दक्षिणेतल्या अनेक राज्यांमध्ये काँग्रेस दीर्घकाळ सत्तेत राहिला. मात्र गेल्या काही वर्षांपासून काँग्रेसला दक्षिणेत जोरदार धक्के बसू लागले आहेत. कर्नाटक पाठोपाठ पुद्दुचेरीदेखील 'हाता'तून गेल्यानं काँग्रेसच्या अडचणी वाढल्या आहेत. दक्षिणेत काँग्रेसच्या हाती आता भोपळा उरला आहे. पुद्दुचेरीतील सत्ता गमावल्यानं आता दक्षिणेतलं एकही राज्य काँग्रेसकडे उरलेलं नाही.
मोदी-शाहंच्या 'खेळी'मुळे काँग्रेसचा 'खेळ खल्लास'; किरण बेदींना हटवलं, पुडुचेरी सरकार पाडलं!
सध्या केवळ ५ राज्यांत काँग्रेसची सत्ता
२०१४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत दारुण पराभव झाल्यापासून काँग्रेसची सातत्यानं पिछेहाट सुरू आहे. कधीकाळी देशातील बहुतांश राज्यांमध्ये सत्ता असलेली काँग्रेस आता केवळ ५ राज्यांत सत्तेत आहे. पंजाब, राजस्थान, छत्तीसगड, महाराष्ट्र आणि छत्तीसगडमध्ये काँग्रेसचं सरकार आहे. त्यातही महाराष्ट्रात काँग्रेस सत्तेतला तिसरा, तर झारखंडमध्ये दुसऱ्या क्रमाकांचा पक्ष आहे.
पक्षात दोन गट अन् वाद
काँग्रेस पक्षातल्या गटातटाच्या राजकारणानं पक्षाचं मोठं नुकसान झालं आहे. पक्षाची संघटनात्मक ताकद आता क्षीण झाली आहे. अनेक कार्यकर्ते पक्षापासून दुरावले आहेत. पक्षांतर्गत वादामुळे पक्षाचं मोठं नुकसान झालं आहे. मध्यंतरी एका पत्रातून काँग्रेसमधील दोन गट स्पष्टपणे दिसून आले. पक्षातल्या २३ बड्या नेत्यांनी सोनिया गांधींना पत्र लिहून पक्षात बदल करण्याची मागणी केली. यात अनेक ज्येष्ठ नेत्यांचा समावेश होता. तर दुसऱ्या गटानं नेतृत्त्वावर विश्वास व्यक्त केला.